(म्हणे) ‘श्री सत्यनारायण कथा आणि भागवत कथा अवैज्ञानिक !’  

गुजरातचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांची बौद्धिक दिवाळखोरी !

  • अशा प्रकारचे विधान अन्य धर्मियांच्या श्रद्धांविषयी करण्याचे धारिष्ट्य इटालिया यांनी केले असते, तर काय झाले असते, याची कल्पना करता येईल !
  • हिंदू धर्माभिमानशून्य असल्याने हिंदु धर्माविषयी कुणीही वाट्टेल तसे बोलतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
डावीकडून गोपाल इटालिया

कर्णावती (गुजरात) – आम आदमी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘हिंदु आयटी सेल’चे अनुज मिश्रा यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सेलकडून याविषयीची माहिती सामाजिक माध्यमाद्वारे देण्यात आली आहे. इटालिया यांनी ‘श्री सत्यनारायण कथा आणि भागवत कथा अवैज्ञानिक आहेत’, असे म्हटल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१. या तक्रारीत म्हटले आहे की, इटालिया यांनी सामाजिक माध्यमातून एका व्हिडिओद्वारे हिंदूंच्या देवता, रूढी आणि परंपरा यांचा अवमान केला आहे. या व्हिडिओला जाणीवपूर्वक केवळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठीच बनवण्यात आले आहे. यामुळे हिंदूंच्या हितांकडे लक्ष देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

२. इटालिया यांच्या या विधानावरून त्यांचा विरोधही होत आहे. नुकतेच इटालिया सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले असता लोकांनी त्यांना विरोध केल्याने त्यांना माघारी जावे लागले होते.

इटालिया यांनी व्हिडिओमध्ये केलेली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी विधाने !

१. लोक सत्यनारायण कथा आणि भागवत कथा यांसारख्या अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करत आहेत. या सर्व गोष्टींचा काहीच उपयोग नाही आणि त्या अवैज्ञानिक आहेत.
२. अजूनही लोकांना कळत नाही की, हे सर्व करून त्यांना काय लाभ होणार आहे ? हे सर्व करून ते दुसर्‍यांचा वेळ वाया घालवत आहेत. आपण जर अशा गोष्टींवर ५ पैसे जरी खर्च करत असू, तर आपल्याला मनुष्याप्रमाणे जीवन जगण्याचा कोणताही अधिकार नाही.
३. अशा लोकांमुळे मला लाज वाटत आहे. मला त्यांचा रागही येतो. रूढी, परंपरा आणि संस्कृती यांच्या नावाखाली हिजड्यांप्रमाणे टाळ्या वाजवणार्‍यांची आम्हाला कोणतीही आवश्यकता नाही.
४. एखादा साधू मंचावरून काही तरी बोलला, तर आम्हाला हिजड्यांप्रमाणे टाळ्या वाजवायच्या आहेत का ?

(म्हणे) ‘कथावाचक आणि पुजारी लोकांची फसवणूक करतात !’

इटालिया यांनी ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष असण्यापूर्वीही हिंदु धर्माविषयी अश्‍लाघ्य विधाने केली होती. त्याचाही एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, सर्वसामान्य व्यक्ती श्रम करून जीवन जगतात; मात्र पुजारी, कथावाचक, तसेच लोकांचे भविष्य सांगणारे बसल्या बसल्या लोकांची फसवणूक करतात. त्यांनी धर्माला धंदा बनवले आहे. ते लोकांना धर्माची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. हे कथावाचक केवळ सूरत येथेच कथावाचन का करतात ? ते जर इतके मोठे आहेत, तर सीमेवर जाऊन का कथावाचन करत नाहीत ? त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर जाऊन कथावाचन करावे.