Opposition Parties Walk Out : राज्‍यसभेत पंतप्रधान मोदी यांच्‍या भाषणाच्‍या वेळी विरोधकांचा सभात्‍याग

विरोधकांनी भारतीय राज्‍यघटनेला पाठ दाखवली ! – सभापती जगदीप धनखड

पंतप्रधान नरेंद्र मोदी व सभात्‍याग करताना विरोधक

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्‍या लोकसभेतील भाषणांतील सूत्रांवर लोकसभेत उत्तर दिल्‍यानंतर ३ जुलै या दिवशी राज्‍यसभेतही उत्तर दिले. त्‍या वेळी विरोधकांनी पंतप्रधानांना विरोध करण्‍याचा प्रयत्न केला; मात्र त्‍यात ते यशस्‍वी होत नसल्‍याचे पाहून त्‍यांनी सभात्‍याग केला. यावर राज्‍यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खेद व्‍यक्‍त केला. ते म्‍हणाले की, हे अत्‍यंत दुःखदायक आणि अमर्यादित कृत्‍य आहे. मी त्‍यांच्‍याशी चर्चा केली, मी त्‍यांना विनंती केली. मी विरोधी पक्षातील नेत्‍यांना कोणत्‍याही अडथळ्‍याविना बोलण्‍याची संधी दिली. आज ते केवळ सदन सोडून गेले नाहीत, ते मर्यादा सोडून गेले. आज त्‍यांनी मला पाठ नाही दाखवली, तर भारतीय राज्‍यघटनेला पाठ दाखवली आहे. आज त्‍यांनी माझा आणि तुमचा अनादर नाही केला, तर त्‍या शपथेचा अनादर केला, जी राज्‍यघटनेच्‍या साक्षीने घेतली आहे. भारताच्‍या राज्‍यघटनेचा याहून मोठा अवमान असू शकत नाही.

सभापती जगदीप धनखड

पंतप्रधान मोदी यांचे भाषण थांबवण्‍याची विरोधक मागणी करत होते; मात्र यात ते यशस्‍वी झाले नाहीत. त्‍या वेळी राज्‍यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आघाडीवर होते. त्‍यांनी सभापतींसमोरील जागेत येऊन पंतप्रधान मोदी यांना भाषण थांबण्‍याची विनंती केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्‍यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. अंततः विरोधकांनी सभात्‍याग केला.
सभापती धनखड म्‍हणाले की, आपल्‍याला देशाला मार्गदर्शन करायचे आहे. देशातील १४० कोटी लोक यामुळे दुःखी झाले असतील. विरोधकांनी त्‍यांचे म्‍हणणे मांडले असेल, तर त्‍यांनी सत्ताधार्‍यांचेही म्‍हणणे ऐकले पाहिजे, यालाच सभागृह म्‍हणतात.

संपादकीय भूमिका

संसद, राज्‍यघटना यांचा अनादर करणारा विरोधी पक्ष लोकशाहीद्रोहीच होत ! अशांना इतरांवर टीका करण्‍याचा काय अधिकार ?