श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व !

नुकतीच २८ एप्रिल या दिवशी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची जयंती होऊन गेली. श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ‘अपराजित योद्धा’ अशी ओळख आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. अशा प्रकारचे कर्तृत्व गाजवणारे ते एकमेव सेनापती आहेत. त्यामुळेच मराठा साम्राज्य विस्तारून मध्यप्रदेश पार करत राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोचले होते. आजच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासकांना त्यांच्या लढायांचे सूत्र अभ्यासण्यासारखे आहे.

आपण मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतो, त्या वेळेस दिसून येते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ‘गनिमी कावा’ या रणनीतीचा उपयोग झाला; मात्र बाजीराव पेशवे राज्याचे प्रमुख बनले, त्या वेळेस त्यांनी चपळ घोडदळाचा प्रामुख्याने उपयोग केला. यामागचे कारण, म्हणजे कुठलीही रणनीती निर्माण करण्यासाठी ३ गोष्टींचा विचार करावा लागतो.

अ. एक म्हणजे आपला शत्रू आणि त्याची शक्ती

आ. दुसरे आपल्याकडे असलेले सैन्य

इ. तिसरे म्हणजे ज्या रणभूमीवर आपण लढत आहोत, तिची रचना.

छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्या वेळेस त्यांना मोगल, आदिलशाह, कुतूबशाह आणि अनेक अंतर्गत शत्रूंचा सामना करावा लागला. बाजीराव पेशवे जेव्हा स्वराज्याचे पंतप्रधान बनले, तेव्हा इतर राजेशाहीचा अस्त झाला होता आणि मोगल हेच प्रमुख आव्हान होते; मात्र दोन्ही वेळेस मोगल सैन्याची संख्या ही मराठ्यांपेक्षा पुष्कळ अधिक होती; म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्री डोंगराचा वापर करून मोगलांच्या सैन्याला सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात येण्यास भाग पाडले आणि त्यांच्यावर गनिमी काव्याने आक्रमण करून त्यांना नामोहरम केले.

१. युद्धाचे डावपेच परंपरेला सोडून

बाजीराव पेशवे यांच्या वेळी परिस्थिती पालटलेली होती. फक्त मोगल हेच शत्रू राहिले होते. स्वराज्याच्या सीमा वाढल्यामुळे मोघल सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या सपाट भागापर्यंत पोचले होते. त्यामुळे या भागात गनिमी कावा वापरणे कठीण होते; म्हणून बाजीराव पेशवा यांनी तेथे घोडदळाचा वापर करून शत्रूला पराभूत केले. बाजीराव पेशवे हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. ते परंपरेला सोडून युद्धाचे डावपेच वापरत होते. व्यक्तींमधील गुण हेरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे भरपूर होते; म्हणूनच त्यांनी त्यांच्या हाताखाली शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले आणि इतर अनेक सरदार यांना सिद्ध केले. बाजीरावांनी युद्धाचे पहिले प्रशिक्षण वडील बाळाजी विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. अगदी लहानपणापासून त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला आणि युद्धभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. युद्धकाळात ते सैनिकांसमवेतच उघड्यावर रहायचे. त्यांच्याप्रमाणेच जेवण आणि इतर दैनंदिनी ठेवायचे. त्यामुळे सैनिकांचे त्याच्यावर अपार प्रेम होते. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी आघाडीवर राहून, इतर सैनिकांप्रमाणे धोके पत्करून, नेतृत्व करायचे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक लढाईत त्यांना प्रचंड यश मिळायचे; कारण जीवन-मरणाच्या रेषेवर नेतृत्व करण्याची एकच पद्धत आहे, ती म्हणजे सैनिकांच्या आघाडीवर राहून नेतृत्व करणे होय. ती बाजीराव पेशवे यांनी प्रत्यक्षात आणली होती.

ते स्वतः घोड्यावर बसून सैन्याचे नेतृत्व करायचे. त्यांचे सैन्य घोडदळावर अधिक प्रमाणात अवलंबून होते. मोगलांचे सैन्य युद्धांच्या वेळी त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य, बायका-मुले घेऊन जायचे. त्यामुळे मोगल सैनिक एका दिवसात १० ते १२ किलोमीटरच पुढे जायचे. मोगलांचे सैन्य हे छोट्या शहराप्रमाणे असायचे. प्रत्येक दिवशी हे शहर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असे. त्यामुळे त्यांची हालचाल ही अतिशय मंद होती; मात्र बाजीराव यांच्या सैन्याचा पुढे जाण्याचा वेग मोगलांच्या चौपट होता. ते एक दिवसात ४० ते ५० किलोमीटर एवढे अंतर पार करायचे. याचे कारण म्हणजे त्यांच्यासमवेत युद्धसामुग्रीच्या व्यतिरिक्त फारसे साहित्य नसायचे. प्रत्येक सैनिकाकडे भाला किंवा तलवार आणि एक-दोन दिवस पुरेल एवढे धान्य असायचे. इतर वेळी आजूबाजूला मिळेल ते धान्य वापरून सैनिक आपले जीवन जगत असत. त्यामुळे त्यांना गतिमान हालचाली करणे शक्य होत असे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) 

२. बाजीराव यांच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत ४१ लढाया !

बाजीराव यांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत ४१ लढाया लढल्या आणि ते एकमेव सेनापती आहेत, ज्यांनी या सर्व लढाया जिंकल्या. त्यांनी लढलेल्या सर्वच लढायांचे वर्णन करणे शक्य नाही; मात्र आज त्यांच्या रणनीतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. माळव्यात मोगलांविरुद्ध केलेली लढाई ही दुसरी महत्त्वाची लढाई. बुंदेलखंडच्या लढाईत त्यांनी छत्रसालाचे रक्षण केले. गुजरातमध्येही ते उत्कृष्टरित्या लढले होते, तसेच जंजिराच्या सिद्धी विरुद्धही ते उत्कृष्टपणे लढले होते. त्याची अत्यंत महत्त्वाची लढाई, म्हणजे त्यांनी देहलीकडे केलेले कूच. त्या वेळी देहलीची सत्ता जवळजवळ मराठ्यांच्या हातात आली होती. समुद्र लढायांमध्ये त्यांनी पोर्तुगालविरुद्धही लढाई केली होती. नादिरशाहने मोगलांवर आक्रमण करून भारतात प्रवेश केला. त्या वेळी मोगलांच्या साहाय्याला जात असतांना नर्मदेच्या काठी आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची समाधी आजही रावरखेडी या नर्मदेच्या काठावरील गावात आहे.

३. सर्वांत महत्त्वाची पालखेडची लढाई

बाजीराव यांनी केलेल्या लढायांमध्ये निजामाविरुद्ध झालेली पालखेडची लढाई महत्त्वाची मानली जाते. पालखेडच्या लढाईत निजामांनी मराठ्यांमध्ये फूट पाडून शाहू आणि त्यांच्या बंधूंना वेगवेगळे केले अन् शाहू महाराजांची राजधानी सातारा येथे कूच केले. त्या वेळी शाहू महाराज पुरंदरच्या किल्ल्यात गेले. बाजीराव त्या वेळी खानदेशामध्ये लढाईला होते. शाहू महाराजांनी त्या वेळी रक्षण करण्याकरता बाजीरावांना सातार्‍याला बोलावले. त्या वेळेस बाजीराव यांनी म्हटले होते, ‘तुम्हाला झाड कापायचे असेल, तर त्याच्या फांद्या कापण्यात काही अर्थ नसतो. त्यासाठी झाडांच्या मुळांवर आक्रमण करणे आवश्यक असते.’ यामागे बाजीरावांचा उद्देश होता की, ‘मोगल सत्तेचे मूळ हे देहलीकडे होते. ते छाटून या साम्राज्याला धक्का देणे’, हाच उद्देश त्यांनी पालखेडमध्ये कार्यवाहीत आणला.

यामुळेच त्यांनी पहिले आक्रमण मोगल असलेल्या गुजरात भागात केले. त्यानंतर माळव्यात निजामांच्या रसदीचे जे तळ होते, त्यावर आक्रमण केले. त्यामुळे निजामाचा देहलीशी असणारा संबंध तुटला. त्यानंतर बाजीरावांचे घोडदळ औरंगाबादला येऊन पोचले. ती निजामाची राजधानी होती. त्यामुळे निजाम याकडे दुर्लक्ष करू शकला नाही. निजामाने पुणे-सातारा आणि पुरंदरच्या भागात असलेली त्याची लढाई थांबवून बाजीरावांशी लढाई करण्याचा निर्णय घेतला. बरेच अंतर पार करून निजामाचे सैन्य गोदावरी नदी पार करत औरंगाबादला पोचले. निजामाला वाटत होते की, ते मराठा घोडदळाचा पाठलाग करत आहेत. तिथे लढाई करण्यापेक्षा बाजीरावांनी त्यांना आणखी आत येऊ दिले आणि औरंगाबादपासून काही किलोमीटर अंतरावरील पालखेड या ठिकाणी त्यांना येण्यास भाग पाडले. या ठिकाणी येईपर्यंत निजामाची रसद तुटलेली होती, सैन्य थकलेले होते, अशा वेळी निजामावर बाजीरावांच्या सैन्याने दोन्ही बाजूंनी आक्रमण केले. रसद बंद झाल्याने आणि काही हालचाल करता न येऊ शकल्याने निजामाची पुष्कळ हानी झाली. ६ मार्चला निजामाने बाजीराव पेशवे यांच्यासमोर शरणागती पत्करली.

४. बाजीरावांचे युद्धकौशल्य

बाजीराव यांचे सैन्य छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून युद्ध भूमीवर एकत्र यायचे. याला इंग्रजीमध्ये ‘Concentration at the point of decision’ (निर्णयाच्या एका टप्प्यावर एकाग्रता साधणे), असे म्हटले जाते. शेवटच्या क्षणी एकत्र आल्यामुळे शत्रूला त्याच्याविरुद्ध कारवाई करणे शक्य व्हायचे नाही, तसेच शत्रूला स्वतःचा पाठलाग करायला लावून बाजीराव त्यांना थकवायचे आणि शेवटी शत्रूला अशा भागात यायला भाग पाडायचे, जिथे शत्रूवर ३-४ ठिकाणाहून आक्रमण करणे सोपे व्हायचे.

बाजीरावांनी पोर्तुगिजांशीही लढाई केली. त्यांनी पोर्तुगीज आणि सिद्धी यांना हरवले. वसईची लढाई आणि सिद्धीशी झालेल्या अन्य लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. जंजिराच्या सिद्धीला कोकणामध्ये त्याचे राज्य पसरवण्यात त्यामुळे यश मिळाले नाही. बाजीराव पेशवे यांच्या युद्धकौशल्याचा भारतातील इतिहासकारांनी फारच कमी अभ्यास केला आहे. ‘जदुनाथ सरकार ग्रॅट डफ’ यांसारख्या काही इतिहासकारांनी त्यांचा अभ्यास करून बाजीरावांचे युद्धकौशल्य सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

५. बाजीराव पेशवे म्हणजे भारतातील सर्वोत्कृष्ट रणनीतीकार आणि सर्वांत कुशल घोडदळाचे सेनापती !

युरोपमधील युद्धकुशल सैन्य अधिकार्‍यांनी बाजीराव यांच्या कौशल्याचे कौतुक केलेले आहे. फिल्ड मार्शल माँटगोमरी हे ब्रिटीश सैन्याचे सरसेनापती होते. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीश सैन्य जिंकले त्याचे श्रेय माँटगोमरी यांच्या नेतृत्वाला दिले जाते. त्यांनी म्हटले आहे, ‘बाजीराव पेशवे हे भारतातील सर्वांत कुशल घोडदळाचे सेनापती होते.’ असेच कौतुक व्हिएतनाम सैन्यामध्येही केले गेले आहे. थोडक्यात बाजीराव पेशवे यांनी त्या काळाला योग्य ठरेल, अशी युद्धनीती वापरून त्या वेळचे निजाम, मोगल आणि इतर शत्रूंचा पराभव केला. त्यामुळेच त्यांचे इतिहासामधील स्थान अढळ आहे. देशाच्या शत्रूंनी बाजीराव यांची घोडदौड थांबवण्याकरता नादिरशाहला इराणमधून भारतात आक्रमण करण्यासाठी बोलावले. बाजीराव त्याच्याशी लढण्यासाठी जात असतांना आजारी पडले आणि नर्मदेच्या काठावर त्यांचा मृत्यू झाला. बाजीराव देहलीला पोचून नादिरशाहशी लढले असते, तर युरोपात गेलेला भारताचा ‘कोहिनूर हिरा’ आणि ‘मयूर सिंहासन’ हे देशातच राहिले असते. त्याच वेळी भारतात मराठ्यांचे साम्राज्य सिद्ध झाले असते आणि कदाचित् ब्रिटिशांनाही भारतभूमीमध्ये येणे अन् इथे राज्य करणे कठीण झाले असते; म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाजीराव पेशवे हे अतिशय सर्वोत्कृष्ट रणनीतीकार आणि सेनापती होते.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (२९.४.२०२४)

बाजीराव पेशवे यांना देशाच्या इतिहासात योग्य महत्त्व न देण्यामागील एक कारण

बाजीराव पेशवे यांना भारताच्या इतिहासात योग्य ते महत्त्व दिले गेले नाही. याचे एक कारण, म्हणजे ‘ब्रिटिशांनी भारताची सत्ता मोगलांकडून जिंकून घेतली’, असे भारताच्या राजकीय नेतृत्वाला दाखवायचे होते; मात्र सत्य वेगळे होते. ब्रिटिशांनी भारताची सत्ता मराठा साम्राज्याकडून जिंकलेली होती.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)