स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारे राहुल गांधी यांनी फाळणीसाठी उत्तरदायी असणार्‍या नेहरूंविषयीचे सत्य बोलण्याचे धारिष्ट्य दाखवावे !

राहुल गांधी यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, या आरोपावरील श्री. रणजित सावरकर यांचा रोखठोक प्रतिवाद !

मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, असे तथ्यहीन वक्तव्य केले. या विधानाच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड केला. त्या पत्रकार परिषदेतील काही भाग दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २७ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केला. त्याचा उर्वरित भाग आज येथे प्रसिद्ध करत आहोत.

(लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

१२. नेहरू आणि एडविना यांचे प्रेमसंबंध, हा ब्रिटिशांनी त्यांना हवे तसे करून घेण्यासाठी रचलेल्या षड्यंत्राचा भाग !

मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष असतांना ‘त्यांच्याकडून हवे ते कसे करून घेतले ?’, याविषयी व्हॉईसरॉय लॉर्ड व्हेवेल यांनी स्वत: लिहिले आहे. ‘ब्रिटिशांना हवे ते करवून घेणे, याची पुढची पायरी म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांचे प्रेमसंबंध होते. व्हेवेल यांच्यानंतर माऊंटबॅटन यांना भारतात ‘व्हाईसरॉय’ म्हणून पाठवायचे निश्‍चित झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅटली यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, लॉर्ड माऊंटबॅटन हुशार होते; परंतु त्यांना भारतात पाठवण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांची पत्नी एडविना यांची अन्यांवर छाप पाडण्याची वृत्ती हेही आहे. यातून एडविना यांना भारतात पाठवणे, हा एक योजनाबद्ध कार्यक्रम असल्याचे दिसून येते.

१३. काँग्रेसला विश्‍वासात न घेता नेहरूंनी भारताची फाळणी संमत केली !

लॉर्ड माऊंटबॅटन भारतात आल्यानंतर केवळ ७२ दिवसांत त्यांनी भारताच्या फाळणीची योजना मांडली. ऐनवेळी काँग्रेसकडून विरोध होऊ नये, यासाठी त्यांनी आधी नेहरू यांच्याकडून ती संमत करून घेतली. त्यासाठी नेहरू यांना शिमला हाऊस येथे बोलावण्यात आले. लॉर्ट माऊंटबॅटन, एडविना आणि त्यांची मुलगी पामेला यांच्यासमवेत नेहरू शिमला हाऊसमध्ये गेले होते. एडविना यांनी काय जादू केली की, नेहरू यांनी काँग्रेसला विश्‍वासात न घेता भारताची फाळणी मान्य केली ?

१४. आजोबांनी (नेहरूंनी) फाळणी का मान्य केली ? याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे !

पाकिस्तानातील पंजाबमध्ये अपहरण करण्यात आलेल्या २० सहस्र मुलींना सोडवण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री बळवंत सिंह यांनी नेहरू यांना सैन्य पाठवण्यात सांगितले; मात्र नेहरू यांनी सैन्य पाठवले नाही. बळवंत सिंह यांनी वल्लभभाई पटेल यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. या वेळी कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होत नव्हता का ? याविषयी राहुल गांधी यांनी बोलावे. ‘स्वत:चे आजोबा शिमला हाऊसमध्ये एकटे का गेले ?’, ‘त्यांनी भारताची फाळणी का मान्य केली ?’, याचीही उत्तरे राहुल गांधी द्यावीत.

(सौजन्य : Hindusthan Post)

१५. स्वातंत्र्यानंतर १२ वर्षे नेहरू पंतप्रधान कार्यालयाची रोजनिशी एडविना यांना पाठवत होते !

पामेला हिने लिहिले आहे की, माझ्या वडिलांना काही कामे करून घायची असतील, तर ते आईला नेहरू यांच्याकडून करवून घेण्यास सांगायचे. या प्रेमप्रकरणाविषयी राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे. एडविना यांना भारतात अशासाठीच आणले की, ते एडविना यांच्या हातातील खुळखुळे बनतील ! पामेला यांनी असेही लिहिले आहे की, नेहरू नियमित रात्री २ नंतर तिच्या आईला पत्र लिहायचे. स्वातंत्र्यानंतर १२ वर्षे एडविना माऊंटबॅटन मरेपर्यंत नेहरून पंतप्रधान कार्यालयाची रोजनिशी त्यांना पाठवत होते.

१६. ‘स्वातंत्र्यानंतरही लंडनमध्ये भारताचा प्रतिनिधी कोण असावा ?’ हे नेहरू यांनी माऊंटबॅटन यांना विचारून घेतले !

वर्ष १९५२ मध्ये मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बी.जी. खेर यांना पदावरून काढून मोरारजी देसाई यांना मुख्यमंत्री करायचे ठरले. या वेळी खेर यांची सोय करायची; म्हणून त्यांना लंडनमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करायचे ठरले. त्या वेळी नेहरू यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र लिहून ‘याविषयी त्यांची काही तक्रार नाही ना ?’, हे विचारून घेतले. वर्ष १९५२ मध्ये भारताचा पंतप्रधान ‘लंडनमध्ये भारताचा प्रतिनिधी कोण असावा ?’ यासाठी माऊंटबॅटन यांची अनुमती मागतो, हा देशद्रोह नाही का ? तुम्ही देशाला गुलाम करून टाकले. स्वातंत्र्यानंतर १२ वर्षे एडविना जिवंत असेपर्यंत अशी गुलामगिरी चालू होती.

१७. नेहरू आणि एडविना यांचा पत्रव्यवहार जनतेपुढे उघड करावा !

एका बाईसाठी नेहरू यांनी भारताची फाळणी मान्य केली. माझी भारत सरकारकडे  मागणी आहे की, नेहरू-एडविना यांच्यातील पत्रव्यवहार जो ‘एडविना कलेक्शन’ म्हणून  ब्रिटिशांकडे आहे, त्याची मागणी करून तो भारतीय जनतेसाठी उघड करावा. ज्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून भारताचा ‘लाडका नेता’ म्हटले जाते, त्या नेत्याने ‘देशाची कशी फसवणूक केली आणि देशाचा कसा विश्‍वासघात केला ?’ हे या पत्रांमधून कळेल.

१८. भत्ता गांधीजींनाही मिळत होता !

ज्यांनी देशासाठी १४ वर्षे कठोर कारवास भोगला, त्यांच्यावर तुम्ही ‘प्रतिमास ६० रुपये भत्त्यासाठी ब्रिटिशांचे नोकर झालात’, असा आरोप करता. गांधीजी यांनाही ब्रिटिशांकडून प्रतिमास ५५० रुपये भत्ता मिळत होता. कारागृहात असलेल्या सर्व बंदीवानांना कायद्यानुसार भत्ता मिळत होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅरिस्टर म्हणून लाखो रुपये कमवले असते; मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यांची तुम्ही अशी अपकीर्ती करता ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अशी अपकीर्ती करत असाल, तर ते किती सहन करावे ? मग ज्यांनी एका बाईच्या नादाला लागून देशाचा विश्‍वासघात केला, त्यांची पापेही बाहेर काढायला हवीत.

१९. गुगल भाषांतर करून अर्थ काढणारे राहुल गांधी मूर्ख !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्रातील अन्य लिखाण न वाचता केवळ २ ओळींचे ‘मै आपका नौकर बनना चाहता हूँ ।’ असे गुगल भाषांतर करून अर्थ काढणारी व्यक्ती निश्‍चितच मूर्ख आहे’, असेच म्हणावे लागेल. यापूर्वी गांधी हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी राहुल गांधी यांनी भिंवडी येथील न्यायालयात क्षमा मागितली आहे. वर्ष २०१७ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या अवमानकारक वक्तव्याविषयी मी राहुल गांधी यांना भोईवाडा पोलीस ठाण्यात उभे करणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयीही राहुल गांधी यांना क्षमा मागावी लागेल.

(समाप्त)