शक्तीतत्त्व जागृत करा !

नवरात्रोत्सव विशेष

‘या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थितः ।
नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमो नमः॥’

अर्थ : जी देवी सर्व जिवांमध्ये मातेच्या रूपात स्थित आहे, जी देवी सर्व शक्तींच्या रूपात स्थापित आहे, जी देवी सर्व ठिकाणी शांतीचे प्रतीक आहे, अशा देवीला नमस्कार !

नवरात्रोत्सवातील अपप्रकारांमुळे देवीतत्त्व जागृत करणार्‍या नवरात्रोत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. नवरात्रोत्सव, म्हणजे स्वतःतील दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे ! नवरात्रोत्सवातील गरबा, म्हणजे ‘देवीची सामूहिक नृत्योपासना’ ही त्यात शिरलेल्या अपप्रकारांमुळे विकृत झाली आहे. पूर्वी ‘गरबा’ नृत्याच्या वेळी देवीची पारंपरिक गीतेच म्हटली जात. सध्याचा ‘रिमिक्स’, पाश्चात्त्य संगीत, चित्रपटगीते यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करत गरब्याच्या नावाखाली खेळला जाणारा ‘डिस्को-दांडिया’ टाळण्यासाठी, उत्तेजक वेशभूषा आणि स्त्री-पुरुषांचे नृत्य आणि पर्यायाने या वेळी होणारा व्यभिचार टाळण्यासाठी देवीभक्त अन् हिंदुत्वनिष्ठ यांनी जागृत होऊन पुढाकार घ्यायला हवा. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण रोखून धर्म आणि संस्कृती यांची हानी थांबवणे, हे धर्मपालनच आहे. ते होण्यासाठी एकीचे बळ वाढवा. हे एकीचे बळ आणि धर्मपालनाची तळमळ क्षात्रवृत्ती जागृत करील.

‘गरबा खेळणे’, म्हणजे धर्मशास्त्रानुसार टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडाचे कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय ! नवरात्रीमध्ये कलेकलेने श्री दुर्गादेवीचे मारक तत्त्व जागृत होत असते. ब्रह्मा, विष्णु आणि महेश या ईश्वराच्या ३ प्रमुख कला आहेत. देवीचे मारक रूप या तीनही कलांच्या स्तरावर जागृत होण्यासाठी ३ वेळा टाळ्या वाजवून ब्रह्मांडातील देवीची शक्तीरूपी संकल्पशक्ती कार्यरत केली जाते. काळानुसार हे देवीतत्त्वाचे मारक रूप जागृत करणे, हे प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने आवश्यक आहे. हिंदूंची क्षात्रवृत्ती लोपल्यामुळे आज कुणीही येतो आणि त्यांना बडवून जातो, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे अनेक जिहादांच्या माध्यमांतून हिंदूंचा वंशविच्छेद चालू आहे. तरीही हिंदू एकत्र येऊन अपेक्षित प्रतिकार करत नाहीत; म्हणून हे जिहाद भारतात सर्वत्र थैमान घालत आहेत. अजून किती वंशविच्छेद झाल्यावर हिंदू जागृत होणार आहेत ? ते अल्पसंख्य होत आहेत आणि त्यांची भूमी लाटली जात आहे. हिंदूंना आता शक्तीतत्त्व जागृत केल्याविना पर्याय नाही. नवरात्रीचा काळ हिंदूंचे संघटीकरण आणि शक्तीतत्त्वाची जागृती यांसाठीच आहे. हे लक्षात घ्यावे आणि आदिशक्तीलाच लढण्यासाठी शरण जाऊन बळ मागावे !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव