मुंबईतील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडले; संतप्त जैन समाजाकडून आंदोलन !

मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी

मुंबई – येथील विलेपार्ले परिसरातील जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. त्यामुळे जैन समाज संतप्त झाला होता. पाडकामाच्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून १९ एप्रिल या दिवशी अहिंसक फेरी काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले. त्यांनी हातात ‘मंदिर टुटा, हौसला नही’, असे फलक धरले होते. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी त्यांनी केली. मंदिर तोडक कारवाईनंतर काढलेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तेथील पालिकेचे विभाग वॉर्ड अधिकारी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढण्यात आला आहे.

जैन समाजाच्या या आंदोलनात जैन समाजातील महिलासुद्धा मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी महापालिकेची कारवाई योग्य नसल्याचे सांगितले. या कारवाईप्रकरणी महापालिकेने माफी मागावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी जैनांनी केली आहे.

हे मंदिर ९० वर्षे जुने होते. ते पाडण्यासाठी महापालिकेने नोटीस दिली होती. त्याविरोधात जैन समाज न्यायालयात गेला होता. कनिष्ठ न्यायालयाने जैन समाजाची याचिका फेटाळली. त्यानंतर जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाताच पालिकेने घाईघाईत मंदिर पाडल्याचा आरोप जैन समाजाने केला आहे.