गुरुकार्याची पूर्ण फलनिष्पत्ती कशावर अवलंबून असते ?

पू. संदीप आळशी

‘साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्‍या बर्‍याच जणांना वाटते, ‘गुरुकार्य अपेक्षित वेळेत किंवा समयमर्यादेत पूर्ण करणे’, हीच गुरुकार्याची फलनिष्पत्ती आहे. हे जरी योग्य असले, तरी हे साध्य करतांना ‘गुरुकार्यात सहभागी असणार्‍या प्रत्येकच साधकाच्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली आहे ना ? साधकाला त्याच्या कौशल्यानुसार सेवा दिली आहे ना ? त्याची सेवेतील क्षमता विकसित होत आहे ना ?’, हे पहाणेही आवश्यक आहे. यांसह साधकाच्या साधनेचीही फलनिष्पत्ती चांगली आहे ना ? (उदा. त्याची व्यष्टी साधना चांगली होत आहे ना ? त्याला सेवेतून आनंद मिळत आहे ना ? त्याच्यामध्ये सहसाधकांविषयी कुटुंबभावना निर्माण होत आहे ना ?)’, हे पहाणेही महत्त्वाचे आहे.

दायित्व असलेल्या साधकांनी वरील दृष्टीकोनानुसार गुरुकार्य करायचा प्रयत्न केल्यास गुरुकार्याची पूर्ण फलनिष्पत्ती मिळेल, तसेच त्यांची समष्टी साधनाही चांगली होईल.’

– (पू.) संदीप आळशी (६.११.२०२१)