बीडमध्ये सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे पीडित महिला अधिवक्त्याचे म्हणणे !

  • महिला अधिवक्त्याला कुणीही मारहाण केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे !

  • ग्रामस्थांनी आरोप फेटाळून लावले !

बीड – अर्धशिशीचा त्रास होत असल्याने आपल्या घरासमोरील मंदिरातील ध्वनीवर्धक आणि पीठाची गिरणी हटवण्यात यावी, अशी मागणी करत ज्ञानेश्वरी अंजान या महिला अधिवक्त्याने तक्रार प्रविष्ट केली होती. त्यामुळे संतप्त झालेले गावाचे सरपंच आणि त्यांचे काही कार्यकर्ते यांनी सदर महिला अधिवक्त्याला शेतामध्ये घेराव घालून अडवले, तसेच त्यांना लाठ्याकाठ्या आणि पाईपच्या साहाय्याने बेदम मारहाण केली, असे महिलेचे म्हणणे आहे. ही घटना जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. या मारहाणीत घायाळ झालेल्या महिला अधिवक्त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी आता सरपंचांसह १० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी संताप व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांनी आरोप फेटाळून लावले !

महिला अधिवक्त्याला आमच्यापैकी कुणीही मारहाण केली नाही. उलट या पूर्वीही तिने गावातील अनेकांवर खोटे गुन्हे नोंद केले आहेत. गावातील मंदिराचा आवाज तिला सहन होत नाही, पिठाची गिरणी चालू केली, तर ‘बंद करा’ म्हणून सांगते, नेमके खावे काय ? आणि रहावे कसे ? असा प्रश्न बीडच्या अंबाजोगाई येथील सनगावच्या गावकर्‍यांनी केला आहे. कुणीही महिलेला मारले नसल्याचे गावकर्‍यांनी म्हटले आहे. काही वाद असते तर आम्ही महिलांनी मारहाण केली असती पुरुषांचा मारहाण करण्याचा संबंधच येत नाही. हा खोटा आरोप आहे, असेही गावातील महिलांनी सांगितले. ही महिला अधिवक्ता असल्यामुळे आम्हालाच अनेक वेळा खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. ‘माझ्यावरही खोटा गुन्हा नोंद केला होता’, असे एका वयोवृद्ध गावकर्‍याने सांगितले.