इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्‍या ९ स्थानिक गुंडांना अटक !

नाशिक – इगतपुरीजवळ भावली धरण येथे पर्यटनासाठी एका कुटुंबातील ८ सदस्य गेले होते. तिथे आलेल्या ८ ते १० जणांच्या गुंड टोळक्याने त्या कुटुंबातील महिलेची छेड काढत काही टिपण्या केल्या. त्यानंतर तिने, तसेच तिचा पती आणि दीर यांनी त्या टोळक्याला जाब विचारला. त्यावरून वाद चालू होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे ते कुटुंब तेथून गाडीत बसून नाशिकच्या दिशेने निघू लागले, तेव्हा या टोळक्याने त्यांचा पाठलाग चालू केला आणि त्यांच्या गाडीवर स्टंप, बॅट आदींनी आक्रमण करून गाडीची हानी करण्याचा प्रयत्न केला. १५ ते ३० कि.मी. गाडीचा पाठलाग केला. एके ठिकाणी वाहतूककोंडीत गाडी अडकल्यावर त्या टोळक्याने तेथेही त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यातील एक जण गाडीला लटकल्याने त्यांना गाडीचा वेगही वाढवता येईना. या जीवघेण्या थरारानंतर त्या कुटुंबाने नाशिक गाठून पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी ९ आरोपींवर प्रथम दर्शनी अहवाल नोंद करून त्यांना कह्यात घेतले आहे.