तिवरे (तालुका चिपळूण) गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान  !

तिवरे येथील ग्रामस्थ, हरित मित्र परिवार आणि निसर्ग अन् सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सदस्य

चिपळूण, १२ जून (वार्ता.) – तालुक्यातील तिवरे येथील ग्रामस्थ, हरित मित्र परिवार आणि निसर्ग अन् सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नुकताच तालुक्यातील तिवरे गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ‘मार्गदर्शक’ म्हणून सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश (बापू) काणे, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर आणि निसर्ग अन् सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक उपस्थित होते.

‘शासनाने अवैध वृक्षतोडीवर बंदी आणायला हवी आहे. उन्हाळ्यात झाडांना पाणी घालणे अवघड होत असल्याने मोजकी झाडे लावून दायित्व घेऊन ती जगवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील’, अशा भावना तिवरे ग्रामस्थांनी श्री व्याघ्राम्बरी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केल्या. येत्या २४ जूनला तिवरे गावाच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा रोपलागवड करण्याचा उपक्रम घेण्यात येणार असल्याचे या वेळी ग्रामस्थांनी घोषित केले.

जंगल राखण्यासाठी मालकांना अनुदान मिळणे आवश्यक ! – प्रकाश काणे

कोकणात खासगी जंगले आहेत. इथे पैशांसाठी जंगलतोड होते. या वृक्षतोडीला पायबंद घालण्यासाठी खासगी जंगल मालकांना शासनाकडून जंगल राखण्यासाठी थेट अनुदान मिळायला हवे. दिवसेंदिवस निसर्गाचे कालचक्र बिघडते आहे. महापूर येत आहेत. नद्या गाळाने भरल्यात. बांबू तोडायला शासनाची अनुमती लागत नाही. ३ वर्षात बांबूचे बेट तयार होते. यास्तव बांबूची लागवड करणे आवश्यक आहे. बीजारोपणांसाठी गावाला उपलब्ध झालेल्या बीयाणांपासून काही मोठी रोपे बनवून नंतर त्यांचे रोपण करावे.

नेमकेपणाने मोजकी झाडे लावू आणि जगवू या ! – नीलेश बापट

वृक्षलागवड करतांना ती जगवली जातील या दृष्टीने ठोस नियोजन आवश्यक आहे. त्या दृष्टीने नेमकेपणाने मोजकीच झाडे लावूया. आकाशातून पाहिले, तर कोकणात शेतीचे चौकोन दिसतात. या चौकोनांच्या बांधावर झाडांची लागवड व्हायला हवी. लागवडीसाठी १० वड आणि १० पिंपळ ही रोपे देत आहोत.

समुद्रकिनार्‍यांसह सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख ‘दरडग्रस्त’ होणे दुर्दैवी ! – धीरज वाटेकर

वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने १० सहस्र कोटी रुपयांचा आराखडा सिद्ध केला आहे. या आराखड्यानुसार कोकणातील १ सहस्र ५० गावे ‘दरडग्रस्त’ ठरणार आहेत. पर्यटन समृद्ध कोकणातील समुद्रकिनार्‍यांसह सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख ‘दरडग्रस्त’ होणे दुर्दैवी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यावरील १०९, तर मंडणगड ते राजापूर या सह्याद्रीच्या पट्ट्यातील ५०३ गावे आहेत. आपल्या पूर्वजांनी पोटाला चिमटे काढून येथील खासगी जंगल मालमत्ता जगवली आणि टिकवली. वृक्षतोडीमुळे येथील गावे, जंगले आणि देवराई यांची आजची स्थिती भयावह आहे. आपल्या देवरायांना किमान २ सहस्र वर्षांचा वारसा आहे. आपण वृक्षकोश तपासला, तर आपल्या देवरायातील अनेक झाडांची उपज ही आशिया खंडातील असल्याचे लक्षात येते. त्याकाळात ही झाडे इकडून इकडे कशी आली असतील? असा प्रश्न निर्माण होतो. नंतरच्या काळात येथील आध्यात्मिक प्रभावामुळे ही वृक्षराजी बहरली. तिच्यात मंदिरे उभी राहिली. पेशवाई संपुष्टात येईपर्यंत आपल्या देवराया पूर्वजांकडून सांभाळलेल्या होत्या. ब्रिटिशांनी भारतीय देवरायांचे वर्णन ‘वृक्षांचा महासागर’ असे केले होते. विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.

या वेळी हरित मित्र परिवाराच्या डॉ. महेंद्र घागरे यांनी सोलापूर विद्यापिठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या बहावा, तिरफळ, कोकम, रिंगी, पुत्रंजीवा आदी जंगली वृक्षांचे ५० सहस्र बीयाणे बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी विलास महाडिक यांनी तिवरे ग्रामस्थांना दिले. विलास महाडिक यांनी त्यांच्या रोपवाटिकेतील किमान ३ वर्षे वयाची झाडे लागवडीसाठी देण्याचे घोषित केले. या वेळी माजी सरपंच नरसिंग शिंदे, कार्यक्रम आयोजक प्रतिक शिंदे, अमित शिंदे, साहिल शिंदे, पांडुरंग शिंदे, नागेश शिंदे, विपुल शिंदे, रवींद्र शिंदे, शैलजा लांडे, मायावती शिपटे, कल्पना देवरुखकर, नीलम मोहिते, किशोर मोहिते आदी उपस्थित होते.