सावधान ! २०४७ मध्ये ‘दार-उल-इस्लाम’ !

महंमद जलालुद्दीन आणि अथर परवेझ

मूळचे पाकिस्तानी असलेले आणि कॅनडामध्ये वास्तव्य करणारे प्रसिद्ध पत्रकार अन् लेखक तारेक फतेह असोत किंवा ‘राजकीय इस्लाम’चा अभ्यास करणारी अन्य तज्ञ मंडळी यांच्याकडून उच्चारले जाणारे ‘गझवा-ए-हिंद’ हे शब्द वारंवार आपल्या कानावर येत असतात. ‘मुसलमानेतरांचा वंशविच्छेद करून संपूर्ण हिंदुस्थानाला इस्लाममय करू’, असा या इस्लामी संकल्पनेचा सरळ अर्थ ! हे नमूद करण्यामागील कारण की, बिहारमध्ये १४ जुलै या दिवशी महंमद जलालुद्दीन आणि अथर परवेझ या धर्मांध मुसलमानांनी ‘वर्ष २०४७ मध्ये भारताला इस्लामी राष्ट्र बनवू’, असे ध्येय ठेवले असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर त्यांचा हा डाव साध्य करण्यासाठीचा ८ पानी कृती कार्यक्रमही पोलिसांच्या हाती लागला आहे. यामध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (‘पी.एफ्.आय.’ने) ‘केवळ १० टक्के मुसलमान जरी तिच्यामागे उभे राहिले, तरी घाबरट बहुसंख्य समाजाला वश करून (इस्लामचे) पुनर्वैभव प्राप्त करू शकू’, असे म्हटल्याचेही आढळले. जलालुद्दीन हा बिहार पोलिसांतील माजी अधिकारी, तर परवेझ हा बंदी घातलेल्या ‘सिमी’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य ! दोघेही ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘एस्.डी.पी.आय.’ या आतंकवादी संघटनांचे सदस्यही आहेत. हे दोघे ‘मार्शल आर्ट्स’च्या नावाखाली विविध राज्यांतील मुसलमानांना तलवारी आणि चाकू चालवण्याचे प्रशिक्षणही देत होते. ‘हिंदूंच्या देशात त्यांच्या जिवावर बेतलेला हा जिहाद आता कुठपर्यंत जाऊन ठेपला आहे’, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे का ?

एरव्ही बजरंग दलाने हिंदु तरुण-तरुणींना स्वसंरक्षणार्थ तलवार आदी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले, तर पोटदुखी होणारी पुरो(अधो)गामी मंडळी आता कुठे जाऊन लपली आहेत ? हिंदुत्वनिष्ठांच्या ‘घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्राची स्थापना करू’, अशी घोषणा झाल्यावर बेंबीच्या देठापासून ओरडणारे धर्मनिरपेक्षतावादी आता कुठे आहेत ? कि त्यांना इस्लामी राष्ट्र चालणार आहे ? हा प्रकार म्हणजे बेगडी धर्मनिरपेक्षता आणि हिंदुविघातक दुटप्पीपणा यांचे उदाहरण होय !

हिमनगाचे टोक !

उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्याकांडाचे अन्वेषण करणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला धक्कादायक माहिती मिळाली असून दोघे मारेकरी हे पाकिस्तानमधील आतंकवादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’च्या १८ आतंकवाद्यांच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले होते. या १८ जणांशी ‘भारतातील २५ राज्यांतील ३०० लोकही संपर्कात आहेत’, अशी माहितीही गुप्तचर विभागाच्या हाती लागली. या माध्यमातून नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍यांना हेरण्यात आले असून त्यांचाही शिरच्छेद करण्यात येईल, असे नियोजन आहे. ‘दावत-ए-इस्लामी’कडून या सर्वांना ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देतांना शिरच्छेद करण्यापासून ‘उदयपूर स्टाईल’मध्ये त्याचा व्हिडिओ बनवण्यास शिकवले आहे. यामुळे सर्व २५ राज्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. एरव्ही भारतात घडणार्‍या आतंकवादी कारवायांमधून देशभरात असंख्य ‘स्लिपर सेल्स’ कार्यरत असून ते आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याचे समोर येत असते. यातून आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍या धर्मांध मुसलमानांची संख्या काही न्यून नाही, हेच लक्षात येते. एकूण पहाता हिंदूंची ‘पुण्य’ आणि ‘पितृ’ भूमी आता खरंच ‘गझवा-ए-हिंद’च्या दिशेने वाटचाल करत आहे. ही सर्व उदाहरणे हिमनगाचे केवळ एक टोक आहे.

भारताचा ‘लेबेनॉन’ होणार का ?

लेबेनॉन हा एकेकाळी मध्यपूर्वेतील एकमेव ख्रिस्ती प्रजासत्ताक होता. चहूबाजूंनी इस्लामी राष्ट्रांनी वेढलेला, ख्रिस्ती बहुसंख्य असणारा आणि मध्यपूर्वेचा ‘स्वित्झर्लंड’ समजला जाणारा लेबेनॉन आज मुसलमान राष्ट्र बनले आहे. त्याच्या उदाहरणातून भारतीय हिंदूंना पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. १९५० च्या दशकात सोनेरी दिवस पहाणार्‍या लेबेनॉनचे एकाएकी स्वरूपच पालटले. १९६०-७० च्या दशकात तेथे झालेल्या यादवी युद्धामुळे हे ख्रिस्तीबहुल राष्ट्र मुसलमान म्हणजेच शरीयतवर चालणारे राष्ट्र झाले. अरबी मूल्यांचे समर्थन करणारा पॅलेस्टिनी समाज आणि सीरियातून आलेले लाखो शरणार्थी यांमुळे तेथील ख्रिस्ती लोकांचे जीवन हैराण झाले. वर्ष १९२० मध्ये तब्बल ७५ टक्के असलेले ख्रिस्ती यादवी युद्धाच्या वेळी अल्प झाले आणि मुसलमानांनी तेथे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. लेबेनीज ख्रिस्ती समुदायाने कधी स्वप्नही पाहिले नसेल की, त्यांना त्यांचा देश सोडून जावे लागेल. त्यातील काही जण आज मायदेशी परतले असले, तरी लेबेनॉनचा चेहरामोहरा पालटला आहे.

भारतात याहून वेगळी कोणती परिस्थिती आहे ? आज भारत कोट्यवधी बांगलादेशी घुसखोरांना सहन करत आहे. त्यांच्यापैकी अनेकांना मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. आतंकवादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षांचा काळ पाहिल्यास भविष्याच्या उदरात भारतासाठी आणि पर्यायाने हिंदूंसाठी काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना करता येईल. हिंदूंच्या हितामध्ये काहीही केले, तरी संपूर्ण देशात हिंसात्मक कारवाया होतात. नागरिकत्व सुधारणा कायदा हे त्याचे सध्याचे उदाहरण ! समान नागरी कायदा आल्यास काय होईल, याचा स्वप्नातील अनुभवही कल्पनातीत आहे. नूपुर शर्मा प्रकरणावरून घडलेल्या दंगली आणि त्यानंतर झालेल्या हत्या यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अशात लोकशाहीचे स्तंभही आक्रमणकर्त्यांना पाठीशी घालू लागल्याने बहुसंख्य हिंदूंच्या देशात तो पोरका झाला आहे. त्यात भारताला वर्ष २०४७ मध्ये इस्लाममय करणारी कारस्थाने घडत असतांना भारताने या विरोधात काही केले नाही, तर ‘दार-उल-हरब’ (जेथे इस्लामचे राज्य नाही, ते) असलेले हिंदुस्थान ‘दार-उल-इस्लाम’ (इस्लामचे राज्य असलेली भूमी) व्हायला वेळ लागणार नाही ! हिंदूंनो, जागे व्हा अन्यथा ‘दुसरे लेबेनॉन’ पहायला सिद्ध रहा !

हिंदूंनो, भारताचे ‘दार-उल-इस्लाम’ होऊ द्यायचे नसेल, तर संघटित व्हा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !