नामजपाचे महत्त्व

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

जात्याला दोन पेठी असतात. त्यांतील एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले, तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते; पण जर दोन्ही पेठी फिरत राहिल्या, तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशी दोन पेठी आहेत. त्यांतील मन हे स्थिर आणि देह ही फिरणारी पेठी आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. ज्या वेळी वाईट विचार मनात येतील, त्या वेळी भगवंताचे नाम घेतले, तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. ‘मी’पणाचे दडपण आपोआप न्यून होत जाईल.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(साभार : ‘पू. के.वि. बेलसरे – आध्यात्मिक साहित्य’ फेसबुक)