(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि संघ एखाद्या मोठ्या हिंदु नेत्याची हत्या घडवून आणतील !’

शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा दावा !

शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने महत्त्व न दिल्याने टिकैत आता निराश झाले आहेत. त्यांचा संयम आता सुटू लागला आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचा दावा करू लागले आहेत, हेच यातून लक्षात येते ! – संपादक
शेतकरी नेते राकेश टिकैत

सिरसा (हरियाणा) – शेतकरी आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी हिंदू – शीख असो किंवा हिंदू – मुसलमान असो यांना एकमेकांत भिडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि रा.स्व. संघ यांचे लोक एखाद्या मोठ्या हिंदु नेत्याची हत्या घडवून आणतील. त्यानंतर हिंदू आणि मुसलमान अशा भेदभावाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील, असा दावा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी येथे केला. २ दिवसांपूर्वी हरियाणातील करनाल येथे शेतकर्‍यांवर लाठीमार करणार्‍या पोलिसांवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत शेतकर्‍यांचे आंदोलन चालू रहाणार !

टिकैत पुढे म्हणाले की, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आधीपासूनच शेतकर्‍यांचे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हापर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तेव्हापर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. शेतकरी आंदोलनाचे केंद्र देहलीऐवजी हरियाणात वळवावे, असा मुख्यमंत्री खट्टर यांचा प्रयत्न चालू आहे; परंतु आम्ही केंद्र सरकारशी लढण्यास सज्ज आहोत.