#Exclusive : ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे केंद्र राज्याबाहेर जाऊ न देता कोकणातच रहाणार !

‘दैनिक सनातन प्रभात’च्या वृत्ताची विधानसभेत नोंद !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्‍वासन !

मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – कोकणात सातत्याने नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत असतांना ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक’ अर्थात् ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे केंद्र रायगडऐवजी (कोकणाऐवजी) राज्याबाहेर चालू करण्याच्या हालचाली होत असल्याचे वृत्त ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये २१ जुलै या दिवशी प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची नोंद घेत २४ जुलै या दिवशी हा विषय स्थगन प्रस्तावाद्वारे (दिवसभराचे कामकाज बाजूला ठेवून केवळ सादर केलेल्या विषयावर चर्चा करण्याचा प्रस्ताव) सभागृहात मांडण्यात आला.

यावर अजित पवार म्हणाले,

‘‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथका’चे केंद्र रायगड येथेच होण्यासाठी लक्ष देईन. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आपत्तींचा फटका बसतो. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रात दुर्घटना घडतात. त्यामुळे ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथका’चे केंद्र रायगड येथेच स्थापन व्हावे, यासाठी राज्यशासन या प्रकरणात लक्ष घालेल.’’

काय आहे प्रकरण ?

रायगड जिल्ह्यातील तळीये येथे जुलै २०२१ मध्ये झालेल्या भूस्खलनात ३५ कुटुंबे डोंगरामध्ये गाडली गेली. यामध्ये ८४ नागरिकांचा मृत्यू झाला. या वेळी मुंबई आणि पुणे येथून आलेले ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे पथक घटनास्थळी पोचण्यास विलंब झाला. पथक लवकर पोचले असते, तर आणखी काही नागरिकांचे प्राण वाचले असते. यानंतर रायगडमधील महाड येथे एन्.डी.आर्.एफ्.चे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १८ नोव्हेंबर २०२१ या दिवशी आदेश काढून सरकारने महाड येथील शासकीय दूध योजनेची २.५७ हेक्टर भूमी एन्.डी.आर्.एफ्.चे केंद्र स्थापन करण्यासाठी हस्तांतरित केली. याचा आराखडा सिद्ध करून त्याचा प्रस्तावही वर्ष २०२१ मध्ये केंद्रीय गृहखात्याकडे पाठवण्यात आला. अद्याप यावर निर्णय होणे शेष आहे.

‘रायगड येथे होऊ घातलेले हे केंद्र राज्याबाहेर हालवण्याच्या हालचाली चालू आहेत’, हे सर्वप्रथम ‘दैनिक सनातन प्रभात’मधून उघड करण्यात आले.

हे वाचा –

#Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !
https://sanatanprabhat.org/marathi/703197.html