बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने स्वीकारला हिंदु धर्म !

रायपूर (छत्तीसगड) – महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने २१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मात प्रवेश केला. या दिवशी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी छत्तीसगडमध्ये त्यांचा दरबार आयोजित केला होतो. ‘आज या बहिणीने बालेश्‍वर बालाजीचा चमत्कार पाहून आणि सनातन हिंदु धर्माला सर्वस्व मानत स्वत:च्या इच्छेनुसार हिंदु धर्म स्वीकारला आहे’, असे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर काही लोक अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करत आहेत.

हिंदु धर्म सभ्यतेचा धर्म ! – सुलताना बेगम

सुलताना बेगम हिने सांगितले, ‘मी छत्तीसगडच्या बिलासपूरची आहे. माझ्या वडिलांचे नाव आमिर खान आणि आईचे नाव शर्वरी बेगम आहे. मी मूर्तींची पूजा करते; म्हणूनच माझ्या कुटुंबियांनी मला सोडून दिले आहे. हे लोक मला सांगतात की, मी इस्लामच्या नावावरचा कलंक आहे. जर मी मेले, तर नरकात जाईन.’ त्या पुढे म्हणतात, ‘माझे मन म्हणते की, हिंदु धर्मापेक्षा चांगला धर्म दुसरा असूच शकत नाही; कारण हा धर्म सभ्यतेचा धर्म आहे. इथे भाऊ-बहिणीत विवाह होत नाहीत.  इथे महिलांचे आयुष्य वाया जात नाही. या धर्मात तिहेरी तलाक नाही. यामध्ये सात फेर्‍यांचा विवाह असतो. त्यात कुंकू महत्त्वाचे असते, मंगळसूत्र महत्त्वाचे असते. संपूर्ण सोळा संस्कारांना महत्त्व आहे.’ (लव्ह जिहादला बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करणार्‍या हिंदु मुलींच्या डोळ्यांत अंजन घालणारे विधान ! – संपादक)