चैत्र प्रतिपदा या ‘युगादि तिथी’ला नववर्षारंभ म्हणून राजमान्यता मिळण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित करा !

गुढीपाडव्यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘चैत्र प्रतिपदा ही युगादि तिथी आहे. ‘युग’ आणि ‘आदि’ या शब्दांच्या संधीपासून ‘युगादि’ शब्द बनला आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. सृष्टीचा प्रारंभदिन म्हणजेच कालगणनेचा प्रथमदिन चैत्र प्रतिपदा असूनही आज १ जानेवारी हा दिवस भारतात सर्वत्र नववर्षारंभ म्हणून साजरा करण्यात येतो. हा स्वतंत्र भारताचा सांस्कृतिक पराभव आहे. युगादि तिथीचे अनादीपण लक्षात घेऊन, तसेच सांस्कृतिक पराभवाचा इतिहास पालटण्यासाठी चैत्र प्रतिपदा या ‘युगादि तिथी’ला नववर्षारंभ म्हणून राजमान्यता मिळाली पाहिजे. यासाठी भारत संवैधानिक दृष्टीने ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे अपरिहार्य आहे.

भारतातील पुरुषार्थी सम्राटांनी ‘युगादि तिथी’चे महत्त्व जाणून याच दिवसापासून ‘विक्रम संवत् (उज्जैनचा राजा विक्रमादित्याने चालू केलेली कालगणना)’, ‘शालिवाहन शक (इसवी सनाच्या ७८ व्या वर्षी शालिवाहन राजाने चालू केलेली कालगणना)’, ‘युधिष्ठिर संवत्’(युधिष्ठिर राजाने चालू केलेली कालगणना) अशा कालगणना आरंभल्या. त्यांच्या पराक्रमी स्मृतींचे स्मरण करण्याची ही वेळ आहे. हिंदूंनो, चैत्र प्रतिपदा ही ‘युगादि तिथी’ नववर्षारंभदिन म्हणून राजमान्य होण्यासाठी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि राजनैतिक प्रयत्नांची पराकाष्ठा करा अन् भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित करा !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष