प्रत्येक हिंदूने शौर्याची पूजा करणे काळाची आवश्यकता ! – केतन पाटील, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

श्री. केतन पाटील

सोलापूर – वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंच्या हातातील शस्त्रे इंग्रजांनी काढून घेतली आणि वर्ष १९२० नंतर हिंदूंच्या मनातील शस्त्रे अहिंसेच्या नावाखाली काढून घेण्यात आली. त्यामुळे हिंदूंना शौर्याचा विसर पडल्याने अन्यायाविरुद्ध लढण्याचा भाग ते विसरत चालले आहेत. हिंदूंना शौर्यविहीन बनवण्यासाठी विविध प्रकारच्या जिहादच्या माध्यमातून षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळेच आज अनेक हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हिंदु लोकप्रतिनिधींच्या होणार्‍या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण अशा अनेक घटना घडत आहेत आणि सेक्युलर (निधर्मी) पोलिसही गप्प रहातात. त्यामुळेच आज प्रत्येक हिंदु बांधवाने शौर्याची पूजा करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. केतन पाटील यांनी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाच्या वेळी केले. सोलापूर, सांगोला, फलटण, बारामती, मंगळवेढा आणि पंढरपूर येथील धर्मप्रेमींसाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.

धर्मप्रेमींचे अभिप्राय

श्री. शिवाजी चिंता, सोलापूर – सध्या विविध माध्यमातून हिंदु धर्मावर आघात होत आहेत. आपल्यामध्ये शौर्य असल्यास आपण याचा प्रतिकार करू शकतो, हा भाग या व्याख्यानाच्या माध्यमातून लक्षात आला.

श्री. विशाल हब्बा, सोलापूर – मी माझ्या दोन मित्रांनाही स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी सांगेन.

कु. अदिती क्षीरसागर, फलटण – व्याख्यानाच्या माध्यमातून पुष्कळ ऊर्जा मिळाली आणि उत्साह वाढला.

शुभम – व्याख्यानाचा विषय मी अधिकाधिक जणांपर्यंत पोचवून धर्मप्रसाराचा प्रयत्न करीन.