भारताला कारवाईसाठी भाग पाडल्यास पाककडून मोठी किंमत वसूल करू !

सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांचा पाकिस्तानला दम

आता केवळ वक्तव्य नाही, तर सक्षम सैन्यप्रमुखांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक

सैन्यप्रमुख मनोज नरवणे

नवी देहली – सीमाभागात पाककडून कुरापती चालूच आहेत. आतंकवाद्यांकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रयत्न भारतीय सैनिकांकडून हाणून पाडले जात असले, तरी यातून पाकिस्तानचा छुपा अजेंडाच (धोरणच) वारंवार सिद्ध होतांना दिसत आहे, असे वक्तव्य भारताचे सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांनी भारताची भूमिका स्पष्ट करतांना केले. आतंकवादाच्या सूत्रावरून नरवणे यांनी पाकला सज्जड दम देत, ‘आम्हाला कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करू’, असेही सैन्यप्रमुख नरवणे यांनी पाकिस्तानला उद्देशून म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यामध्ये १४ वी सैन्यस्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये सैन्यप्रमुख नरवणे हेसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सीमाभागातील घुसखोरी आणि पाकिस्तान, तसेच चीनसमवेतचे भारताचे संबंध यांविषयी भूमिका स्पष्ट केली.

जनरल नरवणे म्हणाले की,

१. चीनकडील सीमारेषेवरदेखील भारतीय सैन्य कोणत्याही कारवाईसाठी सज्ज आहे.

२. गेल्या वर्षी जानेवारी मासापासून उत्तर आणि पश्‍चिम येथील सीमाभागात सकारात्मक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आम्ही चर्चेच्या मार्गाने शांतता आणण्याचा प्रयत्न करत असतांनाच उत्तरेकडील सीमारेषेवर भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज आहे.