गोमातेचे रक्षण !

संपादकीय

गोमतेचे रक्षण होण्यासाठी आता संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याचे आवाहन अलाहाबाद उच्च न्यायालयाने केले आणि ‘गोमातेच्या कल्याणात देशाचे कल्याण आहे’, असे म्हटले. प्रत्येक गोरक्षक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ही समाधानाची गोष्ट आहे; परंतु ‘गोहत्यार्‍यांना मुळाशी जाऊन कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशी विधाने ही केवळ विधानेच रहातील’, असे धर्मप्रेमींना वाटते. ब्रिटिशांनी मुसलमान आणि दलित यांना हाताशी धरून भारताचा धार्मिक आणि आर्थिक कणा असलेली ‘गाय’ नेस्तनाबूत करण्याचा जणू विडा उचलला होता. त्यांनी भारतात पशूवधगृहे चालू केली. वर्ष १८५७ च्या उठावात गायीच्या चरबीचा वापर झाल्याच्या वृत्ताने हिंदु सैनिक खवळले आणि नंतर प्राणपणाने लढले. वर्ष १८८० मध्येही ‘गोवध बंदी चळवळी’ने मोठा असंतोष पसरवला होता. वर्ष १९४८ मध्ये राज्यघटनेत गोहत्या बंदीचे कलम असूनही प्रत्यक्षात ते अस्तित्वात आले नाही. वर्ष १९६६ मध्येे गोरक्षणासाठी काढलेल्या संतांच्या मोर्च्यावर इंदिरा गांधी यांनी गोळीबाराचे आदेश दिले. त्या वेळी अनेक संतांनी देह ठेवला. महाराष्ट्रात वर्ष १९९५ मध्ये गोहत्या बंदीचा कायदा संमत होऊनही १९ वर्षांनंतर म्हणजे २०१४ मध्ये त्याला राष्ट्रपतींकडून संमती मिळाली. ‘राज्यासह देशात आजपर्यंत बजरंग दलाचे किती कार्यकर्ते आणि अन्य गोरक्षक यांनी त्यांचे प्राण गोरक्षणासाठी दिले आहेत’, याची गणतीच नाही. संतांच्या आणि त्यांच्या जिवाचे मूल्य अन् गोमातेच्या प्राणांचे मोल असते, तर सरकारकडून भ्रष्टाचाराने बरबटलेला गोवंश हत्येचा व्यापार थांबवला गेला असता; परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.

गोहत्या अवैधच !

मांस उत्पादनांत जगात दुसरा क्रमांक असणार्‍या भारतात १ सहस्र १७६ मोठी पशूवधगृहे, ७५ आधुनिक पशूवधगृहे आणि सहस्रो अनधिकृत पशूवधगृहे आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (‘सीपीबीसी’ने) ‘या सर्व पशूवधगृहांमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून त्याच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना या पशूवधगृहांमध्ये नाहीत’, असा आक्षेप घेतला आहे. भारतात सर्वत्रच अनधिकृत पशूवधगृहांवर नियंत्रण मिळवण्यास प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना हप्ते जात असल्यानेच सर्वत्र अनधिकृत पशूवधगृहे बोकाळली आहेत. दक्षिण गोव्यातील अनधिकृत पशूवधगृहांच्या विरोधात प्रशासनाकडे निवेदने गेली आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

भाग्यनगर येथील पशूवधगृहांत प्रतिदिन सहस्रो गायींची हत्या केली जात असल्याचा दावा संकेतस्थळावर केला जातो. त्यात अनुमती नसतांनाही वासरांचा समावेश असतो. आशियातील सर्वांत मोठे पशूवधगृह हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील मुंबईत आहे. नागपूरमधील एका भागात तर घराघरांत गायी कापल्या जातात. गायींची हत्या करून त्यांच्या सर्व अवयवांची विक्री केल्यानंतर १० सहस्र रुपये मिळतात; मात्र एका गायीपासून प्रतीवर्षी २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. अर्थात् हे सर्व लक्षात येण्यासाठी आणि गोहत्यारांचे भारतातून पूर्णतः निर्दालन होण्यासाठी छत्रपतींसम हिंदवी स्वराज्याची (हिंदु राष्ट्राची) आवश्यकता आहे !