बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी

कल्याण – शिक्षणाचा हक्क (आर्.टी.ई.) कायद्यांतर्गत शालेय प्रवेशासाठी बनावट उत्पन्नाचे दाखले देऊन प्रवेश मिळवल्याच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे ‘भटके विमुक्त मोर्चा’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. यासंदर्भात त्यांनी निवेदन सादर केले आहे.

प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य असतांनाही काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बनावट दाखले सिद्ध केल्याच्या तक्रारी समोर आल्याचे पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित महा-ई-सेवाकेंद्र चालकांवर कठोर कारवाई करून त्यांची नोंदणी रहित करावी, तसेच ‘बनावट उत्पन्नाच्या दाखल्यांच्या आधारे मिळालेले प्रवेश रहित करून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यावा’, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.