केरळमधील काँग्रेस आणि साम्यवादी सरकारला शबरीमला यात्रा होऊ द्यायची नाही ! –  टी.बी. शेखर, राष्ट्रीय अध्यक्ष, शबरीमला अयप्पा सेवा समाजम्

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव तृतीय दिवस (२६ जून) : देशाची सुरक्षा आणि धर्मरक्षा

श्री. टी.बी. शेखर

रामनाथी – ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’ची स्थापना वर्ष २००८ मध्ये मिझोरामचे माजी राज्यपाल कुमारम् राजशेखरची यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. ‘सर्व्ह अय्यप्पा सेव्ह शबरीमला’ (अयप्पा स्वामींची सेवा करा, शबरीमलाचे रक्षण करा) या उद्देशाने ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’ची स्थापना करण्यात आली. शबरीमलामध्ये येणार्‍या भक्तांना भगवान अय्यप्पांचे सुरक्षित आणि कुठल्याही अडचणीविना व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी ही संस्था कार्यरत आहे; कारण येथे येणार्‍या यात्रेकरून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केरळमधील आतापर्यंत असलेली काँग्रेस किंवा साम्यवादी सरकारे सरकारे हिंदुविरोधी आहेत.त्यांना हिंदु यात्रेकरूंची यात्रा अडचणीविना पार पडलेली नको आहे. ते यात्रेकरूंना अनेक प्रकारचे अडथळे आणतात, असे शबरीमला अयप्पा सेवा समाजम्चे राष्ट्रीय अध्यक्ष  टी.बी. शेखर यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सांगितले. वर्ष २०१७ पासून श्री. टी.बी. शेखर हे ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

श्री. शेखर पुढे म्हणाले की, केरळ सरकार अन्नदानाला विरोध करते. भगवान अय्यप्पा ‘अन्नदान प्रभु’ म्हणून प्रसिद्ध आहेत. अन्नदान करण्यासाठीही ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’ला न्यायालयात जाऊन अनुमती मिळवावी लागली. शबरीमला रथयात्रा ४८ दिवस चालते. यात्रेच्या काळात प्रतिदिन ८० सहस्र यात्रेकरू शबरीमलाला भेट देतात. या यात्रेकरूंसाठी ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’ने केरळमध्ये १४० अन्नदान केंद्रे चालू केली आहेत. प्रत्येक ५० किलोमीटरवर एक अन्नदान केंद्र चालू करण्यात आले आहे. ख्रिस्त्यांनी शबरीमला परिसरात एक चर्च बांधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला हिंदूंनी विरोध केल्यानंतर ते काम बंद पडले. आरंबोल येथे विमानतळ उभारण्यासाठी तेथील ध्वजस्तंभ काढून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.

शबरीमला मंदिरातील भगवान अय्यपा हे ‘चिन्मय’ मुद्रेमध्ये आहेत. त्यामुळे मंदिराच्या परंपरेनुसार या मंदिरात १० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील वय असलेलल्या महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. वर्ष २०१९ मध्ये सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाच्या विरोधात ६० सहस्र महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मंदिरातील परंपरा तोडण्यास विरोध केला. त्यामुळे मंदिरातील प्रथा चालू राहिली. व्हॅटिकन आणि मक्का यांच्यानंतर सर्वाधिक यात्रेकरू शबरीमला येथे भेट देतात. सरकारला येथील यात्रेकरूंची संख्या कमी करायची आहे. त्यामुळे ते सर्व अडथळे निर्माण करतात.