सद्गुरु सत्यवान कदम यांची कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि ‘सद्गुरु दादांच्या रूपात परात्पर गुरु डॉक्टरच सेवाकेंद्रात आहेत’, याची येत असलेली अनुभूती

सद्गुरु सत्यवान कदम

१. नियमितपणा

‘रात्री उशिरापर्यंत सद्गुरु सत्यवानदादांचे सत्संग आणि सेवा चालू असते; पण ते प्रतिदिन सकाळी लवकर उठून प्राणायाम करतात. प्रतिदिन त्यांच्या खोलीतून ओंकार आणि प्राणायाम यांचा आवाज येतो.’

– सौ. अनुराधा पाटील आणि सौ. अर्चना घनवट

कु. नयन पांगम

२. वेळेचे पालन करणे

‘सद्गुरु दादा सेवाकेंद्रात प्रसाद आणि महाप्रसाद वेळेत घेतात. त्यांना सत्संगाला किंवा अन्य ठिकाणी जायचे असेल, तर ते त्या ठिकाणी नियोजित वेळेच्या आधी उपस्थित रहातात.’

– कु. नयन गणेश पांगम (वय २० वर्षे)

३. साधकांना तत्परतेने साहाय्य करणे

‘रात्री किंवा कोणत्याही वेळी कुठल्याही साधकाला काही साहाय्य हवे असल्यास सद्गुरु दादा तत्परतेने साहाय्य करतात. एखाद्या साधकाला रात्रीच्या वेळेस आध्यात्मिक त्रास होत असेल, तर ते त्याला त्वरित आध्यात्मिक उपाय सांगतात.’

– श्री. विनीत पाटील, कु. नयन गणेश पांगम (वय २० वर्षे), सौ. प्रार्थना राजेंद्र परब, सौ. स्वानंदी संजोग साळसकर आणि सौ. अनुराधा पाटील

सौ. स्वानंदी साळसकर

४. चुकांसाठी प्रायश्चित्त घेणे

‘सद्गुरु दादा अनेक दिवसांसाठी प्रायश्चित्त घेतात. कित्येक मास ते सकाळचा किंवा सायंकाळचा प्रसाद घेत नाहीत.’

– कुडाळ सेवाकेंद्रातील सर्व साधक

५. सद्गुरु सत्यवानदादांच्या सेवाकेंद्रातील अस्तित्वाचे महत्त्व !

‘सद्गुरु दादा काही दिवसांसाठी सेवाकेंद्रातून बाहेर गेल्यावर सेवाकेंद्रातील साधकांपैकी कुणाला ना कुणाला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास चालू होतात. त्यामुळे ‘सद्गुरु दादांचे सेवाकेंद्रातील अस्तित्व किती महत्त्वाचे  आहे ?’, हे आमच्या लक्षात आले.’

– श्री. सुरेंद्र चाळके आणि सौ. अनुराधा पाटील

६. ‘सद्गुरु सत्यवानदादांच्या रूपात परात्पर  गुरु डॉक्टरच सेवाकेंद्रात आहेत’, असे वाटणे

‘सद्गुरु दादांचे बोलणे, चालणे आणि त्यांचे राहणीमान यांतून परात्पर गुरु डॉक्टरांचाच भास होतो. सेवाकेंद्रातील साधक आणि बालसाधक यांनाही ‘सद्गुरु दादांच्या रूपातून परात्पर गुरु डॉक्टर इथे आहेत’, असे वाटते.’

– सेवाकेंद्रातील सर्व साधक

सद्गुरु सत्यवान कदम यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन 

१. साधकांच्या मनात आळसाचे विचार आल्यास त्यांनी लगेच आवरण काढावे.

२. इतरांनी आपली चूक सांगितल्यावर भावनाशील न होता आपल्याला चुकीची खंत वाटली पाहिजे आणि चूक सांगितल्याबद्दल आपण त्या साधकाचे आभार मानले पाहिजेत.

३. संघर्षानंतर समर्पण आहे. संघर्षानंतर ते आपोआप होते. संघर्षातूनच शिकायला मिळते. सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्यास ताण न्यून होतो.

४. सेवा करतांना कार्यपद्धत घातली की, समस्या सुटतात. परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा केल्यास आवरण न्यून होऊन चैतन्य मिळते. त्यामुळे आनंद आणि समाधान मिळते.

(सर्व सूत्रांचा दिनांक १०.३.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक