SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बांगलादेशात एका वर्षात हिंदूंवर २ सहस्र ४४७ आक्रमणे !

‘सनातन प्रभात’ने घेतला वर्षभराचा आढावा : 

बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून झाले १ वर्ष !

मुसलमानांनी १५७ मंदिरे पाडली ४७ हिंदूंची हत्या, ३२ हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार

५२ हिंदु शिक्षक नोकरीतून बलपूर्वक बडतर्फ  १०० हून अधिक हिंदु पोलिसांनाही नोकरीवरून काढले

नवी देहली : बांगलादेशात तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात केलेल्या पलायनाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात तेथील हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या काळात झालेल्या हिंदूंच्या नरसंहारानंतर आता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. ‘सनातन प्रभात’ने गेल्या वर्षभराचा आढावा घेतला असता भयावह आकडेवारी समोर आली. ढाका येथील ‘रिसर्च अँड एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष प्रा. चंदन सरकार यांनी यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, ८ ऑगस्टला महंमद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी आल्यापासून ३५० दिवसांत हिंदूंवर २ सहस्र ४४७ आक्रमणे करण्यात आली. यासमवेत १५७ मंदिरांना पाडण्यात आले, ४७ हिंदूंची हत्या, ३२ हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार, तर ५२ हिंदु शिक्षकांना नोकरीतून बलपूर्वक बडतर्फ करण्यात आले. तसेच १०० हून अधिक हिंदु पोलिसांनाही नोकरीवरून काढण्यात आले. ‘सनातन प्रभात’ने गेल्या वर्षभरात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या किमान १५० बातम्या अथवा लेख प्रकाशित केले. याचा अर्थ प्रत्येक आठवड्याला ३ बातम्या प्रकाशित करण्यात आल्या.

बांगलादेशकडून अटक करण्यात आलेले इस्कॉनचे चिन्‍मय कृष्‍ण दास प्रभु

प्रा. सरकार यांनी सांगितले की, इस्कॉनचे चिन्मय दास प्रभु यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी ‘बंगभूमी’ची मागणी केल्यानेच त्यांच्यावर कारवाई झाली. अजूनही ते कारागृहात आहेत. येथील ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’, ‘जमात-ए-इस्लामी’, बांगलादेशी सैन्य, अंतरिम सरकार, पोलीस आदींनी संगनमताने हिंदूंवर आक्रमणे केली आहेत. शेख हसीना यांचा ‘अवामी लीग’ पक्षही काही हिंदु समर्थक नाही, तर कट्टर इस्लामवादी आहे.

शेख हसीना या कट्टर मुसलमान – ना त्यांनी हिंदूंचे रक्षण केले, ना त्या भारताच्या समर्थक होत्या !

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशातील एका हिंदुत्वनिष्ठाने नाव न प्रसारित करण्याच्या अटीवर ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, भारताने बांगलादेशासाठी पुष्कळ केले; परंतु बांगलादेशाने भारतासाठी काहीएक केले नाही. एवढेच नाही, तर स्वतंत्र बांगलादेशातील सर्व नेत्यांनी आम्हा हिंदूंना धोकाच दिला. शेख हसीना ना भारतसमर्थक आहेत, ना त्यांनी कधी हिंदूंचे रक्षण केले आहे. त्या कट्टर मुसलमान आहेत. वर्ष २००९-१० मध्ये भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशी सैन्याने भारताच्या ५ सैनिकांना ठार मारले होते. यावरून पंतप्रधान शेख हसीना यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांची क्षमा मागितली होती. प्रत्यक्षात मात्र त्या ५ सैनिकांचा बांगलादेशात जाहीर सत्कार करण्यात आला. हे उघड सत्य आहे. ‘प्रथम आलो’सारख्या प्रथितयश वृत्तपत्रांमध्ये याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.

बांगलादेश हा हिंदूंसाठी ‘कत्तलखाना’ !

हिंदुत्वनिष्ठाने पुढे सांगितले की, शेख हसीना यांनी त्यांच्या कार्यकाळात ५६० मशिदी बांधल्या; परंतु हिंदूंसाठी एकही मंदिर उभारले नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश हा हिंदूंसाठी ‘कत्तलखाना’च बनला.

बांगलादेशातच स्वतंत्र ‘बंगभूमी’च्या (हिंदु राज्याज्या) स्थापनेसाठी भारताने पुढाकार घ्यावा ! – बांगलादेशातील हिंदूंची मागणी

‘सनातन प्रभात’ने बांगलादेशातील विविध क्षेत्रांतील हिंदूंशी चर्चा केली असता, सर्वांनी हिंदूंच्या रक्षणासाठी ‘स्वतंत्र बंगभूमीची (हिंदु राज्याची) स्थापना करणे’, हा एकच उपाय असल्याचे सांगितला. हिंदू म्हणाले की, बांगलादेशातील सव्वादोन कोटी हिंदूंना भारतात आश्रय देणे, हे व्यावहारिकदृष्ट्या कठीण आहे. यापेक्षा बांगलादेशातच हिंदूंसाठी स्वतंत्र भूमी स्थापन करून त्यामध्ये त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. या भूमीचे स्वामित्व भारत सरकारने स्वत:कडे घेतले पाहिजे. यासाठी भारताने बांगलादेशातील अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करणे आवश्यक आहे. भारतातील ‘चिकन नेक’जवळ असलेल्या उत्तर बांगलादेशातील ‘ठाकूरगाव-दिनाजपूर-रंगपूर जिल्ह्यांचा पट्टा’ अथवा दक्षिण-पूर्व बांगलादेशातील ‘चितगांव-कोमिला क्षेत्र’ हा भाग हिंदूंच्या स्वतंत्र राज्यासाठी निवडण्यात यावा.

संपादकीय भूमिका

हे समस्त हिंदूंना लज्जास्पद ! भारतभरातील हिंदूंनी बांगलादेशातील त्यांच्या बांधवांसाठी आता तरी आवाज उठवला पाहिजे. यासाठी त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील आमदार आणि खासदार यांच्यावर दबाव आणून बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ ठोस उपाय योजण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे !