म. गांधी यांच्याविरोधात अपशब्द बोलण्याविषयी मला पश्‍चाताप नाही ! – कालीचरण महाराज

कालीचरण महाराज

मुंबई – म. गांधी यांना अपशब्द बोलल्याच्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याविषयी मला कोणताही पश्‍चाताप नाही. माझ्या मनात गांधी यांच्याविषयी तिरस्कार आहे. मी पंडित नथुराम गोडसे यांना कोटी कोटी नमस्कार करतो. त्यांच्या चरणांमध्ये माझा साष्टांग प्रणाम आहे, अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांनी दिली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील धर्मसंसदेत गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधाने केल्यावरून कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यावर त्यांनी एका व्हिडिओद्वारे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या रायपूर पोलीस कालीचरण महाराज यांचा शोध घेत आहेत.

व्हिडिओमध्ये कालीचरण महाराज पुढे म्हणाले की,

१. म. गांधी यांच्यामुळेच सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, तर आज भारत अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती बनू शकला असता. गांधी यांनी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी थांबवली नाही.

२. कुणीही राष्ट्रपिता होऊ शकत नाही. राष्ट्रपिता बनवायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, सरदार पटेल यांच्यासारखे लोक बनवले पाहिजेत ज्यांनी राष्ट्रकुल एकत्र करण्याचे काम केले.

३. मला सत्य बोलल्यामुळे फाशीची शिक्षा दिली गेली, तरी मी मृत्यू स्वीकारतो. छत्रपती शिवाजी महाराज धर्माच्या रक्षणासाठी प्राण हातात घेऊन लढले, तर माझ्यासारखा क्षुद्र प्राणी जगून काय करणार, माझ्यासारखे कोट्यवी कालीचरण मरायला सिद्ध आहेत.

(म्हणे) ‘अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून काढा !’ – जितेंद्र आव्हाड

गांधीवादाचा पुरस्कार करण्याचा आव आणायचा; मात्र ‘ठेचून’ काढण्याची भाषा करायची, यातून आव्हाड यांचे खरे स्वरूप लक्षात येते ! अशी भाषा करणार्‍यांवर प्रथम गुन्हा नोंद करा ! भारतात जिहाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठांना ठार मारले जात असतांना आव्हाड कधी पोटतिडकीने बोलतात का ? हा आव्हाड यांचा दुटप्पीपणा होय ! – संपादक

मुंबई – ‘हा कालीचरण बाबा (कालीचरण महाराज) मूळचा अकोल्याचा आहे. कधी आरक्षण, कधी मुसलमानविरोध, तर कधी महिला अधिकार यांच्या विरोधात तो गरळ ओकत असतो आणि ऐकणार्‍यांच्या मनात विष पसरवण्याचे काम करतो. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून काढा. हा सनातनी आहे. तो निवडणुकीला उभा राहिला होता. त्या वेळी २४७ मते मिळाली होती’, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

कालीचरण महाराज यांनी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत गांधीजी यांच्याविषयी अपशब्द बोलण्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या नेत्यांमध्ये खडाजंगी चालू आहे.