एल्.ई.डी. मासेमारी मर्यादित क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद करा ! – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उदय सामंत

रत्नागिरी – स्थानिकरित्या पारंपरिक पद्धतीने, तसेच रापण पद्धतीने मासेमारी करणार्‍या मासेमारांची हानी होऊ नये, यासाठी एल्.ई.डी. मासेमारी (रात्रीच्या वेळी एल्.ई.डी. दिव्यांचा वापर करून केली जाणारी मासेमारी) मर्यादित क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद करा, असे निर्देश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर येथील मासेमारांच्या समस्यांविषयी रत्नागिरी येथून ‘दृकश्राव्य प्रणाली’द्वारे झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस राजापूरचे शिवसेनेचे आमदार डॉ. राजन साळवी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची उपस्थिती होती.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले,

‘‘रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी १२ नॉटिकल माईल्सच्या पुढील समुद्रात मासेमारी करण्याची मुभा पर्सेसीन मासेमारांना असली, तरी ते किनार्‍याजवळ येतांना मासेमारी करत असल्याने पारंपरिक मासेमारांची हानी होत आहे. याकडे मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी.’’

वेळागर येथे समुद्रात केल्या जाणार्‍या ‘पॅरासिलिंग’ या क्रीडा प्रकारामुळे मासेमारीकरता मासे उपलब्ध होत नाहीत. याचा त्रास ५ सहस्र मासेमार कुटुंबांना होत आहे. त्यामुळे ‘पॅरासिलिंग’ बंद करण्याची मागणी स्थानिक मासेमारांनी या बैठकीत केली.

त्या वेळी मंत्री सामंत म्हणाले की, वेळागर येथे समुद्रात चालू असलेल्या ‘पॅरासिलिंग’विषयी एक समिती स्थापन करून अभ्यासाअंती निर्णय घेतला जावा, तोवर येथील पॅरासिंलिंग बंद ठेवण्यात यावे. मत्स्य विभाग, मेरीटाईम बोर्ड, विद्यापिठातील अभ्यासक यांच्या समावेशासह समिती स्थापन करून याविषयी अहवालानंतर अंतिम कारवाई करण्यात येईल. या वेळी सिंधुदुर्गातील विविध रस्ते आणि बांधकाम याविषयी बैठकीत आढावा घेण्यात आला.