‘९.७.२०२४ या दिवशी मी श्रीमती अदिती देवलकाकूंच्या अंत्यसंस्कार विधीसाठी गेलो होतो. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2020/11/04212612/Aditi_Deval_320.jpg)
१. श्रीमती अदिती देवलकाकूंच्या जावयाने काकूंच्या चितेला अग्नी देताच चितेने पेट घेतला. त्या वेळी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, तरीही अग्नी चांगला प्रज्वलित झाला होता.
२. ‘त्यांच्या चितेतून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. मला शांत वाटत होते.
३. विशेष म्हणजे त्या स्मशानभूमीचे नुकतेच नूतनीकरण झाले होते. त्या ठिकाणी मला चांगली स्पंदने जाणवली.
४. मला वातावरणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे (गुरुदेवांचे) अस्तित्व जाणवत होते.
५. काही वेळाने त्या ठिकाणी दुसर्या एका व्यक्तीचा मृतदेह आणला गेला. त्या वेळी मला वातावरणात दाब जाणवत होता.
६. काकूंचे अंत्यविधी पूर्ण झाल्यावर मी तेथून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एकदा काकूंचे जवळून दर्शन घेण्यासाठी चितेजवळ गेलो. त्या वेळी मी तेथे पुष्कळ चैतन्यमय वातावरण अनुभवले. तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले, ‘जीव साधना करणारा असेल, तर त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही चांगले वाटते आणि गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने त्या जिवाला चांगली गती मिळते. त्या जिवाला उच्च लोकात स्थान प्राप्त होते.’
स्मशानभूमीतही मला अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अशोक रेणके (वय ६५ वर्षे), फोंडा, गोवा. (१५.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |