वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजिलेल्या काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दर्शवणाऱ्या ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘द बनारस बार असोसिएशन’च्या सभागृहामध्ये करण्यात आले आयोजन

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दर्शवणाऱ्या ‘फॅक्ट’ प्रदर्शनला उपस्तिथ अधिवक्ता

वाराणसी (उत्तरप्रदेश) – १९ जानेवारी १९९० या दिवशी या दिवशी स्वतंत्र भारतात पाकिस्तान पुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांकडून सहस्रो काश्मिरी हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या आणि सहस्रो महिलांवर बलात्कार करण्यात आले. या घटनेला आता ३२ वर्षे होत आले आहेत; परंतु विस्थापित हिंदूंचे अद्याप पुनर्वसन झालेले नसून ते न्यायापासून वंचित आहेत. या नरसंहाराची भीषण वास्तविकता दाखवणारे प्रदर्शन येथील ‘द बनारस बार असोसिएशन’च्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘द बनारस बार असोसिएशन’चे महामंत्री अधिवक्ता रत्नेश्वर कुमार पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाचा लाभ अनेक अधिवक्त्यांनी घेतला.

या वेळी ‘काश्मिरी हिंदूंचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये ‘पनून कश्मीर’ नावाने स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करावा’, या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. ‘द बनारस बार असोसिएशन’चे अध्यक्ष अधिवक्ता धीरेंद्रनाथ शर्मा म्हणाले, ‘‘या प्रदर्शनाने अधिवक्ता आणि सामान्य लोक यांना जागृत करण्याचे काम केले आहे. हे प्रदर्शन पाहून असे वाटते की, काश्मीरमध्ये जे क्रौर्य झाले, ते फारच हृदयद्रावक आणि चुकीचे आहे.’’

२. अधिवक्ता रत्नेश्वरकुमार पांडे म्हणाले, ‘‘या प्रदर्शनातून समजते की, वर्ष १९९० मध्ये जिहाद्यांनी भयंकर क्रौर्य दाखवले होते. अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमीच आयोजित करत रहावे.’’