Operation Sindoor : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ ! आतंकवाद्यांच्या ९ तळांवर एअरस्ट्राईक ! !

  • पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील पंजाब येथे आक्रमण

  • लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांचे तळ उध्वस्त

  • १०० हून अधिक आतंकवादी ठार झाल्याची शक्यता

  • वायूदलाने भारतीय सीमेत राहूनच केली कारवाई

नवी देहली – भारताने पहलगाम येथील जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य करून केलेल्या आक्रमणाचा सूड उगवला आहे. भारतीय सैन्याने ६ मेच्या रात्री १ वाजून ५ मिनिटे ते १ वाजून ३० मिनिटे या २५ मिनिटांत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील पंजाब येथे असलेल्या जिहादी आतंकवाद्यांच्या ९ तळांवर बाँबफेक करून ते नष्ट केले. यात १०० हून अधिक आतंकवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या एअर स्ट्राईकला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले होते, अशी माहिती भारतीय सैन्य, परराष्ट्र मंत्रालय आणि वायूदल यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशीआणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ही माहिती दिली. या वेळी आतंकवादी तळांची उपग्रहांद्वारे काढण्यात आलेली छायाचित्रे दाखवण्यात आली, तसेच प्रत्येक तळावर प्रशिक्षण घेतलेल्या आतंकवाद्यांनी यापूर्वी कुठे आक्रमणे केली होती ?, हीसुद्धा माहिती देण्यात आली. या कारवाईत पाक सैन्याच्या कोणत्याही तळावर आक्रमण करण्यात आले नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

भारताने एअरस्ट्राईक केलेल्या ९ ठिकाणांची माहिती

भारताने एअरस्ट्राईक केलेली ठिकाणे

१. बहावलपूर (पंजाब)

येथील मरकज सुभान अल्ला या जैश-ए-महंमदच्या मुख्यालयावर आक्रमण करण्यात आले. १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाचा कट येथेच रचण्यात आला होता आणि आतंकवाद्यांना येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते.

२. मुरिदके (पंजाब)

येथे मरकज तोयबा असून ते लष्कर-ए-तोयबाचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे. वर्ष २००० पासून ते कार्यरत आहे. अजमल कसाब आणि डेव्हिड कोलमन हेडली यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.

३. सरजाल, तेहरा कला (सियालकोट, पंजाब)

येथे जैश-ए-महंमदचे मुख्य लाँच पॅड (आतंकवाद्यांना एकत्र ठेवणे आणि भारतात पाठवणे) आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे तळ आहे. मार्च २०२५ मध्ये पोलीस कर्मचार्‍यांची हत्या करणार्‍या आतंकवाद्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.

४. भीमबर (पाकव्याप्त काश्मीर)

येथील बरनाला भागात मरकज अहले हदीस नावाने आतंकवाद्यांचे तळ आहे. हेही एक लाँच पॅड आहे.

५. कोटली (पाकव्याप्त काश्मीर)

मस्कर राहील शाहिद नावाने हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वांत जुना तळ आहे. त्याचा वापर शस्त्र आणि दारूगोळा ठेवण्यासाठी, तसेच आतंकवाद्यांना ठेवण्यासाठी केला जातो.

६. कोटली (पाकव्याप्त काश्मीर)

येथील सैन्य तळापासून २ कि.मी. अंतरावर मरकज अब्बास नावाने जैश-ए-महंमदचे तळ आहे.

८. सियालकोट (पंजाब)

येथे महमुना जोया नावाने हिजबुल मुजाहिद्दीनचे लाँच पॅड आहे. येथील कोटली भुट्टा शासकीय रुग्णालयाजवळ ते आहे. हे कठुआमधील आतंकवादाचे नियंत्रण केंद्र होते. पठाणकोट येथील आक्रमणाचा कट योजना येथेच रचण्यात आला होता.

८. मुजफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर)

येथे सवाई नाला भागात लष्कर-ए-तोयबाचा सर्वांत महत्त्वाचा तळ आहे. येथे आतंकवाद्यांची भरती, नोंदणी आणि प्रशिक्षण, अशी कृत्ये चालतात. वर्ष २००० पासून ते चालू आहे. सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम आक्रमणातील आतंकवाद्यांनी येथे प्रशिक्षण घेतले.

९. मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर)

सय्यदना बिलाल नावाचे लष्कर-ए-तोयबाचे लाँच पॅड आहे. येथून भारतात घुसखोरी केली जाते. येथे शस्त्रे, स्फोटके आणि जंगलात टिकून रहाण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

या ठिकाणी जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या ३ आतंकवादी संघटनांचे तळ होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने आतंकवादी असल्याची माहिती भारतीय सैन्याकडे होती. त्यानुसार सुनियोजित पद्धतीने केवळ याच ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या आक्रमणात कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला लक्ष्य करण्यात आले नाही.

प्रत्युत्तरादाखल पाककडून सीमेवर गोळीबार

भारताच्या कारवाईनंतर पाककडून प्रत्युत्तरादाखल राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर गोळीबार करण्यात आला. भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या गोळीबारात पाकच्या काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राफेलद्वारे ‘स्काल्प’ क्षेपणास्त्रांचा वापर !

राफेल विमान

या कारवाईसाठी भारताकडून राफेल विमानांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. या आक्रमणासाठी भेदक मारा करणार्‍या स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. ही क्षेपणास्त्र भूमीखाली असणारे बंकर नष्ट करण्यासाठी वापरली जातात. राफेल आणि अन्य लढाऊ विमानांनी भारतीय सीमेत राहूनही या तळांवर क्षेपणास्त्र डागल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या १० वर्षांत ६०० सैनिकांना वीरमरण !

गेल्या दशकभरात ३५० हून अधिक भारतीय नागरिक आतंकवादाचे बळी ठरले आहेत. यात ८०० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. या काळात देशाचे रक्षण करताना ६०० हून अधिक सैनिकांनी प्राण गमावले आहेत, तर १ सहस्र ४०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी घायाळ झाले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अजित डोवल यांनी आक्रमणाची अन्य देशांना दिली माहिती

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आक्रमणानंतर इतर देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी संपर्क साधला आणि त्यांना या आक्रमणाची माहिती दिली. यात अमेरिकेचे मार्को रुबियो, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे.

कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का?

या सैन्य कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आले. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात इस्लामी आतंकवाद्यांनी हिंदु विवाहितांच्या केवळ पतींना लक्ष्य करून त्यांना ठार मारले होते. त्यांचे सौभाग्य नष्ट केले होते. त्याचेच प्रतीक म्हणून ऑपरेशन सिंदूर (कुंकू) नाव ठेवण्यात आले, असे सांगितले जात आहे.

इस्लामाबादमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद !

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा अन् महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. तथापि पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, सर्व नियोजित परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील. या घटनेचा दैनंदिन व्यवहारावर काहीही परिणाम होणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूड उगवला ! – विनय नरवाल यांच्या आईची प्रतिक्रिया

विनय नरवाल यांच्या आई आशा नरवाल

एअर स्ट्राईक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवादी आक्रमणाचा सूड उगवला आहे. माझा, माझ्या कुटुंबाचा आणि भारताच्या संपूर्ण जनतेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. सैनिकांना हेच सांगेन सज्ज होऊन असेच पुढे जा आणि असाच सूड उगवा. आपल्या लोकांवर आक्रमण करण्याचे कुणाचेही धाडस व्हायला नको. पहलगामच्या आक्रमणात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना आज न्याय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया पहलगाम येथील आक्रमणात ठार झालेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या आई आशा नरवाल यांनी व्यक्त केली म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास सार्थ ठरवला ! – शुभम द्विवेदी यांच्या पत्नीची भावना

शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. माझ्या पतीच्या (शुभम द्विवेदी यांच्या) मृत्यूचा सूड त्यांनी उगवला आहे. माझा आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला आहे. मी खरोखरच त्यांची ऋणी आहे. शुभम आज जिथे कुठे असेलल तिथे त्याच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल, अशी भावना शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने एअर स्ट्राईकनंतर व्यक्त केली.

मोहिमेचे नाव ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले ! – संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे

संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे

आतंकवाद्यांनी ज्या प्रकारे आमच्या महिलांचे कुंकू पुसून टाकले, त्या कृत्याला भारताने सडेतोड प्रत्युत्तर आहे. या मोहिमेच नाव (ऑपरेशन सिंदूर) ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले.

मी भारत सरकारचे मनापासून आभार मानते, असे पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात ठार झालेले संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी म्हटले आहे.

पाकमधील आतंकवादी व्यवस्था पूर्णपणे नष्ट करा ! – खासदार असदुद्दीन ओवैसी

पाकिस्तानमधल्या आतंकवादी तळावंर आपल्या सैन्याने केलेल्या आक्रमणाचे  मी स्वागत करतो. पाकिस्तानला अशी अद्दल घडवली गेली पाहिजे की, पुन्हा कधीही दुसरे पहलगाम होणार नाही. पाकिस्तानमधील आतंकवादी व्यवस्था पूर्णपणे नष्ट करावी, अशी एक्सवर पोस्ट खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.