सात्त्विक आहार घेण्याचे नियम का पाळावेत ?

‘नरजन्माचे सार्थक’ हीच आहारशास्त्राच्या नियमांची खरी ध्येयप्राप्ती !

‘सत्त्वगुणी आहारातून प्रकृती जोपासणे, प्रकृतीतून मनाचे सत्त्वगुणाच्या साहाय्याने उत्थापन करणे, त्यानंतर बुद्धीला स्पर्श करून तिच्यातील प्रज्ञेला जागृती देऊन पुढे अहंला नियंत्रणात ठेवणे आणि नंतर चित्तावरील संस्कारांचे उच्चाटन करून नरजन्माचे सार्थक करून घेणे, हीच आहारशास्त्रविषयी नियमांची खरी ध्येयप्राप्ती आहे.’

– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

तूप वाढलेले अन्न सात्त्विक होय !

अन्नावर वाढलेले तूप अन्नशुद्धी करते, तसेच शरिराला स्नेह (स्निग्धता) आणि सात्त्विकता प्रदान करते. वरण-भातावर ‘अन्नशुद्धी’ या नावाने तूप वाढण्याची पद्धत आहे. तूप हे अन्नशुद्धीकारक असल्याने ते खाल्ल्यावर अन्नातीलच नव्हे, तर अन्न पोटात गेल्यावर तेथीलही बाधाकारक गोष्टींचा नाश करते.

‘ईश्‍वरी प्रसाद’ म्हणून ग्रहण केलेले अन्न शरिराला पुष्टी आणि तुष्टी देते !

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥

​हा समर्थ रामदासस्वामींचा श्‍लोक सर्वांनाच ठाऊक आहे. अन्नाचे सेवन करतांना नामजप केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि असे सात्त्विक अन्न प्राणशक्ती देते. अन्नालाच ‘पूर्णब्रह्म’ म्हटलेले आहे. अन्न ग्रहण करणे, हे नुसते ‘उदरभरण’ नसून ‘यज्ञकर्म’ आहे, असाही उल्लेख यात केला आहे. ‘ईश्‍वरी प्रसाद’ म्हणून सेवन केलेले अन्न हे ब्रह्मस्वरूप असून ते शरिराला पुष्टी आणि तुष्टी देते.

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.