इंडोनेशियातील मुसलमानांना हिंदु धर्माचे आकर्षण !

मुसलमानबहुल इंडोनेशियात रामायण आणि महाभारत शिकवले जात असतांना भारतात ते शालेय शिक्षणात नसणे भारतियांना लज्जास्पद !

‘इस्लाम आमचा धर्म आहे, तर रामायण आमची संस्कृती आहे !’

१. गेल्या काही दशकांमध्ये इंडोनेशियातील लक्षावधी लोकांनी इस्लाम सोडून हिंदु धर्म स्वीकारणे

‘इंडोनेशियाचे संस्थापक आणि प्रथम राष्ट्रपती सुकर्णाे यांची मुलगी सुकमावती यांनी २६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी इस्लाम सोडून हिंदु धर्म स्वीकारला. या देशात हिंदूंची लोकसंख्या ही केवळ २ टक्क्यांहून अल्प आहे. येथील १७ सहस्रांहून अधिक बेटांमध्ये केवळ बाली या बेटावर हिंदू बहुसंख्यांक आहेत. असे असतांनाही ज्या प्रकारे लोक हिंदु धर्मात परत येत आहेत, ते एखाद्या आश्चर्याहून अल्प नाही. इंडोनेशियाच्या हिंदूंकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी मोठी सामाजिक संघटना नाही किंवा भाजपसारखे राजकीय संघटन नाही. त्यांच्याकडे कोणता मठ किंवा मठाधीश नाही, ना त्यांच्याकडे अदानी किंवा अंबानी आहेत, तरीही असे वाटते की, विश्वातील एका सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या देशातील लोक आता हिंदु होण्यास आतूर झाले आहेत.

७० च्या दशकामध्ये सर्वप्रथम सुलावेसी बेटावरील तोराजा लोकांनी हिंदु धर्मात परत येण्याची संधी ओळखली होती. वर्ष १९७७ मध्ये सुमात्राच्या कारो आणि बाटाक, तसेच वर्ष १९८० मध्ये कालीमंतनचे गाजू आणि दायक देखील हिंदूंच्या छत्रछायेत परत आले. त्यानंतर अनेक जिवात्मवादी आणि जमाती यांनी त्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी, तसेच इस्लाम अन् ख्रिस्ती यांच्या दबावापासून वाचण्यासाठी स्वत:ला हिंदु घोषित केले. याशिवाय वर्ष १९६५ मधील उलथापालथीच्या वेळी स्वत:ला मुसलमान घोषित करणार्‍या जमातीचे लक्षावधी लोक आता हिंदु धर्मात परत येत आहेत.

जावामध्ये शिक्षण झालेल्या सुदेवी वर्ष १९९० मध्ये न्यायाधीश बनल्या होत्या. त्यांचे पालनपोषण मुसलमान म्हणून झाले होते, तरीही त्यांनी नंतर हिंदु धर्म स्वीकारला. रवि कुमार यांनी त्यांच्या ‘इंडोनेशियामध्ये हिंदूंचे पुनरुत्थान’ या पुस्तकामध्ये इंडोनेशियातील १० लाखांहून अधिक मुसलमानांनी हिंदु धर्मात प्रवेश केल्याची गोष्ट सांगितली आहे. या पुस्तकात त्यांनी नमूद केले की, ‘वर्ष १९९९ च्या एका अहवालामध्ये ‘नॅशनल इंडोनेशियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक’ ने मान्य केले होते की, गेल्या २ दशकांमध्ये जावा येथे रहाणारे अनुमाने १ लाख लोक इस्लामचा त्याग करून अधिकृतपणे हिंदु धर्मात परत आले आहेत. वर्ष २०१७ मध्ये जावाची राजकुमारी कांजेंग महेंद्राणी हिनेही हिंदु धर्म स्वीकारला होता. अलीकडच्या वर्षांमध्ये सुकर्णाेच्या कुटुंबाशी संबंधित अनेक लोकांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे. ज्यात सर्वांत ताजे नाव ‘सुकमावती’ यांचे आहे. इंडोनेशियामध्ये ‘सुकमावती’चा प्रभाव बघता त्यांचे अनुयायीही त्यांच्या मागे हिंदु धर्मामध्ये परत येतील, असा कयास लावला जात आहे.

२. इंडोनेशियातील मुसलमानांनी हिंदु धर्म स्वीकारण्यामागील कारणे

अ. सुकमावतीने हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर भारतीय माध्यमांनी प्रामुख्याने सबदापालन यांच्या भविष्यवाणीची आठवण करून दिली. वर्ष १४७८ मध्ये महापहित साम्राज्याचा शेवटचा शासक ब्रविजय पंचम याने इस्लाम स्वीकारल्याने सबदापालन यांनी त्याला शाप दिला होता की, ५०० वर्षांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुसलमान झालेले सर्व हिंदु धर्मात परत येतील आणि हिंदु धर्माची पुनर्स्थापना करतील.

आ. हे खरे आहे की, वर्ष २००४ मध्ये हिंदी महासागरामध्ये आलेल्या सुनामीमध्ये इंडोनेशियातील २ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वर्ष २००६ मध्ये आलेल्या भूकंपामुळे ५ सहस्रांहून अधिक लोकांनी जीव गमावला होता. त्यानंतर जावामध्ये भूकंप आला होता. या घटनांमुळे तेथील लोक सबदापालन यांच्या भविष्यवाणीला मोठ्या गांभिर्याने घेत आहेत, तसेच अशा आपत्तींपासून रक्षण करण्यासाठी पितृक हिंदु धर्मामध्ये परत येत आहेत. असे असले, तरी हिंदु धर्म स्वीकारण्यामागे सबदापालनचा शाप आणि भविष्यवाणी एवढेच एक कारण नाही. काही अन्य कारणेही आहेत. सर्वांत पहिले कारण, म्हणजे इंडोनेशियातील लोकांना खरा इतिहास समजणे आणि त्यांच्या पूर्वजांप्रती सन्मान असणे, हे आहे. प्रसिद्ध प्राध्यापक शंकर शरण यांनी एकदा म्हटले होते की, भारतीय मुसलमानांसमोर जर त्यांचा खरा इतिहास ठेवला, तर ते दुसर्‍याच क्षणी इस्लामला सोडून देतील.

(सौजन्य : News Now)

इ. अद्याप स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनीही हिंदूबहुल भारतीय राज्य हे करण्यास सक्षम होऊ शकले नाही; परंतु मुसलमानबहुल इंडोनेशियाने हे करून दाखवले आहे. येथे मजपहित साम्राज्य आणि अन्य हिंदु साम्राज्य यांच्या यशाला अतिशय महत्त्व दिले जाते. ‘गजह मद’ यांच्यासारखे हिंदु सेनापती येथील राष्ट्रीय नायक आहेत. येथील मुसलमानांना ठाऊक आहे की, त्यांचे पूर्वज तुर्क किंवा अफगाणिस्तान येथून आलेले लुटारू नव्हते, तर सर्वधर्मसमभाव ठेवणारे हिंदूच होते. त्यामुळे आपल्या भूतकाळातील मूळ धर्मात प्रवेश करणे आणि पूर्वजांच्या धर्माचा स्वीकार करणे, हा येथे अभिमानाचा विषय बनला आहे.

३. रामायण आणि महाभारत यांच्या प्रभावामुळे इंडोनेशियातील मुसलमान हिंदु धर्माकडे आकर्षित होणे

येथील संस्कृतीवर रामायण आणि महाभारत यांचा मोठा प्रभाव आहे. इंडोनेशियाची रामलीला जगभरात प्रसिद्ध आहे. सुकर्णाेच्या काळात एकदा पाकिस्तानच्या एका प्रतिनिधी मंडळाला इंडोनेशियामध्ये रामलीला पहाण्याची संधी मिळाली. तेव्हा एका इस्लामी राष्ट्रामध्ये रामलीला सादर होत असल्याविषयी या प्रतिनिधी मंडळातील लोकांना अतिशय आश्चर्य वाटले होते. हा प्रश्न त्यांनी सुकर्णा यांनाही केला. तेव्हा सुकर्णा यांनी त्वरित उत्तर दिले की, ‘इस्लाम आमचा धर्म आहे, तर रामायण आमची संस्कृती आहे !’

असे म्हणणे अतिशियोक्तीपूर्ण होणार नाही की, इंडोनेशियाच्या मुसलमानांना रामायण आणि महाभारत यांविषयी भारतियांहूनही अधिक माहिती आहे. येथील लोकांच्या पेशीपेशीत या दोन महान ग्रंथांतील चरित्रे वास करतात. येथे घरोघरी रामायण आणि महाभारत यांचे पठण केले जाते. येथे रामायण आणि महाभारत यांच्यातील चरित्रांच्या आधारावर नाव ठेवणे सर्वसामान्य गोष्ट आहे. येथे या चरित्रांचा उपयोग शालेय शिक्षणासाठीही होत असतो. शिवाय येथे वर्षभर रामायण आणि महाभारत यांच्यावर आधारित कार्यक्रम होत असतात. रामायण आणि महाभारत यांच्या प्रभावामुळे इंडोनेशियातील मुसलमान हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. आज इंडोनेशियाचे मुसलमान कुराणही वाचतात आणि रामायण-महाभारतही वाचतात. हिंदीचे प्रसिद्ध विद्वान फादर कामिल बुल्के यांनी वर्ष १९८२ मध्ये त्यांच्या एका लेखामध्ये लिहिले होते, ‘३५ वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने जावामधील गावामध्ये एका मुसलमान शिक्षकाला रामायण वाचतांना पाहिले. तेव्हा त्याने शिक्षकाला विचारले की, तुम्ही रामायण का वाचत आहात ? तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी अधिक चांगला मनुष्य बनण्यासाठी रामायण वाचत आहे.’’

४. इंडोनेशियातील खोदकामांमध्ये सतत हिंदु मंदिरे मिळत असल्याने तेथील लोकांमध्ये हिंदु धर्माविषयी कुतूहल आणि जिज्ञासा उत्पन्न होणे

येथील खोदकामांमध्ये विविध ठिकाणी हिंदु मंदिरे मिळत आहेत, त्यामुळे जनतेमध्ये हिंदु धर्माविषयी कुतूहल आणि जिज्ञासा उत्पन्न होत आहे. भारतामध्ये हिंदूंना त्यांचे एक श्रीराममंदिर बांधण्यासाठी मुसलमानांशी लांबलचक संघर्ष करावा लागला; याउलट इंडोनेशियाच्या मुसलमानांनी तेथील भूमीमधून हिंदु आणि बौद्ध मंदिरे शोधून काढली आहेत, तसेच त्यांना परत उभे करून पुनर्जिवित करण्याचा प्रयत्नही करत आहेत.

जावामध्ये १५ मोठी मंदिरे शोधण्यात आली आहेत. ज्यात परबनन शिव मंदिर आणि बोरोबुदुर बौद्ध विहार प्रमुख आहेत. एकट्या बाली बेटावर २० सहस्रांहून अधिक मंदिरे आहेत, जी स्वत:च एक मोठी गोष्ट आहे. याशिवाय जकार्ता आणि अन्य बेटांवरही अशी अनेक मंदिरे शोधण्यात आली आहेत. त्यामुळे इंडोनेशियाचे मुसलमान सातत्याने हिंदु धर्माशी संबंध अनुभवत आहेत. हाच अनुभव त्यांना हिंदु धर्मामध्ये परतण्याची प्रेरणा देत आहे.

५. इंडोनेशियामध्ये बहुसंख्य हिंदू रहात असलेल्या बेटांवर धर्मांधांनी आतंकवादी आक्रमणे करणे

इंडोनेशियामध्येही इस्लामी धर्मांधता वाढत आहे. हे खरे आहे की, इंडोनेशियाचे सुलतान हिंदूंना बलपूर्वक मुसलमान बनवण्यात यशस्वी झाले; परंतु येथे मुसलमान शासकांची सत्ता अधिक काळ टिकली नाही. त्यामुळे नवीन मुसलमानांचे पूर्णतः इस्लामीकरण होऊ शकले नाही, जसे भारतात झाले. याच कारणामुळे उपासना पद्धती आणि काही प्रथा-परंपरा सोडल्या, तर येथील लोक हिंदु संस्कृतीच जोपासत आले आहेत.

आता काळाप्रमाणे येथेही धर्मांध शक्ती सक्रीय होत आहेत. परिणामी येथेही हिंदू-मुसलमान यांच्यात तणाव निर्माण होत आहे, तसेच आतंकवादीही पाय पसरत आहेत. वर्ष २००२ मध्ये बाली बेटावर आतापर्यंतचे सर्वांत धोकादायक आतंकवादी आक्रमण झाले होते आणि या आक्रमणात २४० लोक मृत्यूमुखी पडले होते. वर्ष २००५ मध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी साखळी बाँबस्फोटांमध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक घायाळ झाले. बाली बेट हिंदूबहुल असल्यामुळे त्याला आतंकवादी आक्रमणासाठी निवडण्यात आले होते, असे बाली बाँबस्फोटातील दोषी अब्दुल अझिज याने मान्य केले होते. वर्ष २०१२ मध्ये सुमात्रा बेटावरील हिंदूंवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण केले होते. त्यातही १४ जणांचा मृत्यू झाला होता आणि १ सहस्रांहून अधिक हिंदू बेघर झाले होते. अशा प्रकारच्या इस्लामिक धर्मांधतेमुळे येथील लोकांना वास्तविकता समजत आहे. इंडोनेशियामध्ये सबळ होत असलेल्या वहाबी विचारसरणीमुळे येथील लोकांचा इस्लामवरील विश्वास उडत चालला आहे आणि ते हिंदु धर्मात परत येत आहेत.’

(साभार : ‘ऑपइंडिया, हिंदी’ संकेतस्थळ)