Hindu Janjagruti Samiti : ‘रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत !’, पाकिस्तानशी होणारे क्रिकेट सामने त्वरित रहित करा !

#Boycott_INDvsPAK

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीची भारत सरकारकडे आंदोलनाद्वारे मागणी

पुणे, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी होणार्‍या ‘आयसीसी टी २० वर्ल्ड कप’मध्ये भारताशी खेळण्याची सिद्धता दर्शवली असली, तरी भारताने या प्रस्तावात अडकू नये. ‘रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत’, जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, अशी ठाम भूमिका भारत सरकारने घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आंदोलनात केली.

हे आंदोलन राजाराम पूल, सिंहगड रस्ता येथे १३ फेब्रुवारी या दिवशी झाले. या आंदोलनाला अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

या आंदोलनात सनदी लेखापाल आणि अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे, भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. उज्ज्वला गौड, हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या (सौ.) मुग्धा बिवलकर, समितीचे श्री. पराग गोखले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले आदी मान्यवर उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

या वेळी उपस्थित मान्यवरांनी पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका केली आणि भारताच्या स्वाभिमानासाठी हे क्रिकेट सामने रहित करणे कसे अनिवार्य आहे, यावर मार्गदर्शन केले, तसेच ‘केवळ या वेळीच नाही, तर येथून पुढे कधीही भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे सामने खेळू नयेत’, अशी मागणी या वेळी श्री. सचिन घुले यांनी केली.

‘केवळ मैदानावरील हस्तांदोलन टाळून निषेध करणे पुरेसे नसून पाकिस्तानसमवेतचे क्रिकेट सामनेच रहित व्हायला हवेत. सैनिकांचे रक्त सांडत असतांना क्रिकेट खेळणे, हा त्यांचा घोर अपमान आहे’, अशा शब्दांत समितीने सरकारला आवाहन केले.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानकडून आतंकवादी आक्रमणे होत असतांना अशी मागणी का करावी लागते ? जे राष्ट्रप्रेमी नागरिकांना कळते, ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला का कळत नाही ?