धार्मिक दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करा !

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार अतुल भातखळकर

मुंबई – त्रिपुरा येथे मशिदी पाडल्याच्या कथित घटनेवरून धर्मांधांची माथी भडकावून महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे काम रझा अकादमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की,…

१. पोलिसांवर आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ करण्यापर्यंत रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांची मजल गेली आहे. अशा प्रकारे देश आणि समाज यांच्या विरोधात कृत्य करणार्‍या धर्मांध प्रवृत्तींना खतपाणी घालणार्‍या रझा अकादमीच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी.

२. महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोक रहातात. प्रतिवर्षी अशा पद्धतीने धार्मिक दंगली घडवण्याचे काम रझा अकादमीकडून केले जाते. ऑगस्ट २०१२ मध्ये रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत मोर्च्याच्या वेळी ‘अमर जवान स्मारका’ची तोडफोड केली होती. महिला पोलिसांचे कपडे फाडण्याचा संतापजनक प्रकार केला होता. त्या वेळी शिवसेनेनेही रझा अकादमीवर बंदी घालण्याची आग्रही मागणी केली होती.

३. कोरोनाच्या काळात फ्रान्समधील कथित मुसलमानविरोधी कायद्याच्या विरोधात मुंबईच्या अनेक भागांत आंदोलन करत दंगल भडकावण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणार्‍या महाराष्ट्रात औरंगजेबी प्रवृत्तींना वेळीच ठेचणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता रझा अकादमीवर कठोर कारवाई करावी.