हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी भारताची केली धर्मशाळा !

हिंदुद्वष्ट्या नेत्यांनी भारताची धर्मशाळा केली. त्यासाठी बाहेरील देशातील आलेल्या मुसलमान घुसखोरांचे पालन-पोषण केले जात आहे. प्रत्यक्षात हे मुसलमान येथे गुन्हेगारी करून भारताची डोकेदुखी बनले आहेत. कोणताही इस्लामी देश अन्य इस्लामी देशांतील मुसलमानांना आश्रय देत नसतांना भारताने मात्र अन्य देशांतील मुसलमानांना आश्रय देऊन त्याची अतोनात आणि कधीही भरून न निघणारी हानी करून घेतली आहे !

लाखो रोहिंग्या मुसलमान भारतात घुसले आहेत.

१. पाकिस्तानने सहस्रो निर्वासितांना हालहाल करून हाकलून देणे !

श्री. शंकर गो. पांडे

जगातील कोणताही इस्लामी देश दुसर्‍या मुसलमान राष्ट्रातील मुसलमान शरणार्थींना त्यांच्या देशात आश्रय देत नाही. दिलाच तर तो तात्पुरता काही काळाकरता दिला जातो आणि नंतर त्यांना हाकलून दिले जाते. रशियन लष्कर आणि अफगाणिस्तानमधील तालिबानी आतंकवाद्यांच्या युद्धात लाखो अफगाणी मुसलमान निर्वासित होऊन त्यांनी शेजारच्या पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. ऑगस्ट २०२१ च्या काळात अमेरिकेच्या सैनिकांनी जेव्हा अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला, तेव्हा तालिबानी आतंकवादी संघटना आणि अशरफ धनी यांच्या सरकारचे सैन्य, तसेच तालिबानला विरोध करणार्‍या काही सशस्त्र टोळ्या यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले होते. तेव्हाही १७ लाख अफगाणी निर्वासित होऊन पाकिस्तानात आश्रयाला आले होते. काही अफगाणी निर्वासित पाकिस्तानातच स्थायिक होऊन ४० वर्षांचा कालावधी होऊन गेला होता. त्यांनी पाकिस्तानात छोटी-मोठी घरे बांधली होती. सहस्रो मुलेमुली शाळेत शिकत होती. अनेकांनी लहान-मोठे रोजगार शोधले होते; पण आता एकाएकी पाकिस्तान सरकारने ३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी एक आदेश काढून या सर्व २० लाख अफगाणी निर्वासितांनी १ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाकिस्तानातून निघून जावे, अशा सक्त सूचना दिल्या. इतकेच नव्हे, तर १ नोव्हेंबर २०२३ ची मुदत संपताच पाकिस्तानच्या सैनिकांनी निर्वासितांना सक्तीने हाकलून देणे चालू केले. त्यांनी अफगाणी निर्वासितांची ५०० घरे बुलडोझरने उद्ध्वस्त केली. त्यांना अमानुषपणे मारझोड चालू केली. काहींनी तर या निर्वासितांजवळील होते नव्हते तेवढे पैसेही लुटले. आता ६ लाख अफगाणी निर्वासितांचे लोंढे अफगाणिस्तानच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने किंवा पायी निघाले ! समवेतच्या सामानाने त्यांचे ट्रक खचाखच भरले होते. त्या सामानावर ट्रकला शिड्या लावून मुलाबाळांना, स्त्रियांना, वृद्धांना चढवले गेले. सीमेवर बर्फवृष्टी चालू झाल्यामुळे थंडी पडायला आरंभ झाला होता. पुरेसे अन्न, वस्त्र, पाणी, औषधे यांच्या अभावामुळे निर्वासितांचे अतोनात हाल झाले. अनेक अफगाणी मुलामुलींना शिक्षण अर्धवट सोडून कोणतेच भविष्य नसणार्‍या अफगाणिस्तानाकडे वाटचाल करावी लागली.

२. इस्लामी देशांनी अन्य इस्लामी देशांतील नागरिकांना आश्रय न देणे !

एकीकडे आपलेच धर्मबंधू असणार्‍या अफगाणी शरणार्थींना निर्दयपणे हाकलवून देणारे पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि जनता आहे अन् दुसरीकडे मात्र हमास अन् इस्रायलमधील युद्धामुळे गाझा पट्टीतून निर्वासित होणार्‍या निर्वासितांवर मात्र सर्वजण नक्राश्रू ढाळत आहेत ! काय म्हणावे या ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाला ? गाझा पट्टीतून निर्वासित झालेल्या मुसलमान निर्वासितांना जगातील आणि शेजारील कोणतेच इस्लामी राष्ट्र त्यांच्या देशात आश्रय द्यायला सिद्ध नाहीत. लेबनॉन या ख्रिस्तीबहुल देशाने एकेकाळी पॅलेस्टाईनच्या निर्वासितांना त्यांच्या देशात आश्रय दिला होता, तर अल्पावधीतच तो देश हिजबुल्लासारख्या आतंकवाद्यांच्या कह्यात गेला. इसिसमुळे सीरियामधून निर्वासित झालेल्या मुसलमान निर्वासितांना इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांनी आश्रय दिला, तर या देशात दंग्यांचे प्रमाण वाढले. ही सर्व उदाहरणे धडधडीत समोर असतांनाही भारतात मात्र बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमार येथून घुसलेल्या मुसलमान घुसखोरांसाठी पायघड्या टाकण्यात येत आहेत. याला काय म्हणावे ? हिंदूंचा आत्मघातकीपणा, मूर्खपणा, झोपाळूपणा कि झोपेचे साेंग ?

३. फाळणीनंतर सर्व मुसलमानांना पाठवणे आणि सर्व हिंदूंना भारतात न घेतल्याने झालेले दुष्परिणाम !

धार्मिक आधारावर वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. तेव्हाच खरे तर भारतातील एकूण एक मुसलमानाला पाकिस्तानमध्ये पाठवायला पाहिजे होते, तर पाकिस्तानातील एकूण एक हिंदूला भारतात आणायला पाहिजे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही हेच मत होते; पण या देशाला इस्लामी देश बनवून हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांनी त्यांच्या मताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. जवळपास ३ कोटी मुसलमानांना भारतातच राहू दिले. परिणाम काय झाला ? त्या वेळच्या ३ कोटी मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत जाऊन आज ती ३० कोटींवर पोचली. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानात असणारे २३ टक्के हिंदू आता जेमतेम १ ते २ टक्के उरले आहेत. अफगाणिस्तानातून हिंदु, बौद्ध, जैन, शीख पूर्णतः नामशेष झाले आहेत. काही काळात ते पाकिस्तान आणि बांगलादेश येथूनही नामशेष होतील. मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवर हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी जाणीवपूर्वक नियंत्रण न ठेवल्यामुळे आज भारतातील ९ राज्ये, २०० जिल्हे, ३०० तालुके यांत मुसलमान बहुसंख्य आणि हिंदु अल्पसंख्य झाला आहे.

४. मुसलमान बहुसंख्य झाल्याने देशभर सर्वत्र हिंदूंचे पलायन !

मुसलमानांच्या बहुसंख्येमुळे, त्यांच्या धार्मिक कट्टरतेमुळे आणि काफिरांविषयी त्यांच्या मनात असलेल्या भयंकर द्वेषामुळे काश्मीरमधील अल्पसंख्य हिंदूंना पलायन करून देहली अन् अन्य राज्यात आश्रय घ्यावा लागला. बंगालमधून पलायन करून हिंदूंनी आसाममध्ये आश्रय घेतला. मणीपूरमधील हिंदूंनी पलायन करून शेजारच्या राज्यात आश्रय घेतला. भारतातील अनेक शहरांत आणि गावात मुसलमानबहुल वसाहती निर्माण झाल्या आहेत. तेथूनही एक तर हिंदूंना हाकलवून देण्यात येत आहे किंवा सुरक्षेच्या कारणाने हिंदु स्वतःहून पलायन करू लागला आहे; पण हिंदु जेव्हा असे पलायन करू लागतात, तेव्हा ना हिंदु समाज एकजूट होतो, ना हिंदुद्वेष्टे नेते अशा पलायन करणार्‍या हिंदूंच्या साहाय्यासाठी पुढे येतात. काश्मीरमधून हिंदूंचे झालेले पलायन आणि शिरकाण या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी सत्तेवर असेपर्यंत जवळपास ३० वर्षे भारतातील जनतेपासून आणि जगापासून लपवून ठेवले होते. ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे ही घटना लोकांना समजली.

५. हिंदुद्वेष्ट्यांनी मुसलमान घुसखोरांना आश्रय देऊन भारताची धर्मशाळा केली !

पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार येथील मुसलमानांना भारतात घुसण्यासाठी भारताचे दरवाजे २४ घंटे सताड उघडे ठेवले. इतकेच नव्हे, तर मुसलमान घुसखोरीला कायद्याद्वारे वैधता प्राप्त करून दिली. राजीव गांधी यांनी बहुमताच्या आधारावर वर्ष १९८५ मध्ये ‘सिटीझनशिप ॲक्ट’ (नागरिकत्व कायदा) मध्ये पालट करून बांगलादेशमधून आसाममध्ये घुसलेल्या लाखो मुसलमान घुसखोरांना भारताचे नागरिकत्व बहाल केले. आसामसाठी ‘भारतीय नागरिकता कायद्या’तील संमत केलेल्या ‘कलम ६ अ’प्रमाणे आसाममध्ये वर्ष १९७१ पूर्वी जे बांगलादेशी घुसले होते, ते सर्व भारताचे नागरिक बनले. या कलमाचा अपलाभ उठवून वर्ष १९७१ नंतर जे घुसखोर आसाममध्ये घुसले त्यांनीही ‘आम्ही वर्ष १९७१ पूर्वी भारतात आलो’, असे सांगणे चालू केले आणि तेही भारताचे नागरिक बनले; कारण भारत सरकार आणि आसाम राज्य शासनानेही वर्ष १९७१ पूर्वी किती घुसखोर आसामात आले, याचा कोणताही तपशील जाणीवपूर्वक ठेवला नव्हता; कारण त्यांना भारताची धर्मशाळाच करायची होती !

६. आसामचे ‘६ अ’ कलम घातक !

आसाममध्ये लागू केलेल्या ‘६ अ’ कलमामुळे त्याची अतोनात हानी झाली असून हे कलम काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार्‍या कलम ३७० पेक्षाही अधिक घातक आहे, असे प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते (श्री.) अश्विनी उपाध्याय यांचे म्हणणे आहे. या मुसलमान घुसखोरांमुळे आसामचे ६ जिल्हे मुसलमानबहुल झाले आहेत. त्यामुळे या ६ जिल्ह्यांतून विधानसभा आणि लोकसभा येथे केवळ मुसलमान प्रतिनिधीच निवडून जाणे सोपे झाले आहे !

 ७. घुसखोर गुन्हेगार रोहिंग्यांची भारताला डोकेदुखी !

म्यानमारमधून लाखो रोहिंग्या मुसलमान भारतात घुसले आहेत. हे रोहिंग्या मुसलमान म्यानमारमधील बौद्ध धर्मीय लोकांना डोईजड झाले होते. बौद्ध धर्मियांवर आक्रमणे करणे, त्यांना लुटणे, त्यांच्या स्त्रियांना पळवून नेणे, असे ते करतात. रोहिंग्यांची अशी गुन्हेगारी वृत्ती आणि कृती यांमुळे तेथील बौद्ध धर्मीय जनता त्रस्त झाली होती. अखेर अहिंसावादी असणार्‍या बौद्धांनाही रोहिंग्यांविरुद्ध हातात शस्त्र घ्यावे लागले. विरथू नावाच्या एका तरुण बौद्ध भिक्षूने बौद्ध धर्मियांमध्ये जागृती निर्माण केली. बौद्ध समाज रोहिंग्यांविरुद्ध एवढा आक्रमक झाला की, शेवटी लाखो रोहिंग्यांनी म्यानमारमधून पळ काढला आणि ते शेजारच्या भारतात आणि बांगलादेशात घुसले. भारतातून हे रोहिंग्या आता देहली, काश्मीर, बंगाल, हरियाणा, मणीपूर, मिझोराम अशा विविध राज्यांत पसरले आहेत. हे रोहिंग्या मुसलमान गुन्हेगारी वृत्तीचे आणि मादक पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेले असल्यामुळे त्यांचे भारतातील वास्तव्य देशासाठी डोकेदुखी ठरत आहे; पण केवळ रोहिंग्या हे मुसलमान असल्यामुळे भारतातील मुसलमानांनी त्यांची बाजू घेतली आहे.

८. रोहिंग्यांवरील अत्याचाराचे निमित्त करून मुसलमानांनी आझाद मैदानात सभेनंतर मुंबईत मोठी दंगल करणे !

भारतातील मुसलमानांनी त्यांची बाजू घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर एक मोर्चा ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी काढला होता. म्यानमारमधील रोहिंग्यावर जे कथित अत्याचार होत होते, त्याचा निषेध करण्यासाठी एक मुसलमान कट्टर संघटना ‘रझा अकादमीने’ या मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने लाखो मुसलमान आझाद मैदानात जमले. तिथे नेहमीप्रमाणे मुसलमान नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली आणि नेहमीप्रमाणेच त्या मोर्च्याचे रूपांतर भीषण दंगलीत झाले. भयानक जाळपोळ चालू झाली. या आगीत हिंदूंची आणि अनेक शासकीय वाहने भस्मसात झाली. सरकारी मालमत्तेची मोठी हानी झाली. आंदोलकांनी पोलिसांवरही आक्रमण केले. एका महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आला. आझाद मैदानातील हुतात्मा स्मारकाचा विध्वंस करण्यात आला. म्यानमारमधील आपल्या धर्मबंधूंवर होणार्‍या अत्याचाराचा राग धर्मांधांनी अशा प्रकारे भारतातील हिंदूंवर अत्याचार करून काढला !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/795055.html