खलिस्तानी वळवळ ठेचा !

ऑपरेशन ब्लू स्टार’ला ३७ वर्षे झाल्याच्या निमित्ताने अमृतसर येथील शिखांच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात शिखांसाठी स्वतंत्र खलिस्तान देशाची मागणी करणार्‍या काही फुटीरतावादी शिखांनी घोषणाबाजी केली, तसेच तलवारी नाचवण्यात आल्या. गेली अनेक वर्षे असे कार्यक्रम अशा शिखांकडून केले जात आहेत. त्याला पंजाबमधील बहुसंख्य शिखांकडून प्रतिसाद मिळत नसला, तरी ‘ही कीड वळवळ करत आहे’, हे मात्र जगाला दिसत रहाते. खलिस्तानी आतंकवादीही पुन्हा कारवाया करण्याच्या प्रयत्नात आहेत, हे मागील काही घटनांतून निदर्शनास आले आहे. पाककडून त्यांना ड्रोनच्या साहाय्याने पाठवलेली शस्त्रे सैन्याने आणि पोलिसांनी पकडल्याने त्यांच्या कडून होणार्‍या घातपाताची माहिती मिळाली. गेल्या २-३ वर्षांत हिंदु संघटना आणि पक्ष यांच्या नेत्यांच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामागे खलिस्तानी असल्याचे उघड झाले आहे. खलिस्तानी हे हिंदूंना आजही लक्ष्य करत आहेत. त्यामुळे अशा खलिस्तान्यांची जी काही वळवळ शेष आहे, ती ठेचण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत कुठलीही गोष्ट मुळासकट नष्ट होत नाही, तोपर्यंत ती पुन्हा मोठी होण्याची शक्यता कायम रहाते. धर्मांधांविषयीही असे म्हणता येईल.

भारताची फाळणी धर्माच्या आधारे करण्यात आली. ‘भारतातील सर्व मुसलमान पाकमध्ये जातील आणि पाकमधील सर्व हिंदू भारतात येतील’, असे ठरले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्याचे समर्थन केले होते; मात्र काँग्रेस, तसेच गांधी आणि नेहरू यांच्या भारतघातकी मुसलमानप्रेमापोटी मुसलमानांना येथेच रहाण्याची सवलत दिली गेली. गेली ७ दशके भारत आणि भारतातील हिंदू त्याची फळे भोगत आहेत. भारतातील जिहादी आतंकवाद त्यामुळेच वाढला आहे. या उदाहरणातून कीड मुळासकट नष्ट होणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते. भारताची फाळणी झाली आणि मुसलमानांसाठी स्वतंत्र ‘पाकिस्तान’ नावाचा नवीन देश निर्माण झाला. त्या वेळी पंजाब हा मोठा प्रदेश होता. फाळणीमुळे काही भाग भारतात, तर काही भाग पाकिस्तानमध्ये गेला. देशाची फाळणी होतांना पंजाबची फाळणी झाली, याचे मोठे दुःख शिखांना झाले. त्यातून भारताच्या फाळणीच्या वेळीच ‘शिखांसाठी स्वतंत्र देश असावा’, अशी मागणी करण्यात येऊ लागली होती; मात्र त्याला फारसा जोर नसल्याने आणि मागणी करणारे शीख त्या वेळी उपद्रवी नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुढे काही वर्षे अशी मागणी अधूनमधून केली जात होती. त्याला शिखांकडूनही विशेष महत्त्व दिले जात नव्हते. याच काळात भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बहुसंख्य असणार्‍या शिखांसाठी ‘पंजाब’ म्हणून राज्य निर्माण झाले. तरीही स्वतंत्र खलिस्तानसाठी ७० च्या दशकाच्या शेवटी आणि ८० च्या दशकाच्या प्रारंभी याला जोर चढला. शिखांच्या ५ प्रमुख अकाल तख्तांपैकी एक असणार्‍या ‘दमदमी टकसाल’चे धर्मगुरु जर्नेल भिंद्रनवाले यांच्यामुळे खलिस्तानची मागणी पुन्हा मोठ्या शक्तीने जोर धरू लागली. पुढचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. पाकच्या साहाय्याने हे आंदोलन सशस्त्र झाल्यावर भारतीय सैन्याने ६ जून १९८४ या दिवशी सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ नावाने कारवाई केली आणि भिंद्रनवाले यांच्यासह शेकडो खलिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. याचा सूड म्हणून नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी आणि निवृत्त जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्या झाल्या. तसेच पुढील काही वर्षे पंजाबमध्ये हिंदूंना लक्ष्य करून त्यांचे सामूहिक हत्याकांड घडवण्यात आले. नंतर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ही हिंसक चळवळ मोडून काढण्यात आली. असे असले तरी त्यांची वळवळ अद्यापही चालूच आहे. विदेशातून विशेषतः कॅनडा आणि लंडन येथून या चळवळीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यात पाकचाही वाटा आहे.

शिखांनी हिंदु राष्ट्रासाठी योगदान द्यावे !

शीख मूळचे हिंदूच आहेत. त्यांना अन्य आक्रमक धर्मियांनी अत्याचार करून बाटवलेले नाही. शीख धर्माला स्वतंत्र धर्म म्हटले जात असले, तरी तो हिंदु धर्मामधीलच एक पंथ असल्याचे अनेक जण मानतात. त्यांना हिंदूंकडून तितकाच सन्मान दिला जातो. भारतातील प्रत्येक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. शिखांनी कधीही खलिस्तानला मोठ्या प्रमाणात समर्थन दिलेले नाही. जे काही मूठभर खलिस्तानी आता वळवळ करत आहेत, त्यांचा या राष्ट्रप्रेमी शिखांनी उघडपणे विरोध करण्याची आवश्यकता आहे. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मुळे काही शीख अप्रसन्न झाले, तरी ते भारतद्वेषी झालेले नाहीत, हे गेल्या ३७ वर्षांत दिसून आले आहे. त्यामुळेच भारतात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेला हिंसाचार वगळता शिखांवर कधीही कुणी आक्रमण केलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. तरीही जे भारतविरोधी मागणी करत आहेत, त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ‘जनतेकडून विशेष समर्थन नसल्याने अशांवर कारवाई केली, तर त्यांना सहानुभूती मिळेल’, असे सरकारला वाटत असले, तरी अशा मानसिकतेच्या लोकांचे विचार अधिक काळ समाजात ठेवणेही योग्य ठरणार नाही. त्यामुळे असे विचार पसरवणारे देश-विदेशात कुठेही असोत, त्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी कृती करण्याची आवश्यकता आहे. या खलिस्तान्यांना पाकचे समर्थन आहे, हे जगजाहीर आहे. देशातील फुटीरतावादाच्या मागे पाकिस्तान असल्याने पाक नावाचे प्रकरण भारताने कायमस्वरूपी सोडवले, तर देशाचे अनेक प्रश्न कायमचे सुटतील. त्यामुळे खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्याच्या वेळी पाकवरही कारवाई करणे आवश्यक आहे. पाकला संपवून पुन्हा अखंड भारत निर्माण झाला, तर भारताच्या फाळणीमध्ये झालेली पंजाबची फाळणीही रहित होऊन एकसंघ पंजाब पुन्हा निर्माण होईल. तसेच पंजाबमध्ये अल्पसंख्यांक असणार्‍या हिंदूंचेही रक्षण हिंदु राष्ट्रामुळे होईल. हिंदु राष्ट्रासाठी राष्ट्रप्रेमी शीख कदापि विरोध करणार नाहीत; कारण ‘हिंदु राष्ट्रात आमचे काय होणार ?’, असा प्रश्न काहीजणांकडून उपस्थित केला जातो, तसा प्रश्न शीख कधीही विचारत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाले, तर विदेशातून खलिस्तानी कारवाया करणार्‍यांनाही वचक बसवण्यास सोपे जाईल. हिंदु राष्ट्रामुळे अनेक समस्या सोडवता येणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता हिंदूंसह राष्ट्रभक्त शिखांनीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्यावे !