ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘रे’ आणि ‘कोमल ‘रे’ या स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या अन् त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

श्री. प्रदीप चिटणीस

‘२६.२.२०२२ या दिवशी ‘ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांपैकी ‘शुद्ध ‘रे’ आणि ‘कोमल ‘रे’ या स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या अन् आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रयोग करण्यात आले. या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी केलेले ‘शुद्ध ‘रे’ या स्वराचे गायन ऐकल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना ‘शुद्ध ‘रे’ हा स्वर ऐकतांना शक्तीची स्पंदने जाणवली.

२. ‘मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांची शुद्धी होत आहे’, असे त्यांना जाणवले.

३. ‘या चक्रांची शुद्धी झाल्यावर चैतन्याची स्पंदने वाढली आणि ही स्पंदने अनाहत, विशुद्ध, आज्ञा अन् सहस्रारपर्यंत पोचत आहेत’, असे त्यांना जाणवले.

४. अशा प्रकारे प्रथम शक्ती, नंतर चैतन्य आणि त्यानंतर सहस्रार पर्यंत स्पंदने पोचल्यावर त्यांना सर्वत्र आनंदाची स्पंदने पसरलेली जाणवली.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.२.२०२२)

१. श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘रे’ (टीप १) अन् ‘कोमल ‘रे’ (टीप २) या स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेला परिणाम

कु. तेजल पात्रीकर

टीप १ – जेव्हा सातही स्वर आपल्या मूळ जागेवरच (त्यांच्या मूळ कंपनस्थानी (frequency ला)) असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’, असे म्हणतात.

टीप २ – जो स्वर आपली मूळ जागा सोडून खालच्या कंपनस्थितीला येतो; परंतु मागील स्वरापेक्षा अधिक कंपनसंख्येचा असतो, त्याला ‘कोमल स्वर’, असे म्हणतात.

१ अ. ‘शुद्ध ‘रे’ या स्वराचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेला परिणाम

१ अ १. साधकांना आलेल्या अनुभूती

अ. सौ. कल्पना शर्मा यांना बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले.

आ. श्री. साहस शिरोडकर यांना श्री गणपति आणि श्री सरस्वतीदेवी यांचे तत्त्व जाणवले, तसेच त्यांना वायुतत्त्वाचा थंडावा अन् तेजतत्त्व जाणवले.

१ अ २. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यात्मिक त्रास नसलेल्या काही साधकांतील नकारात्मक ऊर्जा ५० टक्के न्यून झाली आणि काही साधकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली अन् सकारात्मक ऊर्जा ४० ते ५० टक्के वाढली.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ आ. ‘कोमल ‘रे’ या स्वराचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेला परिणाम

१ आ १. साधकांना जाणवलेली सूत्रे

अ. या स्वरात ‘तारक तत्त्व’ अधिक जाणवले.

आ. हा स्वर गायल्याने साधकांच्या षड्चक्रांच्या शुद्धीची प्रक्रिया जलद गतीने झाली.

इ. साधकांना देवळाच्या गाभाऱ्यातील शांतीची स्पंदने जाणवली. त्या वेळी सर्व साधकांनी गाढ ध्यानावस्था अनुभवली.

ई. हा स्वर निर्गुण स्तरावर जाणवला.

उ. या प्रयोगाच्या शेवटी साधक शांत स्थितीत गेल्याने ‘त्यांना पुढील काही कृती करूया’, असे वाटत नव्हते.

१ आ २. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यत्मिक त्रास नसलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि सकारात्मक ऊर्जा ४० ते ५० टक्के वाढली.

२. श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘रे’ अन्  ‘कोमल ‘रे’ या स्वरांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम 

२ अ. ‘शुद्ध ‘रे’ या स्वराचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

२ अ १. साधकांना जाणवलेली सूत्रे

अ. अनेक स्वरांपेक्षा एकल स्वराचे गायन उपायांच्या दृष्टीने अधिक शक्तीशाली आणि प्रभावी असल्याचे जाणवले.

आ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘शुद्ध ‘रे’च्या गायनाला आरंभ केल्यावर आरंभी साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून बडबड करत होत्या आणि गाणी म्हणत होत्या; परंतु ‘शुद्ध’ रे’ या स्वराच्या प्रभावामुळे १० मिनिटांतच त्या शांत झाल्या’, असे मला जाणवले. ‘शुद्ध ‘रे’ या स्वरामुळे साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्ती बांधल्या गेल्या आहेत’, असे जाणवले.

इ. श्री. प्रदीप चिटणीस यांच्या ‘शुद्ध ‘रे’ या स्वराच्या गायनाने चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींना ते पेलवत नव्हते. त्यामुळे त्या सूक्ष्मातून विविध कृतींच्या माध्यमातून ‘त्यांना त्रास देणाऱ्या वाईट शक्ती ‘शुद्ध ‘रे’ या स्वराच्या नादाशी सूक्ष्मातून लढत होत्या’, असे जाणवत होते.

ई. ‘शुद्ध ‘रे’ या स्वरात मला शक्ती जाणवली. ‘हा स्वर सगुणाशी निगडित आहे’, असे मला जाणवले.

२ अ २. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा ८० ते ९० टक्के न्यून झाली आणि सकारात्मक ऊर्जा दुपटीने वाढली.

२ आ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या ‘कोमल ‘रे’ या स्वराचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

२ आ १. साधकांना जाणवलेली सूत्रे

अ. ‘कोमल ‘रे’ या स्वराचा प्रयोग चालू होण्याच्या आधीपासूनच साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींनी सूक्ष्मातून अनावश्यक बडबड करून वातावरण नकारात्मक करण्यास आरंभ केले.

आ. या स्वरामुळे अधिक प्रमाणात उष्णता निर्माण होत असल्याचे सगळ्या साधकांना जाणवत होते. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना चैतन्य मिळण्याच्या दृष्टीने अग्नीबाण सोडल्यासारखे मला आणि साधकांना जाणवत होते. आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधिकेला हा स्वर ऐकल्यावर तिच्या संपूर्ण शरिरातील उष्णता वाढल्याचे जाणवले.

इ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘कोमल ‘रे’ गाणे चालू केल्यावर एका साधिकेला त्रास देणाऱ्या वाईट शक्तीला या स्वरातील चैतन्य सहन झाले नाही. त्यामुळे ती त्रासून श्री. चिटणीसकाका ज्या विविध पद्धतीने ‘कोमल ‘रे’ गात होते, त्याच पद्धतीने सूक्ष्मातून ‘नको रे’, ‘कशाला रे’, ‘बस कर रे’, असे म्हणून ‘कोमल ‘रे’च्या नादाशी प्रतिनाद उत्पन्न करून शेवटपर्यंत लढत होती. ‘वाईट शक्तीला तो नाद सहन होत नव्हता’, असे जाणवले.

ई. ‘या स्वरामुळे परिणामकारक उपाय होत असल्याने साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्ती हवालदिल होऊन अस्वस्थ झाल्या आहेत’, हे लक्षात येत होते.

उ. या स्वराचा परिणाम ‘निर्गुण’ स्तरावरचा जाणवला.

२ आ २. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा ५० ते ८० टक्के न्यून झाली आणि सकारात्मक ऊर्जा दुपटीने वाढली.

३. निष्कर्ष

मंत्रामध्ये अधिक शब्द असतात. त्या तुलनेत नामजपात अल्प शब्द असतात, तर बीजमंत्रात केवळ एखादाच शब्द असतो. ‘जेवढे सूक्ष्म, तेवढे शक्तीशाली’ असे शास्त्र आहे. त्यामुळे बीजमंत्रात सर्वाधिक शक्ती आहे. या ठिकाणी श्री. चिटणीस यांनी केवळ एकच स्वर म्हटला. त्यामुळे वरील तत्त्वाप्रमाणे ‘अनेक स्वर म्हणण्यापेक्षा एक स्वर म्हणण्याचा परिणाम अधिक पटींनी होतो’, हे या प्रयोगातून शिकायला मिळाले. ‘रे’ हा स्वर तेजतत्त्वाशी संबंधित असल्याने साधकांनाही या स्वराच्या प्रयोगात उष्णता जाणवली. ऋषिमुनींनी परिपूर्ण शास्त्र लिहून ठेवून संपूर्ण मानवजातीवर उपकार केले आहेत.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.२.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक