श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. ईश्वरप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाचा गुरूंनी सांगितलेली सेवा झोकून देऊन करतांना कितीही संघर्ष झाला, तरीही त्याने तो सहन करणे आवश्यक !

‘जर एखाद्या साधकाने सर्वसंगपरित्याग करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे, तर त्याने गुरु सांगतील ती सेवा झोकून देऊन करावी, मग कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल. या संघर्षाचे फळ गोडच असते. गुरु शेवटी साधकाला चिरंतन अशा आनंदमय ईश्वराची प्राप्ती करून देतातच; परंतु मायेचे तसे नसते. मायेत होणारा संघर्ष शेवटी आपल्या पदरात दुःखच टाकतो. तो आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकवतो.

तात्पर्य : मायेत अडकवणार्‍या भावनेतील विचारांमध्ये रहाण्याऐवजी ज्या देवाने आयुष्य दिले आहे, त्या देवाला अनुभवण्यासाठी भावस्थितीत रहाण्याचा अखंड प्रयत्न करावा.

२. जिज्ञासू

जिज्ञासूपणा असणे, म्हणजे आपल्यामध्ये नवनवीन शिकण्याची वृत्ती असणे. प्रत्येक गोष्टीतील नाविन्यता साधना करण्यात आपला उत्साह वाढवते. उत्साहामुळे नवनवीन शिकण्याची वृत्ती जागृत राहिल्याने आपला आनंदही टिकून रहातो. याच आनंदात ईश्वराची प्रसन्नता असते.

३. खरा ज्ञानी

हा अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)