जुलैमध्‍ये राज्‍याचा मंत्रीमंडळ विस्‍तार होणार; निर्णय मुख्‍यमंत्री घेणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर – जुलैमध्‍ये राज्‍याचा मंत्रीमंडळ विस्‍तार होणार आहे. याविषयी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, अशी माहिती राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. त्‍यामुळे १ वर्षापासून कायम चर्चेेत असलेल्‍या राज्‍याच्‍या मंत्रीमंडळ विस्‍ताराचा मुहूर्त लवकरच निश्‍चित होणार आहे.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जून या रात्री विलंबाने देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्‍ताराचे सूत्र ठरल्‍याची माहिती आहे. बैठकीविषयी माहिती देतांना देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, राज्‍याचे अनेक प्रश्‍न असतात. त्‍यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागतो. त्‍यासाठीच देहली येथे महत्त्वाची बैठक झाली. आम्‍हाला राज्‍याच्‍या मंत्रीमंडळाचा विस्‍तारही लवकर करायचा आहे.

भाजपश्रेष्‍ठी शिवसेनेच्‍या काही मंत्र्यांच्‍या कारभारावर अप्रसन्‍न असल्‍याची चर्चा आहे. त्‍यामुळे आगामी मंत्रीमंडळ विस्‍तार करतांना या मंत्र्यांची हकालपट्टी केली जाण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ३० जून या दिवशी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनेच्‍या ४ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्‍चू दिला जाईल, असा दावा केला आहे.

त्‍यावर देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, ज्‍यांना कोणतीही बातमी मिळाली नाही, तेच लोक अशा बातम्‍या पेरतात. यात कोणतीही विश्‍वासार्हता नाही. ‘शिवसेनेच्‍या २ नेत्‍यांना मंत्रीमंडळात स्‍थान दिले जाणार आहे’, अशी चर्चा सध्‍या चालू आहे. शिंदे गटाचे प्रवक्‍ते संजय शिरसाट यांनीही ‘शिवसेनेच्‍या २ मंत्र्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्‍थान देण्‍यात येणार असल्‍याचे संकेत मिळत आहेत’, असे वक्‍तव्‍य केले आहे. त्‍यावर देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, केंद्र सरकारचा मंत्रीमंडळ विस्‍तार कधी होणार, हे आम्‍हाला ठाऊक नाही. केंद्र आणि राज्‍य मंत्रीमंडळ विस्‍ताराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आम्‍हाला राज्‍याच्‍या मंत्रीमंडळ विस्‍तारात अधिक रस आहे.