हिंदू आणि शीख यांच्यात फूट पाडण्यासाठीच काँग्रेसकडून खलिस्तानवादाला खतपाणी !

  • ‘रॉ’चे माजी सचिव जी.बी.एस्. सिद्धू यांचा गंभीर आरोप !

  • भिंद्रनवाले याला काँग्रेसने केले मोठे !

रॉ’चे माजी सचिव जी.बी.एस्. सिद्धू

नवी देहली – खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला इंदिरा गांधी, संजय गांधी, ज्ञानी झेलसिंह, कमलनाथ यांच्यासारख्या काँग्रेसवाल्यांनीच मोठे केले, असा गंभीर आरोप भारताची गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अ‍ॅनिलिसिस विंग’चे (‘रॉ’चे) माजी विशेष सचिव जी.बी.एस्. सिद्धू यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेच्या संपादिका स्मिता प्रकाश यांना दिलेल्या मुलाखतीत केला. ‘हिंदू आणि शीख यांच्यात फूट पाडण्यासाठीच काँग्रेसने खलिस्तानचे सूत्र निर्माण करून भिंद्रनवाले याला मोठे केले’, असेही सिद्धू यांनी सांगितले.

सौजन्य: ANI News

जी.बी.एस्. सिद्धू यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे

१. ‘ऑपरेशन भिंद्रनवाले’चा प्रारंभ आणि त्याचे व्यवस्थापन देहलीतील काही नेते ‘१, अकबर रोड’ स्थित निवासस्थानातून करत होते. यात इंदिरा गांधी, त्यांचे पुत्र संजय गांधी, नेते कमलनाथ, ज्ञानी झेलसिंह आदींचा समावेश होता. हे सर्व वर्ष १९७८ मध्ये चालू झाले. ज्ञानी झेलसिंह आणि संजय गांधी यांनी अकाली दल अन् जनता पक्ष यांच्यात तणाव निर्माण करण्यासाठी हे षड्यंत्र रचले.

२. संजय गांधी आणि ज्ञानी झेलसिंह यांनी एका प्रतिष्ठित ‘संतां’ना पंजाबमध्ये पाठवण्याचे ठरवले. यामागे ‘हा संत अकाली दलाच्या मवाळ धोरणावर टीका करील आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जनता पक्षाकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जाईल. त्यातून अकाली दल आणि जनता पक्ष यांची युती तुटेल’, हा हेतू होता.

३. काँग्रेसने पंजाबमधील हिंदूंना घाबरवण्यासाठी भिंद्रनवाले याला उभे केले आणि खलिस्तानच्या सूत्राला जन्म दिला. यामुळे देशातील जनतेला हा प्रकार भारताच्या अखंडतेला धोका वाटू लागला.

४. पोलीस आणि प्रशासन यांतील अधिकारी भिंद्रनवाले याला ‘सर’ म्हणू लागले होते. त्याला एक मोठी व्यक्ती बनवण्यात आले. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री ज्ञानी झेलसिंह यांनीच प्रसारमाध्यमांमध्ये भिंद्रनवाले याची प्रतिमा निर्माण केली.

५. त्या वेळी मला कॅनडात पाठवण्यात आले. त्या काळात कॅनडामध्ये खलिस्तानची चर्चा नगण्य होती. वर्ष १९७९ मध्ये भारतात परतल्यावर मला ‘रॉ’मध्ये पाठवण्यात आले. आय.एस्.आय. आणि शीख कट्टरतावादी यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यासाठी ‘रॉ’चा एक नवीन विभाग डिसेंबर १९८० मध्ये निर्माण करण्यात आला होता; मात्र त्या वेळी ‘दोघांमध्ये काही संबंध आहे’, असे एकही उदाहरण समोर आले नाही.

६. काँग्रेसने अकाली दलाशी चर्चा करण्याची योजना आखली. त्यांना वाटत होते की, अशा चर्चेतून समस्या सुटू शकते. दोघांमध्ये २६ वेळा चर्चा झाली. काही वेळी यात इंदिरा गांधी आणि संजय गांधी हे सहभागी झाले होते. संजय गांधी यांनी खलिस्तान आणि भिंद्रनवाले या प्रकरणांवरून पंजाबमध्ये निवडणुका जिंकण्याची योजना आखली होती.

७. वर्ष १९८२ मध्ये आम्हाला माहिती मिळाली की, इंदिरा गांधी यांच्या जिवाला धोका आहे. तेव्हा भिंद्रनवाले सुवर्णमंदिरात राहू लागला होता. त्याला अटक करण्याचे ठरवण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसने खलिस्तानचा भस्मासूर निर्माण केला आणि त्यानेच काँग्रेसचा घात करत देशाचीही हानी केली ! अशा काँग्रेसवर आतापर्यंत बंदी घालणे आवश्यक होते !
  • काँग्रेसने सत्तेचा कसा दुरुपयोग केला ?, हे यावरून लक्षात येते ! स्वार्थासाठी देशाचा आणि हिंदूंचा बळी देणार्‍या काँग्रेसचे राजकीय अस्तित्व हिंदूंनी संपवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !