लोकशाहीतूनच हुकूमशाहीचा जन्म होतो ! – ग्रीसचा जगविख्यात तत्त्वज्ञ प्लेटो

तुम्ही भर समुद्रात एका नौकेवर असतांना काय कराल?

नौका कशा पद्धतीने चालवायची ? हे ठरवण्यासाठी निवडणूक घेणार ? कि नौकेवर उपस्थित असणार्‍या कुणाला नाव चालवता येते का ? याचा शोध घेणार? तुम्ही जर दुसरा पर्याय निवडला, तर याचा अर्थ की, यासारख्या परिस्थितीमध्ये एखाद्या विषयाची जाण वा कौशल्ये असणे महत्त्वाचे ठरते. जीवन आणि मरणाचा प्रसंग आलेला असतांना आता पुढे काय करायचे ? असा विचार करत बसणार्‍या नवशिक्याला अशा वेळी प्राधान्य दिले जाणार नाही.

मग एक अशीच मोठी नौका, ज्याला ‘राज्य’ म्हणतात, ती चालवणार्‍यांविषयी तुमचे काय मत आहे ? निवडणुकीच्या माध्यमातून नेता निवडण्याऐवजी मग राज्याचे नेतृत्व करण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा शोध घेणे, हा चांगला पर्याय नाही का ?

लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे निर्णय लोकोपयोगी नाहीत !

लोकशाहीचे जन्मस्थान म्हटल्या जाणार्‍या ग्रीसच्या अथेन्समधील तत्त्वज्ञ प्लेटो यांनी आजपासून २ सहस्र ४०० वर्षांपूर्वी त्यांच्या ‘द रिपब्लिक’ या पुस्तकाच्या ६व्या प्रकरणात हा प्रश्‍न केला आहे. न्याय, मानवी स्वभाव, शिक्षण आणि सद्वर्तन यांसारख्या विषयांवरचे हे सगळ्यात पहिले आणि अत्यंत प्रभावी पुस्तक आहे. सरकार आणि राजकारण यांविषयीही या पुस्तकात सांगितले आहे. गप्पांच्या स्वरूपात लिहिण्यात आलेल्या या पुस्तकामध्ये सॉक्रेटिस, प्लेटो आणि त्यांच्या मित्रमंडळी यांच्यामधील राजकारणाविषयीची चर्चा आहे. एक सरकार दुसर्‍या सरकारपेक्षा चांगले का असते ? याविषयीची माहिती या चर्चेतून मिळते. लोकशाहीविषयीचे प्लेटो यांचे विचार या पुस्तकातून स्पष्ट होतात. ग्रीक भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात ते म्हणतात, ‘‘लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे निर्णय लोकोपयोगी नाहीत.’’

शासन चालवण्यासाठी कोणती पात्रता एखाद्या व्यक्तीत असणे आवश्यक आहे, याची जाणीव मतदारांना असतेच असे नाही !

एखादा उमेदवार कसा दिसतो, यांसारख्या गोष्टींमुळे मतदार प्रभावित होऊ शकतात आणि एखाद्या नेत्याला मत देणे, आपल्याला कसे कठीण गेले, याविषयीही त्यांनी लिहिले आहे. ‘इतर गोष्टींमुळे मतदार प्रभावित झाले, तर शासन चालवण्यासाठी कोणती पात्रता एखाद्या व्यक्तीत असणे आवश्यक आहे, याची जाणीव मतदारांना होणार नाही’, असेही ते लिहितात.

प्रशिक्षित विचारवंत सत्तेत असावेत !

विचारवंत नायजेल वॉरबर्टन यांनी म्हटले आहे, ‘जे तज्ञ सत्तेच्या प्रमुख पदांवर असावेत’, असे प्लेटोला वाटत होते, ते लोक ‘विशेष प्रशिक्षण असणारे विचारवंत असावेत’, असे त्यांना वाटत होते. त्यांची प्रामाणिकता, परिस्थितीची पूर्ण समज (सामान्यांपेक्षा कित्येक पटींनी अधिक) या आधारावर या लोकांची निवड व्हावी.’

अ‍ॅरिस्टोक्रसी !

‘अ‍ॅरिस्टोक्रसी’ या शब्दाचा अर्थ ‘चांगल्या लोकांचे सरकार.’ या प्रकारच्या सरकारमध्ये काही लोक आयुष्यभर चांगला नेता होण्यासाठीची सिद्धता करतात. प्रजासत्ताक चालवण्याची आणि बुद्धीमत्ता वापरून समाजासाठी निर्णय घेण्याचे दायित्व या लोकांचे असते. विचारवंत लिंडसे पोर्टर यांनी सांगितले, ‘प्लेटोचे विचार विशेष होते. ‘हे सगळे ‘अ‍ॅरिस्टोक्रॅट्स’ निःस्वार्थ भावनेने आणि बुद्धीमानपणे शासन करतील’, असा प्लेटोचा विचार होता. असे असले तरी आदर्श समाज कायमच पतनाच्या उंबरठ्यावर असेल.’

‘अ‍ॅरिस्टोक्रसी’चा धोका !

विचारवंत पोर्टर यांनी पुढे सांगितले, ‘या सुशिक्षित आणि विचारवंतांची मुले शेवटी एैषोआरामामुळे भ्रष्ट होतील’, अशी शंका त्यांनी वर्तवली होती. असे झाल्याने ते केवळ स्वतःच्या संपत्तीचा विचार करतील आणि परिणामी अ‍ॅरिस्टोक्रसी ही एक ‘ऑलिगार्की’ म्हणजे ‘निवडक लोकांपुरते मर्यादित रहाणारे शासन’ यात रूपांतरित होईल. हे श्रीमंत आणि संकुचित मनोवृत्तीचे शासक अर्थसंकल्पातील संतुलनाची काळजी करतात. यामध्ये बचत करण्यावर भर असेल आणि त्यामुळे असमानता वाढेल.

‘प्रजासत्ताका’ची होणारी स्थिती

प्लेटो लिहितो, ‘जसजसे हे श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातील, ते अधिक पैसे कमावण्याचा विचार करतील आणि नीतीमूल्यांविषयी फार विचार करणार नाहीत. जसजशी असमानता वाढेल, तशी श्रीमंतांपेक्षा अशिक्षित गरिबांची संख्या वाढेल आणि शेवटी ‘ऑलिगार्क’ सत्ता संपुष्टात येईल अन् या राज्याचे रूपांतर एका प्रजासत्ताकात होईल.

लोकशाही हे अराजकतेचे एक सुखद रूप ! – सॉक्रेटिस

लोकशाहीचे कौतुक असण्याची सवय असणार्‍या आपल्या सगळ्यांना हे ऐकायला विचित्र वाटेल की, लोकशाही ही ‘अ‍ॅरिस्टोक्रसी’ आणि ‘ऑलिगार्की’ यानंतरची तिसर्‍या दर्जाची शासनव्यवस्था आहे. इतकेच नाही, तर ‘द रिपब्लिक’मध्ये सॉक्रेटिस म्हणतो, ‘लोकशाही हे अराजकतेचे एक सुखद रूप आहे आणि हे रूपदेखील त्यातल्या विरोधाभासामुळे इतर शासनव्यवस्थांप्रमाणेच संपुष्टात येते. ज्याप्रमाणे अ‍ॅरिस्टोक्रसीमधून ऑलिगार्कीचा जन्म झाला होता, त्याचप्रमाणे लोकशाहीमधून निरंकुशता जन्माला येईल; कारण ज्या वेळी लोक संपत्ती मिळवण्यासाठी एक प्रकारची आंधळी शर्यत प्रारंभ करतात, तेव्हा समाजामध्ये समानतेसाठीची मागणी व्हायला लागते आणि समानतेसाठीची भूक जन्माला येते आणि अशा प्रकाराने स्वातंत्र्याची एक अतृप्त ओढ एक प्रकारची निरंकुशता निर्माण करते.’

हुकूमशहाचा जन्म होण्यासाठीची परिस्थिती !

हा विचार स्वीकारणे काहीसे कठीण आहे; पण ज्या वेळी लोकांना स्वातंत्र्य मिळते, तेव्हा त्यांना अधिक स्वातंत्र्य हवे असते. कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य मिळवणे, हे उद्दिष्ट असेल, तर या स्वातंत्र्यामुळे बहुसंख्यांकांचा एक गट आणि मतभेद यांचा जन्म होतो. यातील बहुतेकांच्या संकुचित विचारांमुळे त्यांना स्वतःपुढे इतर काही दिसत नाही. अशांमध्ये नेता होण्याची इच्छा असणार्‍याला या गटांना संतुष्ट करावे लागते. या लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो आणि ही परिस्थिती एखाद्या हुकूमशहाचा जन्म होण्यासाठी योग्य असते; कारण लोकशाहीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तो जनतेला भ्रमात ठेवतो. इतकेच नाही, तर कोणतीही बंधने नसणारे स्वातंत्र्य उन्माद असणार्‍या जमावाला जन्म देते. असे झाल्यास लोकांचा शासकावरचा विश्‍वास न्यून होतो. लोक अडचणीत येतात आणि त्यांच्यातील भीतीला खतपाणी घालणार्‍या आणि स्वतःला त्यांचा रक्षक म्हणवणार्‍या व्यक्तीला समर्थन देतात; पण अथेन्सवासियांकडे प्रत्यक्ष लोकशाही होती. जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी मतदार मतदान करत आणि हे एखाद्या कधीही न संपणार्‍या जनमत चाचणीसारखे होते.

विचारवंत लिंडसे पोर्टर सांगतात, ‘आज अशा अनेक संस्था आहेत ज्या प्लेटोच्या काळात नव्हत्या. यामध्ये प्रतिनिधित्व असणारी लोकशाही, सर्वोच्च न्यायालय, मानवाधिकार कायदे, सर्वांसाठी शिक्षण या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी अविचारी जमावाला नियंत्रण करण्यासाठीची ही साधने आहेत.’ गेल्या काही काळातल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांच्या उदयामुळे ‘द रिपब्लिक’मधील धोक्याच्या सूचना पुन्हा एकदा महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

लोकशाही संपुष्टात आणण्यामागील प्रक्रिया !

विश्‍लेषक अँड्र्यू सॅलिवान यांनी म्हटले, ‘या प्रकारचे नेते सहसा उच्च वर्गातले असतात; पण सद्यःपरिस्थितीची त्यांना माहिती असते. त्यांचे सर्वकाही ऐकणार्‍या एका गटावर ते वर्चस्व मिळवतात आणि त्याच गटामधील श्रीमंतांना ते भ्रष्टाचारी म्हणायला लागतात. शेवटी ते एकटे पडतात आणि गोंधळलेल्या अन् स्वतःमध्ये रमलेल्या जनतेला अनेक पर्यांयांपैकी एक निवडण्याचे आणि लोकशाहीच्या असुरक्षिततांपासून स्वातंत्र्य देतात. ही व्यक्ती स्वतःकडे सर्व प्रश्‍नांचे उत्तर असल्याचे सांगते आणि एखाद्या प्रश्‍नाचा तोडगा या व्यक्तीकडे असल्याचे समजून जनता उत्साहात आली की, ती या उत्साहाच्या भरात लोकशाही संपुष्टात आणते.’

नीतीमूल्यांचे राज्य असावे, भावनांचे नाही !

विचारवंत लिंडसे पोर्टर यांनी सांगितले, ‘अ‍ॅरिस्टोक्रॅट्सद्वारे शासन चालवण्याचा विचार म्हणजे अशा लोकांनी केलेले नेतृत्व जे ऐहिक सुखापासून दूर असतील, असे नेतृत्व भ्रष्ट होणार नाही आणि त्यांच्या शिक्षणामुळे ते चांगले आणि बुद्धिमान निर्णय घेतील. असे लोक जे स्वतःला विचारतील, ‘सगळ्यात योग्य आणि विवेकाचे पाऊल काय असेल ?’, अशामध्ये प्लेटोचा एक विचार महत्त्वाचा आहे, ‘योग्य, विवेकी आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा, नीतीमूल्यांचे राज्य असावे, भावनांचे नाही.’

(संदर्भ : संकेतस्थळ)