ऐन नवरात्रोत्सवात सांडपाणी आणि अन्य दूषित पाणी पंचगंगेत 

  • दायित्वशून्य महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ !

  • प्रशासनाची डोळेझाक 

कोल्हापूर – कोल्हापूर शहरासाठी ज्यातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्या पंचगंगेत ऐन नवरात्रोत्सवात शहरातील विविध नाल्यांमधील पाणी थेट नदीत मिसळत आहे. या संदर्भात ‘प्रजासत्ताक’ या सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी पहाणी करून हा प्रकार उघडकीस आणला. या संदर्भात ते म्हणाले, ‘‘केवळ नालेच नाही, तर मानवी विष्ठा, तसेच रसायनेही पाण्यात मिसळत आहेत. या संदर्भात कोल्हापूर महापालिका प्रशासन, जिल्हा परिषद, प्रदूषण मंडळ काहीही करत नाही. त्यांचे अधिकारी काहीही करत नाहीत. त्यामुळे या संदर्भात उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांनी तात्काळ त्यागपत्र द्यावे.’’

‘‘पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्याने यापूर्वीच कोल्हापूर महापालिकेवर ४ फौजदारी खटले नोंद आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने दोन मासांपूर्वी ठोठावलेल्या दंडापैकी १ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा दंड महापालिकेने भरला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रकारानंतर नवीन काही कारवाई झालेली नाही.’’ – प्रमोद माने, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

संपादकीय भूमिका

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते, असे कारण पुढे करून भाविकांचा विसर्जनाचा धार्मिक अधिकार हिरावून घेणारे महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ यांचा खरा तोंडवळा या निमित्ताने पुढे आला ! तरी संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाईच होणे आवश्यक आहे !