बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात गोहत्या आणि गोरक्षकांवर आक्रमणाची शक्यता !

विधानसभा अध्यक्षांनी भीती व्यक्त करत पोलीस महासंचालकांना दिला कारवाईचा आदेश !

विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर

मुंबई – बकरी ईदच्या दिवशी (१७ जून) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोहत्या, तसेच गोरक्षकांवर आक्रमणे होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा आदेश विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना दिला आहे. १३ जून या दिवशी याविषयीचे पत्र अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पाठवले आहे. (असे आदेश का द्यावे लागतात? पोलीस महासंचालक स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)

महाराष्ट्रात संपूर्ण गोहत्या प्रतिबंध कायदा लागू आहे; परंतु मालेगाव-नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे राहुल नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. विश्व हिंदु परिषदेच्या कोकण प्रांताचे गोरक्षा विभागप्रमुख श्री. लक्ष्मीनारायण चांडक यांनी दिलेले निवेदनही राहुल नार्वेकर यांनी पत्रासमवेत जोडले आहे.