पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

आज देहू (पुणे) येथून जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी प्रस्‍थान होणार आहे. त्‍या निमित्ताने…

१. ‘वारकरी’ हा शब्‍द ‘वारीकरी’ या शब्‍दाचा अपभ्रंश. वारी करणारा तो वारकरी.

२. संत वाङ्‌मयात केलेले वारीचे उल्लेख

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या पूर्वी शेकडो वर्षे पंढरीच्‍या वारीची परंपरा होती. ज्ञानोबारायांनी एका अंभगात लिहिले आहे, ‘माझ्‍या आई-वडिलांनी मला आणि भावंडांना पंढरीच्‍या वारीसाठी नेले.’ संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या काळापासून गेली ७५० वर्षे वारीचे उल्लेख संत वाङ्‌मयात शेकडोने आहेत. ‘संत नामदेवांनीही संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचे वडील सिदोपंत हे लग्‍न झाल्‍यावर पंढरपूरला दर्शनासाठी आले. त्‍या वेळी पंढरपूर येथे यात्रा भरली होती’, असे म्‍हटले होते.

कै. भागवताचार्य वा.ना. उत्‍पात

३. वारकरी संप्रदायाची वैशिष्‍ट्ये

अ. वारकरी संप्रदाय हा वारकरी भागवत आणि भक्‍ती संप्रदाय आहे.

आ. त्‍याची वैशिष्‍ट्ये म्‍हणजे पंढरीची नित्‍य वारी, गळ्‍यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्‍या ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्‍मरण नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्‍णुता, सदाचार, शाकाहार, व्‍यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्‍ट्ये सांगता येतील.

इ. पंढरीचा विठ्ठल आणि रुक्‍मिणीमाता हे वारीचे मुख्‍य दैवत आहे.

ई. ‘एक धरिला चित्ती आम्‍ही रखुमाईचा पती’ वारीला जातांना त्‍यांचा हा अभंग आहे. वारकरी दिंडीत चालत असतात.

उ. तुळशीची माळ हे तर वारकर्‍यांचे यज्ञोपवीत आहे.

३ ऊ. ‘डोईवरचे आकाश आणि मनातील देवयानीशी प्रवाही झालेले पसायदान म्‍हणजे वारी’, असे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी सांगणेे : प्राचार्य शिवाजीराव भोसले म्‍हणतात, ‘‘पंढरीची वारी हे महाराष्‍ट्राचे ऐश्‍वर्य आहे. भेदातीत जीवनाची एक गतीमान आवृत्ती आहे. वारी हे मूलतः एक व्रत आहे. तिला दैवी गुणसंपदेचे अधिष्‍ठान आहे. वारी हा तीर्थरूप महाराष्‍ट्राचा वडिलोर्जित वारसा आहे. डोईवरचे आकाश आणि मनातील देवयानीशी प्रवाही झालेले पसायदान म्‍हणजे वारी. खरोखर वारकरी धर्माची आचारसंहिता नागरिकत्‍वाची उंची वाढवणारी आहे.’’

४. संत नामदेव यांनी केलेले वारीचे वर्णन

नित्‍य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरूषन सर्वकाळ ॥
पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठ्ठल एकाएकी सुखरूप ॥ – संत नामदेव महाराज

५. संत नामदेव यांनी लिहिलेल्‍या आरतीतील वारीचा उल्लेख !

आषाढी कार्तिकी भक्‍तजन येती ।
चंद्रभागेमध्‍ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्‍ति ।
केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥

६. संत नामदेव यांच्‍या अभंगातील वारीचे महत्त्व !

आषाढी कार्तिकी हेचि आम्‍हां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे ॥
टाळ नृत्‍य घोष पताकांचे भार । गर्जे भीमातीर सर्वकाळ ॥
कार्तिकी एकादशी । पोहा मिळाला पंढरीसी ॥
पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्‍याची पायधुळी लागो मज ॥
नामा म्‍हणे धन्‍य झाले ते संसारी । न सांडिती वारी पंढरीची ॥

(साभार : संत नामदेव महाराजांच्‍या अभंगांतील निवडक ओळी)

७. संत नामदेव महाराज यांनी पंढरीची वारी करण्‍याचे सांगितलेले फळ

पंढरीची वारी करील जो कोणी । त्‍याच्‍या मागे पुढे चक्रपाणी ॥
पंढरीसी जावे जीवन्‍मुक्‍त व्‍हावे । विठ्ठला भेटावे जीवलगा ॥

(साभार : संत नामदेव महाराजांच्‍या अभंगांतील निवडक ओळी)

८. संत जनाबाई म्‍हणतात,

आले वैष्‍णवांचे भार । झाले हरिनाम जागर ॥
ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळा ॥

(साभार : संत जनाबाईंच्‍या अभंगांतील निवडक ओळी)

९. संत नरहरि सोनार म्‍हणतात,

पंढरी नगरी दैवत श्रीहरि । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥
आषाढी कार्तिकी महापर्वे थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥

– संत नरहरि सोनार

१०. संत सेनामहाराज म्‍हणतात,

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्‍णव डिंगर दावा कोठे ॥ १ ॥
वाट धरता पंढरीची । चिंता हरे संसाराची ॥ २ ॥

– संत सेनामहाराज

११. संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास वारीविषयी लिहितात, ‘‘आमुचे कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठ्ठलाचे ॥’’

१२. वारकर्‍यांनी काटेकोरपणे पालन करावयाचे नियम

अ. मी सदा सत्‍य बोलीन.

आ. मी परस्‍त्री मातेसमान मानीन.

इ. काही अपराध घडला, तर श्री विठ्ठलाच्‍या चरणांवर हात ठेवून मी कबुली देईन आणि क्षमेची याचना करीन.

ई. मी नित्‍य शुद्ध सात्त्विक आहार शाकाहार घेईन.

उ. मी वर्षातून एकदा पंढरी, देहू आणि आळंदीची वारी करीन.

ऊ. मी एकादशीचे व्रत करीन.

ए. मी ‘रामकृष्‍ण हरि’ हा मंत्र प्रतिदिन १०८ वेळा पठण करीन.

ऐ. मी ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकारामांची गाथा’ हे ३ ग्रंथ नियमित वाचीन.

ओ. मी प्रतिदिन हरिपाठ करीन आणि त्‍याविना जेवणार नाही.

औ. संत ज्ञानेश्‍वरांचे ‘पसायदान’ म्‍हटल्‍याविना मी जेवणार नाही.

क. मी नेमाने स्नान झाल्‍यावर गोपीचंदनाच्‍या मुद्रा लावीन.

ख. मी कपाळी बुक्‍का लावल्‍याविना व्‍यवहार करणार नाही.

ग. प्रपंचातील वाट्याला आलेले कार्य श्री विठ्ठलाच्‍या साक्षीने प्रामाणिकपणे पार पाडले कि नाही ? हे सांगण्‍यासाठी मी प्रतिवर्षी वारीस जाईन.

घ. पूर्वी एक म्‍हण होती, ‘वारकरी वारीत पहावा. वारीत न दिसला, तर श्री विठ्ठलचरणी रुजू झाला’, असे समजावे. मी हे पाळीन.

च. मी वारीला आल्‍यावर चंद्रभागेचे स्नान करून नगरप्रदक्षिणा करीन.

छ. मी वारीला आल्‍यावर नामस्‍मरण, सेवा, प्रवचन, भजन, कीर्तन आणि श्रवण करीन.

ज. मी भजनात, नामस्‍मरणात काळ घालवीन.’

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्‍पात

(साभार : ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, दिवाळी विशेषांक २०१४)