प्रसन्नता, तेज आणि चैतन्य मिळवून देणारे स्त्रियांचे विविध अलंकार !

सौभाग्यलंकार

लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू लावत नाहीत. लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत.

कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ

  • लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन मुखाच्या (चेहर्‍याच्या) स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो.
  • स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते.
  • वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो.’

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ६.११.२००७, दुपारी २.३०)

शक्तीतत्त्व निर्माण करणारे कुंकू !

कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होणे : ‘कुंकवामध्ये तारक आणि मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वतः किंवा दुसर्‍या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होतात आणि वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.’

– एक साधिका (१७.१.२००५)

स्वतःला अनामिकेने, तर दुसर्‍या स्त्रीला मध्यमेने आज्ञाचक्रावर गोलाकार कुंकू लावावे.

स्त्रीमधील स्त्रीत्व जागृत करणारे अलंकार !

१. स्त्रीचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये

‘आदिशक्तीरूपी कार्यस्वरूप देवता’, असे म्हटले जाते. स्त्री रजोगुणी असल्याने तिला प्रत्येक कार्याच्या मागे अप्रत्यक्षपणे कार्यरत असणार्‍या कर्मरूपी शक्तीत गणले गेले आहे. रजोगुणाच्या साहाय्याने उत्पत्तीच्या माध्यमातून सर्व सृष्टीत जीवन जगण्याच्या क्रियेत सतत उत्साहाचे संचारण करणारी ती वेगस्वरूप शक्ती असल्याने तिच्याविना कृती नाही आणि कृतीतील कर्माला गती नाही. कर्माला गती नाही, म्हणजेच गतीस्वरूप विचाराची उत्पत्ती नाही. या मूळ विचारस्वरूप गतीशील उत्पत्तीचे कारण म्हणजेच रजोगुणी स्त्रीरूपी कार्यबलवर्धक बीज.

२. अलंकारांचे महत्त्व

रजोगुणाच्या शक्तीरूपी संचारण-प्रक्रियेला आकार देण्यात अलंकार मोलाचे कार्य करतात.

२ अ. अलंकारांतील तेजामुळे स्त्रीतील स्त्रीत्व, म्हणजेच रजोतत्त्व जागृत होते ! : अलंकार हे रजोगुणी, तसेच तेजदायी असल्याने हे तेज स्त्रीस्वरूप देहातील रजोगुणात्मक कार्याला योग्य दिशा देऊन तिच्याकडून संपूर्ण विश्‍वाच्या सतत गतीमान असणार्‍या स्थळ आणि काळ यांना जोडणार्‍या वेगरूपी प्रक्रियेला दिशा देते. अलंकारांतील तेजामुळे स्त्रीतील स्त्रीत्व, म्हणजेच रजोतत्त्व जागृत होते. रजोतत्त्व जागृतीमुळे तिच्या देहातील चेतनाशक्तीला जागृती मिळते. ही जागृती देहातून प्रक्षेपित होणार्‍या कार्यबलवर्धक लहरींच्या जोरावर वायूमंडलातील कालधारणेलाही गतीमान करते; म्हणून अलंकार ल्यायलेली स्त्री वातावरणात आली की, वातावरणात उत्साह संचारतो.

२ आ. अलंकार स्त्रीला तिच्या मूळ प्रकृतीस्वरूप शक्तीस्वरूपाकडे नेतात ! : अलंकारातून देहाला तेजरूपी झळाळी प्राप्त झाल्याने मनालाही प्रसन्नता लाभते. प्रसन्न मन कल्याणकारी असल्याने ते परोपकाराच्या स्तरावर कार्य करणारे असते. मनाच्या प्रसन्नतेतून बुद्धीही विकासशील होते, म्हणजेच अलंकारातील तेजधारणा हळूहळू स्थूलदेह, मन आणि बुद्धी या स्तरांवर कार्य करून त्यानंतर सूक्ष्म-देहाच्या शुद्धीतून स्त्रीदेहातील देवत्व जागृत करून तिला तिच्या मूळ प्रकृतीस्वरूप शक्तीस्वरूपाकडे नेते. हेच शक्तीस्वरूप तिला प्रकृतीधर्मातून अलंकाररूपी साकारतेच्या पलीकडे जायला शिकवते, म्हणजेच देहबुद्धीच्या साकारस्वरूप विश्‍वाच्या पलीकडे नेते. हे विश्‍व वैराग्यदायी असते. अलंकाररूपी साकारतेतील शिवस्वरूप पोकळी शेवट आपल्यातील निर्गुण चैतन्याचे प्राबल्य दाखवत स्त्रीला अलंकाररूपी आसक्तीतून मुक्त करते. हेच जीवनाचे अंतिम ध्येय असते. अलंकाररूपी आसक्तीतून मुक्त होणे, या ध्येयाप्रत जाण्यासाठी अलंकारातील दिव्यतेजरूपी साकारतेचे कोंदण स्त्रीधर्मरूपी रजोतत्त्वाला असणे अत्यंत आवश्यक असते, तरच ते संयमित जीवन जगू शकते. या संयमित जीवनातूनच एक क्रियाशील उत्पत्तीधारणत्व आकार घेऊन संपूर्ण विश्‍वाचा तोल सांभाळते. अन्यथा अलंकाररूपी तेजधारणात्मक विभूषणाविना स्त्रीत्व हे एक नैराश्यरूपी स्मशानत्वासारखेच भासते.’

– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिखाण करतात.) (३.४.२००८))

मंगळसूत्र

मंगळसूत्रात दोन पदरी दोर्‍यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे मणी आणि २ लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन, २ वाट्या म्हणजे पती-पत्नी तसेच ४ काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ !

मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्या यांचा आध्यात्मिक अर्थ

मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाचे, तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक असते. शिव-शक्तीच्या बळावरच वधूने सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो. या दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदु धर्माने दिलेल्या परवानगीतील आदान-प्रदानाचे दर्शक आहे. माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून, कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मगच ते गळ्यात घातले जाते.

अंगठी

‘अंगठी हा केवळ हाताच्या बोटांचे सौंदर्य वाढवणारा एक अलंकार नसून तिच्यामागे संरक्षणाची कल्पनाही आहे.

१. मंतरलेली अंगठी (मंत्राने सिद्ध केलेली) बोटात घातल्याने पिशाचादिकांची बाधा होत नाही.

२. अंगठीमुळे बोटाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होते.

अंगठीतील चैतन्यामुळे बोटांच्या मऊ भागावर दाब येऊन बिंदूदाबनाचे उपाय होतात आणि तेथील काळ्या शक्तीचा अडथळा दूर होऊन प्रत्येक बोटात चैतन्य पोचते.’

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७)

कर्णभूषणे

कर्णकुंडल

हे कानात घालण्याचे एक वर्तुळाकार आभूषण आहे. पत्राकार, शंखाकार, सर्पाकार असे आकारानुसार त्याचे विविध प्रकार आहेत. विशिष्ट देवतांचा आणि त्यांच्या कानांतील कुंडलांच्या विशिष्ट आकारांचा संबंधही अनेक ग्रंथांतील वर्णनांवरून लक्षात येतो, उदा. श्रीविष्णूच्या कानांतील मकराकार कुंडले; शिव आणि श्री गणपति यांच्या कानांतील सर्पाकार कुंडले, तसेच उमा आणि इतर स्त्री देवता यांच्या कानांतील पत्राकार आणि शंखाकार कुंडले. संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या विठोबाचे वर्णन करतांना एका अभंगात ‘मकरकुंडले तळपती श्रवणी ।’ असा त्याच्या कानांतील मकराकार कुंडलांचा उल्लेख केला आहे.

कर्णकुंडलाचे महत्त्व

जिवाने मायेतून मुक्त होऊन ब्रह्मचिंतनात रहाण्यासाठी कर्णकुंडल घालणे

‘जिवाचा ब्रह्मतत्त्वाशी संबंध जोडण्यासाठी शास्त्राप्रमाणे केली जाणारी कृती म्हणजे कर्णकुंडलांचा वापर करणे होय. जीव जन्माला येतो, तेव्हा तो पूर्णपणे मायेत अडकलेला असतो. त्या अडकण्यातून जिवाला मुक्त करून तो सातत्याने ब्रह्मचिंतनात रहावा, या हेतूने कर्णभेद करून जिवाला कर्णकुंडल घातले जाते.’

– एक साधिका (३.९.२००५)

मोती

माध्यमातून आपतत्त्वरूपी लहरी कार्यरत होत असल्याने मोत्यातून वेगाने आपतत्त्वयुक्त लहरी वायूमंडलात प्रक्षेपित होतात. मोत्याच्या स्पर्शाने देहातील चेतनेचे शरीरभर संक्रमित होण्याचे प्रमाण वाढते. मोत्याच्या आपतत्त्वरूपी लहरींच्या माध्यमातून देहाची बाह्य वायूमंडलाला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते, म्हणजेच त्याची बाह्य वायूमंडलातील लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता वाढते.

नथ

शंकराचार्यांच्या ‘त्रिपुरसुंदरीस्तोत्रा’मध्ये ‘हे गिरिजे, मी दिलेल्या या नासिकाभूषणाचा स्वीकार कर’, अशी देवीला प्रार्थना केली आहे. नासिकाभूषण म्हणजे ‘मोती’, असे म्हटलेले आहे. आजही महाराष्ट्रातील नथ ही मोतीजडितच असते.

अंतर्मुखता वाढवणारी नथ

१. ‘नथ घातल्याने जिवाची प्रकृती आणि प्रयत्न यांप्रमाणे त्याचा अहं काही प्रमाणात अल्प होण्यास साहाय्य होते.

२. नथ घातल्याने जिवाची अंतर्मुखता वाढून त्याचे स्व-परीक्षण करण्याचे प्रमाण वाढते.’

– एक साधिका (३.९.२००५)

कंकण

हा कुमारिकांचा, तसेच सुवासिनी स्त्रियांचा महत्त्वाचा अलंकार मानला गेला आहे. विवाहाच्या वेळी वधूने हातात घालायच्या कंकणांना महाराष्ट्रात ‘लग्नचुडा’ म्हणतात. विधवा स्त्रियांनी कंकण वापरणे निषिद्ध मानले आहे. विविध धातू, काच, शंख, लाख आणि हस्तिदंत यांपासून बांगड्या (कंकणे) बनवण्याची प्राचीन पद्धत आहे. पंजाबात हस्तिदंती, तर बंगालमध्ये शंखापासून बनवलेल्या कंकणांना विशेष महत्त्व आहे.

जोडवी

‘जोडवे या अलंकारामुळे स्त्रीला तिचा स्त्रीधर्म, कर्तव्य अन् नियम यांची सातत्यानेे जाणीव होते. त्यामुळे स्त्री स्वैराचार न करता बंधनात अडकून रहाते आणि धर्मपालन करते.’