JNU Violence : डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांकडून दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

जे.एन्.यू.मध्ये अभाविपने रावणाच्या पुतळ्यासमवेत जिहादी आतंकवाद्यांची छायाचित्रे जाळली !

(जे.एन्.यू. म्हणजे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय)

रावणाच्या पुतळ्यासमवेत जिहादी आतंकवाद्यांची छायाचित्रे (उजवीकडे)

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (जे.एन्.यू.मध्ये) विजयादशमीच्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोरबरला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (’अभाविप’ने) रावणाच्या पुतळ्यासमवेत जिहादी आतंकवादी अफझल गुरु, तसेच देशद्रोही विधाने करणारे उमर खालिद, शरजील इमाम यांसारख्यांची छायाचित्रे लावून त्याचे दहन केले. या कृतीवरून डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी (ऑल इंडिया स्टुडेंट असोसिएशन, स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक स्टुडेंट्स फेडरेशन) संताप व्यक्त केला. रावण दहनानंतर जेव्हा दुर्गामूर्तीची विसर्जन मिरवणूक निघाली, तेव्हा विश्वविद्यालयातील साबरमती टी-पॉईंट येथे डाव्या गटांनी या मिरवणुकीवर आक्रमण केले. अभाविपच्या म्हणण्यानुसार मिरवणुकीवर चप्पल, बूट आणि दगड फेकण्यात आले. यामुळे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घायाळ झाल्या.

१. आक्रमणाच्या वेळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी ‘इंकलाब जिंदाबाद’ समवेत अश्लील आणि चिथावणीखोर घोषणा दिल्या. अभाविपने आरोप केला की, हे सर्व डाव्यांच्या जे.एन्.यू. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नियोजनपूर्वक घडवून आणले गेले.

२. अभाविपचे जे.एन्.यू. शाखेचे अध्यक्ष मयंक पंचाल यांनी ‘ही घटना म्हणजे विद्यार्थ्यांच्या श्रद्धा आणि विद्यापिठाची सांस्कृतिक परंपरा यांवर थेट आक्रमण आहे’, असे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, डाव्या गटांनी पवित्र उत्सवाला हिंसा आणि द्वेष यांद्वारे कलंकित केले.

३. जे.एन्.यू. विद्यार्थी संघटनेचे संयुक्त सचिव वैभव मीणा यांनीही या घटनेची तीव्र निंदा केली आणि ‘भारतीय संस्कृतीविषयी असलेला द्वेष यातून स्पष्ट दिसतो’, असे सांगितले.

डाव्या गटांचा आरोप

डाव्या संघटनांनी अभाविपवर आरोप केला की, ‘गांधी जयंतीच्या दिवशी अभाविपने जाणूनबुजून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उमर खालिद आणि शरजील इमाम यांचे रावणरूपात पुतळे सिद्ध करून जाळण्याचा प्रयत्न हा इस्लामविरोधी मानसिकता आणि राजकीय प्रचार, यांचा भाग होता. अभाविपने नथुराम गोडसे, गुरमीत राम रहिम आणि वर्ष २०२० मधील देहलीतील दंगलीच्या चिथावणीखोर विधाने करणारे नेते यांची छायाचित्रे का लावली नाहीत ?’

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्मावरील आघातांची ही वृत्ते वाचून ज्यांचे रक्त सळसळत नाही, ते हिंदू नव्हेत !
  • जिहादी आतंकवादी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांचे कोण लागतात ? त्यांच्या समर्थनार्थ या संघटना हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर आक्रमण करत आहेत, यावरून या संघटना देशद्रोही आणि हिंदुद्वेषी असून त्यांच्यावर केंद्र सरकारने बंदीच घालणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु संघटनांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे !