शक्तीचा जागर !

नवरात्रोत्सव विशेष

‘शत्रून् जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे ।
भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोस्तुते ॥’

– श्री भवानीदेवी स्तोत्र

अर्थ : हे जगदंबे, माझ्या शत्रूंचा नाश करून मला विजय प्राप्त करून दे, माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. हे माते, मी तुला नमस्कार करतो. तू भय आणि रोगांनाही नष्ट कर !

आज अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव चालू होत आहे. देवीचे, म्हणजेच शक्तीतत्त्व जागृत करण्याचा हा उत्सव आहे. नवरात्रोत्सवात ९ दिवस देवीतत्त्व जागृत असल्यामुळे तिची शक्ती अधिकाधिक ग्रहण करण्यासाठी तिची नामजपादी उपासना करायला हवी.

आजची स्थिती पाहिली, तर काही दिवसांच्या बालिकेपासून ८५ वर्षांच्या वृद्धेपर्यंत कुठलीही स्त्री सुरक्षित राहिलेली नाही. त्यामुळे स्त्रियांनी स्वरक्षणासाठी देवीची उपासना करून शक्तीतत्त्व अंगी बाणवणे अपरिहार्य आहे. नवरात्रीचा काळ देवीची कृपा संपादण्यासाठी अत्यंत पूरक आहे. छत्रपती शिवरायांनी भवानीदेवीची उपासना केली. त्यांच्या मुखात सतत ‘जगदंब’ असा नामजप असे. हिंदूंचे आक्रांत ठरलेल्या धर्मांधांना मारण्याची त्यांच्यातील क्षात्रवृत्ती पाहून आई भवानीनेही त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना ‘भवानी तलवारी’चा प्रसाद दिला. या भवानी तलवारीच्या साहाय्याने त्यांनी ५ पातशाह्यांना पाणी पाजले. हिंदु स्त्रियांना वासनांध सुलतानांपासून भयमुक्त केले. आई भवानीने तलवारीच्या रूपाने दिलेले क्षात्रतेज त्यांना धर्म आणि देश रक्षणासाठी खुणावत राहिले !

हिंदु भगिनींनीही हे लक्षात ठेवले पाहिजे की, देवीची उपासना त्यांच्यात शक्तीतत्त्व जागृत करील आणि कुठल्याही अत्याचारापासून त्यांचे रक्षण करील. आई भवानीच्या क्षात्रतेजाची उपासना त्यांना स्वरक्षणाचे धडे घेण्यास उद्युक्त करील. आज घराबाहेर पडणारी अशी एकही युवती वा महिला नाही की, जिला वासनांध पुरुषांच्या प्रकृतीला तोंड द्यावे लागले नसेल. रस्त्यावर मुलींना पाहून शिटी वाजणार्‍यापासून अत्याचार करून हत्या करणार्‍यापर्यंत अनेक जणांच्या वावटळात आज ती अडकली आहे. हे वावटळ तिच्यापर्यंत पोचूही शकणार नाही, अशी स्थिती निर्माण होण्यासाठी भक्ती करणे अपरिहार्य आहे. उपासना आणि भक्ती यांचे संरक्षणकवच तिचे रक्षण करण्यास समर्थ आहे. उपासनेसमवेत घेतलेले स्वसंरक्षण प्रशिक्षण, धर्माचरण आणि प्रखर धर्माभिमान तिच्यातील क्षात्रतेजाचे स्फुलिंग सदैव जागृत ठेवेल.

हे क्षात्रतेज अत्याचार्‍यांपासून तिचे रक्षण करण्यास तिला समर्थ करील !

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.