पद, प्रतिष्ठा आणि प्रलोभने यांकडे दुर्लक्ष करून केवळ धर्मासाठी निरपेक्षपणे कृती करणे आवश्यक ! – मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘जय श्रीराम सेने’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री. मनोज खाडये

सोलापूर – मागील ७४ वर्षांच्या लोकशाहीने गरिबी, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अनाचार, नक्षलवाद, अराजकता अशी विषारी आणि कटू फळे दिली आहेत. त्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी आदर्श ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता आहे. राजकीय हिंदुत्वाऐवजी त्याग, समर्पण आणि ईश्वरी अधिष्ठान असलेले धार्मिक हिंदुत्व महत्त्वाचे असते. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये पद, प्रतिष्ठा किंवा अन्य प्रलोभने यांमुळे हिंदुत्वाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. कोणतेही पद, प्रतिष्ठा किंवा अन्य प्रलोभने यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ धर्मासाठी निरपेक्षपणे कृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते ‘जय श्रीराम सेने’च्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीत बोलत होते. यात नगर, सोलापूर, लातूर, धाराशिव, पुणे आणि वर्धा या ठिकाणांहून जय श्रीराम सेनेचे कार्यकर्ते ऑनलाईन सहभागी झाले होते. जय श्रीराम सेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. विजयराजे माने यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केले होते.

विशेष

१. या पुढे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी संघटितपणे प्रयत्न व्हावेत, यासाठी प्रत्येक सप्ताहात अशा पद्धतीने बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

२.‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जय श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण शिकवण्यात यावे’, अशी विनंती उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.

३. बैठकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले.

ऑनलाईन बैठक आणि श्री. मनोज खाडये यांचे मार्गदर्शन यांविषयी अभिप्राय

साक्षात् श्रीरामाच्या कृपेने या ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन झाले ! – विजयराजे माने, संस्थापक, जय श्रीराम सेना

श्री. विजयराजे माने

बैठकीमध्ये श्री. मनोज खाडये विषय मांडत असतांना भयावह परिस्थितीचा विषय चालू असतांना ‘या बैठकीत भगवंताची कृपा होत आहे’, असे जाणवत होते.  ‘प्रत्यक्ष श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या काळामध्ये गेलेलो आहोत अन् त्यांच्यासमवेत चर्चा करत आहोत’, अशी अनुभूती येऊन आनंद जाणवत होता. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचाच आधार आहे, याची जाणीव होऊन शरीरावर रोमांच येत होते. ‘साक्षात् श्रीरामाच्या कृपेने या बैठकीचे आयोजन झाले’, असे वाटले.

हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रितपणे राष्ट्र-धर्मासाठी कार्य करायला हवे ! – सुलोचना वेदपाठक, महिला संघटक, जय श्रीराम सेना

आजची बैठक चांगली झाली. बैठकीतील विषय प्रथमच ऐकला. यात ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. श्री. मनोज खाडये यांनी विषय चांगल्या प्रकारे समजून सांगितला. हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन राष्ट्र-धर्मासाठी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत.