ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांची मागणी

कोल्हापूर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यामुळे अशा या महान योद्ध्याचा उल्लेख हा नेहमी सन्मानजनकच असला पाहिजे. असे असतांना ‘संभाजी ब्रिगेड’ संघटना मात्र एकेरी उल्लेख केलेल्याच नावाने आहे, ते हिंदू आणि वारकरी यांना खटकणारे आहे. तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणार्या ब्रिगेडवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ‘राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य प्रणित वैदिक हिंदु वारकरी बहुउद्देशीय सेवा संघा’चे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? – संपादक) त्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेडने त्याच्या नावात पालट करून ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करावे, अन्यथा त्यांचा पक्ष आणि संघटना यांची मान्यता रहित करावी.

या संदर्भात ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे श्री. दीपक काटे यांनी २२ एप्रिल या दिवशी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित केला आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असून आम्ही त्यात सहभागी होणार आहोत. याचसमवेत धर्मप्रेमी हिंदूंनींही या मोर्चात सहभागी व्हावे.