आगरा येथे पोपटाने दिलेल्या सूचनेवरून पोलीस खुन्यांपर्यंत पोचले !

हत्या करणार्‍या दोघांना जन्मठेपेची शिक्षा !

९ वर्षांपूवी झालेल्या नीलम शर्मा यांच्या हत्येचे गूढ पोपटाने सोडवले !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथे ९ वर्षांपूवी झालेल्या महिलेच्या हत्येच्या प्रकरणी  विशेष न्यायाधीश महंमद रशीद यांनी आशुतोष गोस्वामी आणि रॉनी मेसी यांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. (‘९ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)  यासोबतच दोषींना ७२ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. महिलेसोबतच गुन्हेगारांनी तिच्या पाळीव कुत्र्यालाही ठार मारले होते. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या घरातील पोपटाच्या साक्षीवरून मारेकर्‍यांचा माग काढला होता. या हत्येतील एक दोषी महिलेचा नातेवाईक होता.

१. पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना कोणताही सुगावा लागला नाही.

२. पोलीस अन्वेषणासाठी मृत महिलेच्या घरी पोचले तेव्हा पिंजर्‍यात असलेला ‘मिठू राजा’ नावाच्या पोपटाने ‘आशु आला’ असे म्हटले. हे नाव ऐकताच सर्वांनाच धक्का बसला. ‘ही व्यक्ती हत्या आणि दरोडा घडवून आणू शकते’, यावर कुणाचाही विश्‍वास बसत नव्हता; कारण मारेकरी आशुतोष हा मृत नीलम यांचे पती विजय शर्मा यांचा भाचा होता.

 (सौजन्य : Crime Tak)

३. त्यानंतर नीलम शर्मा यांचे पती विजय शर्मा पोपटाशी बोलले, तेव्हा पोपटाने पुन्हा ‘आशु आला’, असे सांगितले. शर्मा यांनी ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आशुतोष आणि रॉनी यांना कह्यात घेऊन अन्वेषण चालू केले. या अन्वेषणात हत्येचे रहस्य उलगडले.