संपादकीय : सर्वच ‘अनधिकृत’ स्वतःहून हटवा !

हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्गा

ज्यामुळे पुण्याला ‘पुणे’ हे नाव पडले, त्या कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिरावर सध्या मुसलमान आक्रमकांनी हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचे बांधकाम केलेले आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह भाजप आमदार नितेश राणे आणि मनसे यांनी या प्रकरणी नुकतेच आंदोलन केले अन् येथील दर्ग्याच्या ‘वाढीव’ बांधकामाच्या संदर्भात गुन्हाही नोंद झाला. यानंतर नाईलाजाने का होईना, ‘या दर्ग्याचे जे वाढीव अनधिकृत बांधकाम आहे, ते आम्ही स्वतःहून तोडू’, असे संबंधित दर्ग्याच्या विश्वस्तांनी सांगितले. मुसलमानांची एकंदर आक्रमक मानसिकता पहाता स्वतःहून ‘वाढीव अनधिकृत बांधकाम पाडू’, असे सांगणे, हा एक प्रकारे सध्या देशात होत असलेल्या हिंदूसंघटनाचा परिणाम आहे; परंतु खरे तर ‘मंदिराच्या जागेवर दर्गा उभारणे’, हेच मुळात चूक आहे, ‘हेही त्यांनी पुढे जाऊन मान्य करावे’, अशी हिंदूंची अपेक्षा आहे, तरीही हिंदू एकत्र आल्यावर आणि त्यांना थोडे राजकीय पाठबळ, तसेच पोलीस प्रशासनाचा थोडा आधार मिळाला, तर काय पालट होऊ शकतो ? हे पुण्यनगरीतील या घटनेवरून लक्षात येते. ‘नवी मुंबईतील घणसोलीतील सिडकोच्या वाणिज्य भूखंडावरील मदरशाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी’, अशी तक्रार स्थानिक रहिवासी तेजस पाटील यांनी केली होती. त्यानुसार सिडको आणि महापालिका यांच्या अधिकार्‍यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना कारवाईची नोटीस बजावली. कारवाईची चेतावणी दिल्यावर २ दिवसांपूर्वी अतिक्रमणधारकांनी ‘स्वतः’ हे अनधिकृत बांधकाम हटवले. मागील ८ वर्षांपासून हे बांधकाम त्या ठिकाणी होते. सकल हिंदु समाजाच्या वतीने या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. मागील मासात नवी मुंबईतील अन्य एका शासकीय जागेवरची मशीदही हिंदुत्वनिष्ठांनी केलेले आंदोलन आणि तक्रार यांच्यानंतर त्यांनी ‘स्वतःहून’ हटवली. अशाच कारवाया याही पुढे या भागात चालू रहाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. थोडक्यात म्हणजे हिंदुत्वनिष्ठांच्या दबावामुळे आता मुसलमानांनी तुम्ही बुलडोझर चालवण्यापेक्षा ‘आम्ही स्वतःच हटवतो’, अशी भूमिका घेतली आहे.

शक्तीप्रदर्शनाची मानसिकता !

पुणे येथील घटनेत ‘दर्ग्या’च्या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे’, अशी माहिती पसरल्याने ८ मार्चला मध्यरात्री दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुसलमान जमा झाले होते. त्याच वेळी दर्ग्याचे विश्वस्त या विषयाची सुस्पष्टता त्यांना करू शकले असते; परंतु त्यांनी तसे केले नाही. ‘दर्गा नव्हे, तर वाढीव अनधिकृत बांधकाम पाडले जाणार आहे’, हा विषय पोलिसांना येऊन जमलेल्या मुसलमानांना स्पष्ट करावा लागला. मुसलमानांच्या अशा एकत्र येण्यामुळे पुढील २ दिवस अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तिथे ठेवावा लागत असल्याने यंत्रणेवरही ताण आला आहे. यावरून लक्षात येते की, काही झाले की, लगेच शक्तीप्रदर्शन करून दादागिरी करण्याची धर्मांधांची प्रवृत्ती त्यांनी इथेही चालूच ठेवली होती. मध्यंतरी मुंबईत एका प्रक्षोभक भाषण करणार्‍या तथाकथित इस्लामी मार्गदर्शकाला, म्हणजे एका अर्थी आतंकवाद्याला पकडल्यावर कारागृहाबाहेर मुसलमानांनी मोठी गर्दी करून अशीच दादागिरी केली. भारत सहिष्णू असल्यामुळे त्यांचा हा उद्दामपणा खपवून घेतला जात आहे. चीनमध्ये १६ सहस्र मशिदी पाडल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तिथे अशी शक्तीप्रदर्शनाची आंदोलने करण्याचे यांचे धैर्य होऊ शकेल का ?

मूळ बांधकामच ‘अनधिकृत’ !

मंदिरावर आक्रमण करून अर्वाचीन किंवा सध्याच्या काळात मुसलमानांनी उभारलेली थडगी, दर्गे, मशिदी, मदरसे हेही खरे तर अनधिकृतच आहेत. हिंदूंच्या संघटनानंतर आणि त्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे, हे लक्षात आल्यावर संबंधित वास्तू नव्हे, तर वास्तूच्या भोवतीची अनधिकृत अतिक्रमणे हटवली जाण्यास आता प्रारंभ झाला आहे; परंतु मूळ थडगे किंवा वास्तू हेही एक प्रकारे आक्रमणकर्त्यांनी बळजोरीने, म्हणजेच अनुमती न घेता केलेले अतिक्रमण असल्याने तेच मुळात ‘अनधिकृत’ आहे, हे ते आणि माध्यमे कधी मान्य करणार ? तेच ते स्वतःहून हटवतील, अशी वेळ आता हिंदूंनी त्यांचे संघटन अधिक प्रबळ करून आणि शासनकर्त्यांवर दबाव आणून आणली पाहिजे. मागील वर्षी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मोठा गाजावाजा करून, एक सभा घेऊन मुंबईच्या माहीम खाडीतील एक अनधिकृत थडगे हटवण्याविषयी पोलीस प्रशासनाला आवाहन केले; प्रत्यक्षात नंतर लक्षात आले की, थडगे हटले नाही, तर त्याच्या आजूबाजूला उभे राहिलेले अनधिकृत बांधकाम काढले गेले. नुकतेच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशमधील संभल येथे नवीन मोठ्या कल्की मंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडला. तेथेही मूळ मंदिर पाडून तिथे मुसलमानांनी मशीद उभारली आहे. ती तशीच ठेवून शेजारी मंदिर उभे केले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा ‘सुसज्ज महामार्गा’च्या माध्यमातून पंतप्रधानांनी पुनर्विकास आणि जीर्णाेद्धार केला; परंतु मूळ ज्ञानवापी काशी विश्वनाथाच्या मंदिरावर मशीद बांधली गेल्याने त्याविषयीचा न्यायालयीन लढा आता चालू आहे. मंदिरांवरील आक्रमण हटण्यापूर्वीचा हा एक मधला टप्पा आहे, असे म्हणू शकतो; परंतु हिंदूंना ‘आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या मूळ मंदिरांवर केलेली आक्रमणेच नको आहेत’, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

चळवळ वाढू दे !

श्रीराममंदिराच्या उज्ज्वल यशानंतर ज्ञानवापी मंदिर आणि मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा चालू झालेला लढा हा देशभरातील मंदिरे मशिदींच्या आक्रमणापासून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा करणारा झाला आहे. वर्ष १९४७ नंतरची प्रार्थनास्थळे तशीच ठेवावीत, म्हणजे थोडक्यात मंदिरांवर इतिहासात बांधल्या गेलेल्या मशिदी तशाच ठेवाव्यात, हा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’चा कायदा बनवण्यामागचे मुसलमानधार्जिण्या काँग्रेसचे गौडबंगाल हिंदूंना पूर्णतः कळून चुकले आहे. आता हिंदूंच्या दबावाने हा कायदाही रहित होईल, अशी आशा आहे. देशभरातील अनेक शिवाची मंदिरे ही मशिदींची स्थाने असल्याचे स्पष्ट अवशेष मिळत आहेत. असे असतांना ‘प्रत्येक मंदिरासाठी वेगळ्या न्यायालयीन लढ्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न हिंदूंच्या दबाव गटाने आता पुढे आणला पाहिजे. गावोगावी ही चळवळ आता पसरत जायला काहीच हरकत नाही. हिंदूंनी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या नेत्यांना हाताशी धरून काळाच्या ओघात लुप्त झालेल्या प्रत्येक मंदिरात पूजा चालू केली, तर हिंदूंच्या चैतन्याचे स्रोत वाढत जातील आणि परकीय आक्रमकांच्या खुणा हळूहळू पुसल्या जातील, यात शंका नाही. संपूर्ण देशात मुसलमानांनी २ सहस्रांहून अधिक मंदिरांवर मशिदी बांधल्याची सूची हिंदुत्वनिष्ठ विचारवंत पू. सीताराम गोयल यांनी प्रसिद्ध केली होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक मंदिरे असतीलही. तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या मताप्रमाणे ‘मशीद पाडून मंदिर निर्माण नको’, असे असेल, तर ते मुसलमानांनी मंदिरावर बांधलेली अनधिकृत मशीद स्वतःच हटवण्यास पुढाकार घेऊ शकतात !

केवळ मुसलमानी वास्तूंभोवतीचे वाढीव बांधकामच नव्हे, तर त्या अनधिकृत वास्तू हटवून मंदिरे पुन्हा हिंदूंच्या कह्यात द्या !