गड-दुर्गांचे पावित्र्य जपण्यासाठी धुडगूस घालणार्‍या पर्यटकांना चेतावणी देणार्‍या सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांचे अभिनंदन !

  • सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांची चेतावणी  

  • पर्यटनाच्या नावाखाली गड-दुर्गांवर धुडगूस खपवून घेतला जाणार नाही !

खेड – पावसाळ्यात पर्यटनासाठी अनेक जण गडांवर भेटी देत आहेत. सध्या गडांवर होणारी पावसाळी पर्यटकांची गर्दी पाहून असे वाटते, गड-दुर्ग हे ऐतिहासिक वास्तू नसून पर्यटनस्थळे झाली आहेत. गडांवर गेल्यावर गडाचे पावित्र्य न राखता त्या ठिकाणी धुडगूस घातला जात आहे; मात्र हा धुडगूस खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी दिली आहे.

तालुक्यातील रसाळगड, महिपतगड आणि सुमारगड असे गड आहेत. अनेक पर्यटक गडांवर फिरण्यासाठी जात असतात. गडांवर मद्यपान आणि धूम्रपान भरपूर प्रमाणात वाढत आहे. हे प्रकार निंदनीय असून या प्रकारांना पाठीशी घातले जाणार नाही. त्याचसमवेत गडांवर ‘ट्रेंड’च्या नावाखाली मुला-मुलींची नाचगाणी यांसारखे प्रकार घडत आहेत. गडांवर असे काही आढळून आल्यास त्याची ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या गडांचा आदर वाटेल, असेच वागा. गडांचा अपमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन श्री. सागवेकर यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

  • गड–दुर्ग ही पर्यटन स्थळे नव्हेत, तर क्षात्रवीरांची तीर्थस्थळे आहेत, हे लक्षात घ्या.
  • गडांचे पावित्र्य राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना चेतावणी द्यावी लागते , हे प्रशासनाला लज्जास्पद !